अवघा रंग एक झाला... या अभंगात प्रत्येक
चरणात ७ शब्द आणि असे सात चरण म्हणजे ४९ शब्द. ह्या ४९ शब्दात एक जगावेगळी अनुभूती
व्यक्त करायची हे केवळ सोयाराबाईच करू जाणे, ह्या अभंगाच निरुपण म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच आहे.
कोणत्याही स्वानुभवाशिवाय निरुपण म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे. पण व्यक्त
होण्याकरिता त्यांची मदत घेण्यावाचून पर्याय नाही.
अवघा रंग एक झाला
रंगी
रंगला श्रीरंग
भागवत धर्म हा प्रामुख्याने वैष्णव संप्रदाय म्हणूनच विख्यात
असून त्यात विष्णु आणि विशेषतः त्याचा कृष्णावतार वासुदेव भगवान हाच उपास्य आहे
आणि वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठ्ठल,
हे
विष्णूचा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णाचे रूप मानले गेले आहे.
कृष्ण सावळा, विठू सावळा, सावळा
हरी, हरी भक्तही सावळा!
आषाढातील एकादशी. झाकोळलेले नभ आहे. सावळ्या मेघांची आभाळात दाटी आहे. सह्याद्रीचे ओले कातळ, काळे तुकतुकीत दिसत आहेत. अवघा रंग, अवघ्या विश्वाचा रंग एक झाला आहे, विठूचा झाला आहे, श्री चा झाला आहे.
अभंगाची पाहिली ओवी बाह्य रूपाशी तादात्म्य पावण्याच वर्णन
करते. बाह्य रंग एक झाला, हा बाहेरून सुरु झालेला प्रवास हळुहळु अंतरात्म्यापर्यंत
कसा जातो हे बघण्यासारखे आहे.
विठूच्या दर्शनाने...
मी तूपण गेले वाया
पाहता पंढरीच्या राया
द्वैत दूर झाले. मी आणि तू ह्यातील वेगळेपण लयास गेले, असे
म्हटले तर ते फारसे वावगे ठरणार नाही. कवियत्री
सोयराबाई आहे, चोखियाची महारी (चोखियाची पत्नी)
अस्पृश्य आहे आणि त्यातून स्त्री म्हणून तिच्या लिखाणास, विठू
दर्शनाच्या तिच्या ओढीबद्दल, समाजाकडून तीची जी काही
घोर अवहेलना झाली असेल ते लक्षात घेतले, तर मी तू पणाला, सामाजिक भेदाचा अमंगल वास
येतो. हे भेदाभेद करणाऱ्यांना उद्देशून आहे असे वाटते आणि तरीदेखील सोयराबाई
क्षमाशील वाटतात, सूर समजावणीचा वाटतो. त्या सगळ्यांनाच
विचारत आहेत काय मिळालं हा भेदाभेद करून? हाती काहीच आल नाही.
तुझा काय आणि माझा काय अहंकार सारखाच गळला. त्या पंढरीच्या रायाच्या नजरेत असा
कुठलाच भेदभाव, आपपर भाव, मी
श्रेष्ठ तू कनिष्ठ अशी भावना दिसली नाही. मग तू कोण असा लागून गेलास की हा भेद भाव
करावास? केलास तर केलास तोही वायाच गेला ना
शेवटी.
नाही भेदाचे ते काम
पळोनी गेले क्रोध काम
ह्या दोन ओळींकरता सोयाराबाईंच्या हुषारीला दाद द्यावी तेवढी
थोडीच आहे. बघा आपल्याला शाड्रिपू माहीत आहेत. ते खालील प्रमाणे-
लोभ, मोह, मद आणि मत्सर,
काम आणि क्रोध.
लिहिताना मुद्दाम चार आणि दोन असे वेगळे लिहिले आहेत. चाणाक्षांच्या
लगेच लक्षात आल असेल की अस लिहिण्यामागे काय उद्देश असावा. पहिल्या चार शत्रूंच्या
अस्तित्वाला, भेद, दुजा भाव असणे गरजेचं आहे. लोभ
(हाव) माझ्याकडे आहे पण अजून हवं आहे इतरांकडून ओरबाडयाचे आहे आणि मोहा करिता
दुसऱ्याकडे जे आहे ते माझ्याकडे हवं ही लालसा. मद, गर्व
ह्या करिताही तुलना गरजेची आणि मत्सर ज्याचा करायचा, तो हवाच की. पंढरीच्या
रायाच्या दर्शनाने घडलं काय? लोभ, मद, मोह, मत्सर नष्ट झाले मग भेदाचे कामचं उरले नाही. सोयराबाई ह्या
चारही शत्रूंच्या असण्याला भेदभावाला जबाबदार धरतात. आता उरलेले दोन रिपू, क्रोध
आणि काम, ज्यांच्या असण्याला आपण स्वतःच जबाबदार असतो तेव्हा ते देखील विठूच्या
दर्शनाने पळोनी गेले. ‘काम’ शब्दावराचा श्लेष चरणाच्या सौंदर्यात अधिक भर घालतो.
पुढच्या दोन ओळी विठूचे प्रत्यक्ष वर्णन वाटते.
देही असोनी विदेही
सदा
समाधिस्त पाही
विठ्ठलाला मानवी देह रूप आहे आणि त्याची असंख्य वर्णने आहेत.
पण तसे असूनही त्याच्या देहातीत रूपाच्या अस्तित्वाची जाणीव झाल्या शिवाय रहात
नाही.
