Tuesday, 18 April 2023

काश्मीर: एक अनुभव

 

प्रत्येक भारतीयासारखे (खरंतर जगातील सर्वच पर्यटकांप्रमाणे) माझेही काश्मीरला जाण्याचे कित्येक दिवसांचे स्वप्न होते. त्याची पूर्तता होण्याकरिता ६ मार्च २०२३ हा दिवस उजाडावा लागला. या सफरीवर आम्ही दोघे, नेल्सन आणि जेनिफर असे चौघे होतो. नेल्सन, जेनिफरशी आमचे गोव्यातील कैक वर्षांपासूनचे मैत्र. तो पहिला दिवस श्रीनगर व आसपास फिरण्यात घालविला. श्रीनगरमध्ये लाल चौक, जहांगीर चौक या भागात सीमा सुरक्षा आणि सैन्यदलाच्या जवानांची उपस्थिती जाणवण्याइतपत होती, पण त्याचा लोकांच्या दैनंदिन व्यवहारावर काही परिणाम होत होता असे वाटले नाही. किंबहुना त्यांची उपस्थिती पर्यटकांना कदाचित आश्वासक वाटत असेल असे वाटले.

दल किंवा डाल तलावाचा विस्तार बघून अचंबित व्हायला होते. तलावाचं पाणी जलपर्णी रहित बऱ्याच अंशी स्वच्छ वाटलं. संध्याकाळपर्यंत श्रीनगर आणि आसपास फिरण्यात घालवला. या भटकंतीत जाणवलेली गोष्ट म्हणजे काश्मीर भेटीचा योग जुळून आला खरा, पण तो १५ दिवसानंतर आला असता तर बरं झालं असतं (काही गोष्टी कदाचित टळल्या असत्या). १९-२० मार्चला जगप्रसिद्ध ट्युलिपच्या बागा पर्यटकांकरिता उघडणार होत्या. काश्मीरातल्या वेगवेगळ्या बागा अजून फुलायच्या होत्या. मुघल गार्डन, चष्मे शाही, शालीमार इत्यादी बागांमध्ये कुठे फुलांच्या ताटव्यांची मशागत चालू होती तर कुठे छाटणी केलेल्या गुलाबांच्या झाडांचे रसरशीत लाल-किरमिजी धुमारे थोडक्या काळात बहरणाऱ्या गुलाब पुष्पांची वर्दी देत होते. चिनार वृक्षांची छोट्या छोट्या केसाळ चेन्डूसारखी फळे पिकून काळपट तपकिरी झाली होती. पाईन, देवदार मात्र आपला गर्द हिरवा साज नम्रपणे मिरवीत होते. या बागांमधून, आणि त्यांच्या बाहेर, जागोजागी, ओल्या नारळाचे तुकडे तिखट, मीठ, मसाला लावून आणि त्यावर लिंबू पिळून विकताना, लोक दिसले. आश्चर्य वाटले, आपल्याकडे नारळ पिकत असून हा प्रकार आढळत नाही आणि इथे मात्र नारळ पिकत नसतांनाही हा खाद्य प्रकार लोकप्रिय वाटला, पर्यटक तसेच इथले रहिवासी नारळाचे तुकडे विकत घेतांना दिसत होते. आम्ही देखील त्याचा आस्वाद घेतला.

दुपारी हजरतबल प्रार्थनास्थळ किंवा दर्गा शरीफला भेट दिली. प्रेषित मुहंमदांचे केस येथे आहेत अशी लोकांची श्रद्धा आहे.  हे प्रार्थनास्थळ दल तलावाच्या किनाऱ्यावर आहे. आम्हा सर्वांकरिता इस्लामी प्रार्थनास्थळाला भेट देण्याची ही पहिलीच वेळ होती. महिलांना प्रवेश नव्हता. दर्ग्यात जवळ जवळ शुकशुकाट होता. मुख्य प्रवेशदारातून आत गेल्यावर पूर्ण मोकळा सभामंडप होता. जमीन पूर्णपणे गालिच्याने आच्छादलेली होती. बहुदा याचा वापर सामुहिक नमाजाकरीता होत असावा. समोरच्या खोलीच्या दारावर पडदा होता, मी आणि नेल्सन दोघंही तिथें येऊन थबकलो. आमच्या मागून आलेल्या एका गृहस्थाने पडदा बाजूला करून आत शिरताना सुहास्य मुद्रेने   (बहुदा आमचा संभ्रम ओळखून) आत येण्यास खुणावले. त्याच्या पाठोपाठ आम्ही आत गेलो. आत काही जण नमाज पडत होते. एकूणच हा अनुभव आम्हा दोघांकरिता भावनिक दृष्ट्या वेगळा होता.      

