लेखाच्या सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट करतो. लेखाचा मातृत्व, मातृत्वाची
थोरवी, महानता, आई वा
त्यासंबंधातील कोणत्याही भावनांचा अनादर करण्याचा उद्देश नाही. अनाहूतपणे कोणाच्या
भावना दुखावल्या तर त्या बद्दल अगोदरच दिलगिरी व्यक्त करतो.
मातृदिन ही संकल्पना तसं बघायला गेलं तर,
पाश्चिमात्यांकडून आलेली आहे. आपल्याकडे मातृदेव भव, पितृदेव भव ही भावना आहे.
माता, पिता हे सदा वंदनीय आहेत आणि एखाद्या दिवशी
मुद्दाम त्याची आठवण करून द्यायची, तसं बघायला गेलं तर गरज नाही. मातृदिनामागची जी
कृतज्ञतेची भावना आहे ती खरोखर प्रशंसनीय आहे आणि ह्या निमित्ताने जर कोणा
कृतघ्नास, जर मातेने जे दिले त्या बद्दल विस्मृती झाली असेल, तर कदाचित ह्या दिनी
तरी त्याचे त्यास स्मरण होईल. पाश्चिमात्यांकडून ‘व्यक्त होणे’ हे खरंच
शिकण्यासारखे आहे. मातृदिनी कृतज्ञताच आभाराच्या रूपाने व्यक्त व्हावी.
मातृत्व हे एखाद्या कडक व्रतासारखं आहे, आणि हे व्रत
समजून उमजून अंगीकारलं तरच ते फलदायी ठरते. प्रसूती वेदनांपासून किंबहुना
त्यापूर्वीच सुरु होणारं हे मातृत्व म्हणजे त्याग, मातृत्व म्हणजे निर्व्याज प्रेम, मातृत्व
म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता देत राहणं, माझं आयुष्य
माझ्या बाळाला दे, असं परमेश्वराला साकड घालणारी ती आई. आई फक्त आणि फक्त देतच
रहाते, आयुष्यभर तिला गृहीत धरले जाते, किंबहुना तिला गृहीत धरणे हा तिच्या
मुलांचाच नव्हे तर समाजाचाही हक्क झाला आहे. वृद्धापकाळात, ती स्वतःचे सर्वस्व
देऊन बसल्यावर मुले काळजी घेतील ही अपेक्षा देखील आजकाल अमान्य दिसते.
स्त्री ही क्षणाची पत्नी, प्रिया आणि
अनंतकाळची माता असते हे म्हणत असतांना ती स्त्री कधी असते? ती ‘स्वतः’ कधी असते? अनंत काळची माता म्हणजे मुलांच्या (ती
कोणत्याही वयाची असोत) संगोपनाची, मुलांच्या अडल्या-नाडल्याला उपयोगी पडण्याची कायम
स्वरूपी जबाबदारी तिच्यावर टाकली आहे कां? पुरुषांना कधी
क्षणाचा पती, प्रियकर आणि अनंत काळचा पिता म्हणल्याच कुणी ऐकलं आहे कां?
मातृत्व! एखाद्या गोष्टीचे, संकल्पनेचे
एवढे उद्दात्तीकरण केलेले दुसरे उदाहरण सापडणार नाही. क्षणभर ह्या उद्दत्तीकरणापासून
जरा दूर होऊन मातृत्वाकडे बघितलं तर काय दिसतं?
किती मुली स्वेच्छेने माता होतात? किती मुलींवर,
कितीदा मातृत्व लादले जाते? अमेरिकेत (प्रगत राष्ट्र?) तर आता स्त्रियांना त्यांचा निवडीचा तर सोडाच, पण मातृत्व
नाकारण्याच्या अधिकारपासून देखील वंचित व्हावं लागेल असं दिसतंय. किती मुलामुलींना
मातापिता होणं म्हणजे काय हे खरोखर समजतं? त्यातील दोघांच्या जबाबदारीची जाणीव
ठेऊन पालक बनण्याचा निर्णय किती जण घेतात?. पालकत्व ही एक पूर्णवेळ दोन्ही
पालकांनी एकत्र पार पाडण्याची जबाबदारी आहे हे समजण्याएव्हढा समाज प्रगल्भ आहे कां? आजकाल सुशिक्षित
समाजांत ही टक्केवारी कदाचित जास्त असेल, पण भारतातील बहुसंख्यांकांचा विचार केला
तर दृश्य खूप वेगळ दिसेल.
वरील गोष्टी जर सत्य म्हणून क्षणभर मान्य केल्या, तर हे उद्दात्तीकरण नेमक कां
झालं आणि कुणी केलं?
ह्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीच, केवळ कारणीभूत आहे कां? की नि:संतान स्त्रीपेक्षा (ज्याला कदाचित वा बहुतांश वेळा ती
कारणीभूत नसते), मातेला (पुत्रवती असेल तर अधिकच) समाजात जास्त मान मिळतो म्हणून पुरुषप्रधान संस्कृती इतक्याच स्त्रिया देखील, वा संपूर्ण समाज त्याला जबाबदार आहे? नि:संतान म्हणून बायकाच बायकांना
हिणवताना दिसतात.
एखाद्या व्यक्तीला एकदा का देवघरात नेऊन बसवले की त्यांच्या मार्गावरून
चालण्याची सामान्यांची जबाबदारी संपते. तसेच काहीसे ह्या उद्दात्तीकरणाचे आहे.
वर्षातून एक दिवस मातृदिन साजरा केला, जातायेता मातृत्वाचा उदोउदो केला, की आपली
माता सोडून (त्यालाही काही अपवाद आहेत) बाकी स्त्रिया ह्या कोणाच्या न कोणाच्या
तरी माता असु शकतात, होऊ शकतात आणि मुळात त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि
त्यानाही सन्मानाने वागवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ह्याचा सोयीस्कर विसर पडला
तरी चालतो.
ह्या आणि तत्सम सर्व संकल्पनामध्ये ‘माता’ ही एक व्यक्ती आहे, स्त्री आहे हे कुठे तरी हरवल्यासारखे, जाणीवपूर्वक
विसरल्यासारखे वाटते. मातृत्वाचा खरोखर आदर करायचा असेल तर प्रथम आदर
स्त्रीत्वाचा, स्त्रीचा करता यावयास हवा. कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती एक
दिवस न करता, सदोदित कृतज्ञ (being grateful) असणे हे जास्त महत्वाचे आहे.
ह्या मातृदिनी जर आपण स्त्रीत्वाचा आदर करण्यचा संकल्प सोडला तर मातृदिन खऱ्या
अर्थाने साजरा होईल असे वाटते.
2 comments:
Bang on!
खूपच सुंदर विचार !!समस्त स्त्री वर्ग याच अपेक्षेत आहे.स्त्रीचा आदर व्हावा!!त्या सुदिनाच्या प्रतिक्षेत..
Post a Comment