Tuesday, 30 May 2023

अर्थ हरवलेले शब्द... ४

अर्थ हरवलेले शब्द ह्या मालिकेतील हा चौथा ब्लॉग. पहिल्या तीन ब्लॉग मध्ये आजही वापरले जाणारे पण आजच्या जीवन शैलीत अर्थ हरवलेल्या शब्दांचा उहापोह होता. ह्या ब्लॉग मध्ये मी दोन शब्दांविषयी लिहिणार आहे. त्या शब्दांच्या अर्थासोबतच ते शब्दही हरवले आहेत असे वाटते. गुगल शोधक वापरून जर एखाद्या शब्दाची व्याख्या शोधली तर शोधाच्या परिणामांच्या शेवटी, शब्द निर्माण झाल्यापासून त्या शब्दाचा साहित्यात किती वापर झाला याची टक्केवारी येते. तशी टक्केवारी मिळण्याची सुविधा जर कुठल्या मराठी शब्दकोशात किंवा तत्सम कुठल्याही साधनाद्वारे उपलब्ध असेल तर आपल्या आजच्या शब्दांचा साहित्यातील उपयोगाचा उतरता आलेख पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर बोली भाषेतील ह्या शब्दांचा वापर देखील कदाचित आता होत नसावा आणि असलाच तर अगदी नगण्य.

पाहिला शब्द आपल्या लहानपणी आपण बहुतेकांनी खुपदा ऐकला असावा, निदान आमच्या घरी तरी माझ्या आईच्या तोंडी मी हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे. लहानपणी जवळजवळ बहुतेक जेवणानंतर असं म्हटलं तरी चालेल, “अरे अंचवलास तरी कां? की तसाच गेलास खेळायला?” खेळ अर्धवट टाकून जेवायला यायला लागल्यामुळे जेवण झाल्या झाल्या खेळायला पळाल्यावर आईची आतून हाक येत असे. अगदी मोठे झाल्यावर सुद्धा “आंचवून तरी या, आणि मग काय ते गप्पा मारीत बसा. हात वाळले देखील” जेवणाच्या ताटावर आम्हा भावंडांच्या गप्पा रंगल्या की आईची तक्रार.

आंचवणे म्हणजे, चूळ भरून तोंड, हात धुणे. सकाळी झोपून उठल्यावर, बाहेरून आल्यावर देखील आपण हात, तोंड धुतो, ते म्हणजे आंचवणे कां? नाही! जेवण, खाणं करून झाल्यावर चूळ भरून तोंड आणि खरकटे  हात धुणे याला आंचवणे म्हणातात. आहे की नाही, आपली मराठी भाषा सुंदर. एका विविक्षित वेळेला करायच्या त्याच क्रियेला शब्द मात्र वेगळा!!

माझ्या मुलीने लहान असतांना आजीच्या तोंडून आंचवणे हा शब्द ऐकला आणि पटकन विचारलं “आजी, काय म्हणालीस? पुन्हा म्हण!” तिने आमच्या तोंडून हा शब्द तो पर्यंत बहुदा ऐकला नसावा. आजीने पुन्हा तोच शब्द वापरल्यावर तिच्या लहानग्या चेहेऱ्यावर प्रश्न चिन्ह आले “म्हणजे काय?” आजीने अर्थ सांगितल्यावर स्वारी उष्टे हात धुवायला जागेवरून हलली.

असे शब्द माझ्या दृष्टीने एका कालखंडाचे द्योतक आहे असे वाटते. एकत्र कुटुंब, कुटुंबात आजी आजोबा असण्याच्या, एकत्र जेवण्याचा कालखंड. आजच्या जीवन शैलीत जागा लहान झाल्या, एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती स्थिरावली. ताट, वाट्या आणि भांडी जाऊन त्या जागी प्लेटस, काटे आणि चमचे आले. हात पुसायचे कागद आणि हस्तप्रक्षालन पात्रे आली (finger bowls). हाताने खाल्ल्यावर हात धुवून, खळखळून चूळ भरणेच उरले नाही तर त्याला उद्देशून असलेला शब्द तरी कसा राहणार?