त्या दिवशी आमचा मुक्काम निगीन तलावात इंशाअल्लाह कंपनीच्या हाउस बोटीत होता. निगीन तलाव दल तलावाच्या तुलनेने छोटा आहे. हाउस बोटींची गर्दीपण कमी होती. सूर्यास्तानंतरचा शिकाऱ्यातून फेरफटका फारच रमणीय होता. वेगवेगळे विक्रेते त्यांच्या होड्यांतूनच जवळ येऊन आपला माल विकण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना नाही म्हणायला फारच जड जाते. पर्यटन व्यवसायावर सर्वच अवलंबून आहेत असे दिसले. शेवटी पहिल्याच दिवशी आम्ही येणाऱ्या विक्रेत्यांना आजचा आमचा शेवटचा दिवस आहे, आमची सगळी खरेदी झाली आहे असे सांगण्यास सुरुवात केली. शिकाऱ्यातून फिरतांना भाज्या, फुले वाढवण्याकरिता केलेले तरंगते वाफे बघायला मिळाले. आठ वाजण्याच्या सुमारास चहुबाजूनी नमाजाची अजान ऐकू येऊ लागली. भोवतालच्या विविध मशिदीतून थोड्याफार फरकाने एकाच वेळेला अजानची सुरुवात झाली. वातावरणात एक प्रकारचा काहीसा सुरेल कोलाहल निर्माण झाला होता. त्यावेळी आपण नक्की कुठे आहोत याचा क्षणभर संभ्रम निर्माण झाला. नुकताच उगवलेला पौर्णिमेचा चंद्र, शिकाऱ्याच्या बाजूला नावाड्याचे वल्हे बुडताना होणारा डुबुक डुबुक आवाज आणि ती अजान, मनात संमिश्र भावना उचंबळून आल्या. ह्या पार्श्वभूमीवर, ६ मार्च होळी, पौर्णिमेचा चंद्र आणि हाउस बोटीतील ती रात्र. अंग शहारणारी थंडी. उगाचच गूढ वाटू लागलं आणि गुलझारांच्या “रूह देखी हैं कभी?” कवितेतल्या ओळी आठवल्या..

...

या शिकारे में किसी झील पे जब रात बसर हो

और पानी के छपाकों में बजा करती हो टलियाँ

सुबकियाँ लेती हवाओं के कभी बैन सुने है?

....

विचार करता करता विजेवर गरम केलेल्या गादीवर कधी झोप लागली कळलं देखील नाही. हाउस बोटीतील परवेझने अतिथ्यशिलतेचा जणु दाखलाच दिला. त्याचं मला सर्वात आवडलेलं वाक्य “आप बोलो, whatever possible, हो जायेगा”.

दुसऱ्या दिवशीची पहाट फारच रम्य होती. निगीन तळ्यातील पाण्यावर थंडीमुळे बाष्प तरंगताना दिसत होते. त्या धुक्यातून वाट काढत छोट्या होड्यातून फुले, भाज्या विकणारे विक्रेते दिसले. सगळ्यांनी काळ्या किंवा तपकिरी रंगाचा फीरन किंवा फेरन (लोकरीचे पायघोळ गाऊन-झगे) घातले होते. सकाळी परवेझाच्या हातची न्याहरी केली आणि त्याला खुश करून निघालो. निघतांना पुन्हा येऊ असं म्हटल्यावर परवेझच्या तोंडून इंशाअल्लाह (ईश्वराची इच्छा) ऐकून सोनमर्गच्या वाटेला लागलो.