ही द्विधावस्था ज्ञानेश्वरानी केलेल्या विठ्ठलाच्या वर्णनात
फार सुरेख प्रकट होते. तुज सगुण म्हणो की निर्गुण रे.... ह्या वर्णनात येणाऱ्या
परस्पर विरोधी जोड्या बघण्यासारख्या आहेत.
सगुण - निर्गुण, अनुमाने - ना
अनुमाने( नेति - नेति), स्थूल - सूक्ष्म, आकारू - निराकारू, दृश्य - अदृश्य, व्यक्त - अव्यक्त
ह्याच उत्तर म्हणून ज्ञानदेव पुढे म्हणतात, दोहोच एकत्र रूप
म्हणजेच तो गोविंद.
ह्या पलीकडे विदेही म्हणजे नेमके काय? ज्याच्या भौतिक देहाच्या कर्म - अकर्मा मुळे त्याचा सूक्ष्म
देह (आत्मा) लिप्त होत नाही. त्या कर्म - अकर्माच्या फळाचा परिणाम ज्याच्यावर होत
नाही तो विदेही.
मिथिलेचा राजा जनक विदेही होता असे मानतात. त्याने देवांच्या
बाजूने दानवांविरुद्ध अनेक युद्धे केली. मिथिलेचा राजा म्हणून राज्य केले. सीतेचे
कन्यादान ही एक पिता म्हणून केले. पण ह्यातील कोणत्याही कर्माचा त्याच्या
आत्म्यावर परिणाम झाला नाही आणि तो जन्म - मृत्यूच्या चक्रातून कायम मुक्त राहिला.
विठ्ठलाला जर ह्या विश्र्वात घडणाऱ्या सगळ्याच चांगल्या
वाईटाचा कर्ता करविता मानले तर ह्या सकारात्मक,
नकारात्मक
कर्मांचा, त्यांच्या फळांचा साधक बाधक परिणाम
विठ्ठलावर होताना दिसायला हवा, पण तसे दिसत नाही. म्हणजेच एकाच वेळेला कर्म
करण्याकरिता तुम्ही सगुण (देही) असायला हवं आणि त्या कर्माने अस्पर्श राहण्याकरिता
विदेही. ते रूप पाहणाऱ्याने, द्रष्ट्याने कसे पाहावे? ह्या करिता पुढची ओळ
विचाराला चालना देणारी आहे. हे जे विदेही रूप आहे ते द्रष्ट्याला तो स्वतः समाधीत
असताना दिसते. सदा समाधिस्त पाही!
नाकी विठ्ठल सदा समाधिस्त असतो, आणि विठ्ठ्लाचे रूप विदेही
असते.
थोडक्यात विठ्ठलाचे विदेही रूप पाहण्याकरिता द्रष्ट्याला
समाधिस्त व्हावं लागेल. हे विदेही रूप पाहण्याकरिता भक्ताला सुद्धा एक उंची गाठावी
लागेल. आम भक्तांना, सर्वसामान्यांना ते रूप दिसणार नाही.
पाहते पाहणे देले दूरी
म्हणे चोखियाची महारी
अवघा रंग एक होणे ही जर पहिली पायरी मानली तर वरील चरण कळस
म्हणता येईल. समाधिस्त होऊन विठ्ठलाचे विदेही रूप दिसेपर्यंत पाहण्याची क्रिया होते आणि दृश्याचे वर्णन, त्याचे परिणाम येतात. जे बघायचे ते आणि
बघणारा, हे वेगवेगळे आहेत. ज्ञेय आणि ज्ञाता
वेगवेगळे आहेत. ह्या नंतरची स्थिती ही खरंतर व्यक्तिगत अनुभूती आहे, कवियत्रीचा स्वतःचा अनुभव आहे, सोयराबाईंचे
विठ्ठल रुपाशी, विठ्ठलाशी तादात्म्य पावणे आहे, तल्लीन
होणे आहे. विठ्ठलाला बघता बघता बघणारी सोयराबाई विठ्ठलमय झाली. जे बघायचे ते आणि बघणारी
एकरूप झाले. पहाणारीच जर उरली नाही, तर पाहणे कसे बरे शिल्लक राहील? पाहता, पाहता पाहणेच दूर
गेले, ती क्रिया निघून गेली, संपून गेली त्याची गरजच संपली. अस्तित्व, असण्याचा धर्म, भाव हाच जर विठ्ठल रुपात विलीन झाला, माझे आणि
विठ्ठलाचे असणेच जर एक झाले, तर बघायला काय उरेल?
एव्हढी गहन अनुभूती अशा सोप्या शब्दात अभंग
रुपात सांगणे ही सोयराबाईंच्या मुखातून आलेली देववाणीच म्हणावी लागेल.
1 comment:
संत सोयराबाईच्या अभंगाच्या या निरुपणाने, आज इतक्या वर्षांनी तिचे विचार खरोखरच जो जो हे वाचतोय त्या त्या व्यक्तीमात्रांपर्यंत सुलभतेने पोहचले!
फार सुरेख शब्दमांडणी आणि ओघवती भाषा ही वैशिष्ट्ये यातही दिसून आली. प्रसारमाध्यमातून बरंच काही वाचताच ना, हेही वाचा असा छान संदेश मिळाला! अशाच आणखी वाचनाच्या प्रतीक्षेत
Post a Comment