दुसरा शब्द किती लोकांनी ऐकला असेल ह्या बद्दल मला जरा शंकाच आहे. मी माझ्या घरात, शेजारी पाजारी हा शब्द लहानपणी ऐकला आहे. त्याच वयात साने गुरुजींच्या गोष्टीतही हा शब्द वाचल्याचे आठवते. मी गोव्यात असतांना कोकणीत देखील आजचा शब्द त्याच अर्थाने वापरलेला ऐकला आहे. ‘अळसूद जाणे’ म्हणजे पाणी पितांना ठसका लागणे. खेळ अर्धवट टाकून धावत पळत घरात शिरून उभ्याने फुलपात्र (हा ही शब्द अर्थ हरवलेल्या शब्दात जमा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही) तोंडाला न लावता घटाघटा पाणी पितांना ठसका लागल्यावर पाठीवर थोपटत आई म्हणत असे “बघ गेल ना अळसूद, अरे बसून प्यावं पाणी, बघ वर बघ, सासू कांदे सोलतेय” अळसूद आणि सासूने कांदे सोलण्याचं काय नात  आहे कोण जाणे आणि मुळात त्या वयात सासूचा उल्लेखच अनाकलनीय. पण आम्ही वर बघायचो, ठसका थांबायचा आणि आम्ही पुनश्च खेळण्याकरीता बाहेर पळत असू. जेवतांना, बसून बोलत असतांना, जर पाणी पितांना ठसका लागला तर वडीलधाऱ्यांपैकी कोणीतरी म्हणत “अळसूद गेलं, आत्ता कोण आठवण काढतय? सुमी असेल बहुतेक. जेवतांना एकमेकांच्या खोड्या काढायचात. आता सासरी गेल्यावर आठवण काढतेय”. सुमन सगळ्यात थोरली बहिण.   

आजकालच्या चौकोनी कुटुंबात, शिस्तीत वाढणाऱ्या आणि पूर्ण वेळ शाळा, जास्तीचे वर्ग (कोचिंग क्लासेस), कार्य शाळा ह्यात व्यग्र असलेल्या मुलांना खेळायलाच वेळ नसतो, धावत पळत पाणी पिण्याची गोष्ट दूरच राहिली. आपली कोणी आठवण काढली तर आपल्याला पाणी पितांना ठसका लागतो हे तर आता कोणाला माहितही नसेल. विनोदाचा भाग सोडा पण “अळसूद” ह्या शब्दाचा वापर आता होत नसल्यात जमा आहे. 

माझी बदलेल्या जीवन शैली बद्दल तक्रार आहे असे नाही, काळानुसार गोष्टी बदलत रहाणार हे सत्य आहे. जुने जाऊद्या मरणालागुनी.. असे म्हणतांना नेमके काय जाऊदे याचा विचार व्हावा असे वाटते. झऱ्याच्या पाण्याला खळखळ, अवखळपणा नसेल तर त्याचे सौंदर्य खचितच कमी होईल, नव्हे त्याला झरा म्हणताच येणार नाही. भाषेचे असेच काहीसे आहें असे वाटते. या आणि अशा अनेक शब्दांनी मराठी भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढते. अन्यथा ती गुळगुळीत, सपाट होत जाईल आहे असे वाटते.    

1 comment:

V. N. Khot said...

नेहमी प्रमाणे लेख सुंदरच आहे हो ! या लेखामुळे लहानपणीच्या अनेक आठवणी जाग्रुत झाल्या. आम्ही चार भाऊ, एक बहीण आणि आई, वडील असे कीती छान एकत्र रहात होतो ! तुम्ही आताच्या चौकोनी कुटुंबाचा उल्लेख केला आहे, अहो पण हल्ली तेही राहिले नाही, आता तर त्रिकोणी कुटुंब होऊ लागली आहेत आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल !!!

मला आणखी एक वाटते: पुर्वी म्हणींचा वापरही खूप होत असे, गृहीणी काम करीत असताना कविता, अभंग, गाणी सहज गुणगुणत असत. असो, बदल हा सृष्टीचा नियमच आहे Nobody can stop it.