वाटेवर ठिकठिकाणी सफरचंदांच्या बागांमध्ये सफरचंदांची झाडे, झाडून सगळी पाने गाळून नव्या पालवीचे वरदान मागत हात उंचावून तटस्थ उभी होती. कुठे कुठे बागायतदार किंवा शेतमजूर सफरचंदांच्या झाडांवर भरगोस पिकाच्या आणि पिकाला चांगला भाव मिळण्याच्या अपेकक्षेने फवारणी करीत होते. फिरन किंवा फेरन घालून स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करतांना दिसतं होत्या. पर्णरहित विलो वृक्षांच्या रांगाचरांगा रस्त्याच्या दोन्ही बाजूस दिसतात. ह्या झाडाच्या लाकडापासून क्रिकेट ब्याट बनविण्याचा मोठ्ठा उद्योग येथे चालतो. जगभरात  इंग्लंड आणि काश्मिर ह्या दोनच ठिकाणी होणारे विलो लाकूड क्रिकेट ब्याट करिता प्रसिध्द आहेत असे समजले. ही झाडे पर्ण रहित दिसण्याचे कारण पानगळ नसून हा पाला शेळ्या-मेंढ्या करिता गावकरी तोडतात अशी माहिती मिळाली. नवीन लाल चुटूक पालवी कुठे कुठे दिसत होती. विलो वृक्षांच्या बरोबरीने अक्रोडाची झाडे दिसली. ह्याची पाने मात्र हिवाळ्यातील पानगळीत गळली होती.
   
सोनमर्ग जसजसे जवळ येऊ लागले तसतसा हवेतला गारवा जाणवू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बर्फाचे ढीग दिसत होते. काही दिवसांपूर्वीच रस्ते मोकळे केले आहेत असे चालकाकडून समजले. हा हा म्हणता रस्त्याच्या कडेपासून ते थेट डोंगर माथ्यापर्यंत बर्फ दिसू लागले. संध्याकाळचा सूर्य प्रकाश डोंगरावरच्या बर्फावर सुवर्णाचा लेप चढवत होता. पाईन, देवदार सावल्यांचा खेळ खेळत होते. मजेशीर भाग म्हणजे ह्या वृक्षांच्या पायतळी बर्फाचा मागमूसही नव्हता. वृक्षांचा शाखा-पर्ण संभार, वृक्षांच्या पायाशी बर्फ पोहोचू देत नसावा. जणु प्रत्येक झाडाला बर्फाचं खळ असावं असं दिसत होतं. दुरून पहाता दळलेल्या पिठाच्या रिंगणात जात, आणि झाड हे त्या जात्याचा खुंटा असल्यागत भासत होत. पौर्णिमा नुकतीच होऊन गेल्यामुळे रात्रीच्या चंद्र प्रकाशाचा बर्फावरचा खेळ काही औरच होता. बर्फ नसलेला डोंगराचा भाग अधिकच काळाभोर दिसत होता. झाडांच्या सावल्या गडद गहिऱ्या झाल्यामुळे झाडांची उंची दिसेनाशी झाली होती. दिवसा त्रिमिती मध्ये दिसणारे दृश्य दोनच मितींमध्ये (लांबी, रुंदी) दिसतं होते. ह्या काळ्या पटावर बर्फाच्छादित भाग जास्तच पांढराशुभ्र दिसत होता. काळ्या-पांढऱ्या रंगाचा जणु गालिचाच अंथरल्यासारखे भासत होते. शब्दात हे सगळे पकडण्याचा प्रयत्न म्हणजे निव्वळ वेडगळपणा वाटतो. ह्याची डोळा ते अनुभवणे हेच खरे. रात्री तापमान उणे ९ पर्यंत खाली गेलं. पण गरम उबदार हॉटेलच्या खोलीमध्ये त्याचा पत्ताच लागला नाही, परिणामतः सोनमर्ग मधील पहाट झोपण्यातच गेली. सोनमर्गची पहाट बघण्याकरिता पुन्हा येणे हे नक्की.
 
सकाळी नाश्ता करून पहलगामच्या रस्त्याला लागलो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दिसणारी बहुतेक घरे एक-दोन मजली व उतरत्या छपराची होती. बहुतांशी घरांवर गडद हिरव्या रंगाचे पत्रे होते, अपवादात्मक घरे लाल, जांभळ्या रंगाच्या पत्र्याच्या छपरांनी उठून दिसत होती. प्रत्येक फर्लांग दीड फर्लांग अंतरावर मशिदींचे हिरवे गर्द मिनार घरांच्या गर्दीतून डोकावून आपले अस्तित्व जाणवून देत होते. सकाळची वेळ असल्यामुळे वाटेत येणाऱ्या गावांमध्ये वर्दळ तशी कमीच होती, बरीचशी मंडळी आपल्या काश्मिरी पेहेरावात उन्हाला पाठ देऊन बसलेली, उभी असलेली दिसत होती. शाळेत जाणारी मुले, मुली रंगीबेरंगी लोकरीचे स्वेटर घालून जाता येता दिसत होती. फारच गोड वाटली ती मुले. तुरळक कुठे कुठे बायका बाजारहाट करतांना दिसल्या. 
 
पहलगामला ठराविक सहल घेतली. अनुक्रमे  बेताब व्हॅली, मामलेश्वर मंदिर, चंदनवाडी, अरु व्हॅली या स्थळांना भेट दिली. ह्या स्थळांना जायच्या वाटेवर अनेक हिंदी चित्रपटांच्या चित्रिकरणाच्या जागा दाखवण्याचं काम आमच्या चालकाने केले. बेताब व्हॅली मध्ये बर्फावरून ढकलगाडीतून सहल केली. अदनान, ढकलगाडी ढकलणाऱ्यांपैकी एक, फारच उत्साही होता. तोंडाने अखंड बोलत आमच्या बरोबर तोही जणु आनंद लुटत होता. बर्फात आम्हाला उभं करून त्याच्या दोन मित्रांनी दोहोबाजूला उभं राहून आमच्यावर बर्फ उधळून हिमवृष्टीचा आभास निर्माण करीत आमची खूपच करमणूक केली. अदनानने ह्या हिमवृष्टीचे आमच्या मोबाईलवर चित्रीकरण केले.  अमरनाथ आणि कारगिल पर्वतरांगा तिथून अगदी जवळ दिसतात. अदनान आणि त्याचे सोबती फ्रीसलन गावातीले होते, हे बहुदा भारतीय सीमेवरचे शेवटचे गाव आहे.
 
मामलेश्वर किंवा मामल मंदिर. हे शिव मंदिर इस. ४०० मध्ये बांधले  गेले. राजा जयसिंहाने त्या मंदिरावर सुवर्ण कलश चढवून त्याचे नुतनीकरण (इस. ११२५-११५५) ह्या काळात केले. दंतकथे प्रमाणे महादेवांनी ह्याच जागी गणपतीला हत्तीचे मस्तक लावले. मंदिर केवळ ८ चौ. फुटाचे आहे. त्याचा समोर स्वच्छ पाण्याचे कुंड आहे. जिवंत पाण्याचे झरे कुंड सदोदित भरलेलं ठेवतात.
 

पहलगामवरून गुलमर्गच्या वाटेवर अवंतीपूर मधील अवन्तिस्वामी मंदिरचे अवशेष बघितले. अवन्तिवर्मा नामक राजाने ओडीशा मधून येऊन इस. ८५५-८८३ ह्या काळात ही मंदिरे बांधली. इथे माहिती देण्याकरिता अब्दुल हमीद नावाचा मार्गदर्शक होता. मध्यभागी उंच चबुतऱ्यावर विष्णू मंदिर होते. त्याच्या चार दिशांना गणपती, गरुड, भूमी आणि सरस्वती ह्या देवतांची  मंदिरे आहेत. १४ व्या शतकात भूकंपात किंवा पुरात ही मंदिरे गाडली गेली. १९१३ मध्ये इंग्रजांनी उत्खनन करून हे अवशेष शोधून काढले. ह्यातील काही मूर्ती श्रीनगर मधील वस्तुसंग्रहालयात आहेत, तर काही इंग्लंडमध्ये. ह्या मंदिरांच्या परिघात ६९ पुजाऱ्यांच्या खोल्या आहेत. आँधी चित्रपटातील तेरे बिना जिंदगी..... ह्या गाण्याचे चित्रीकरण ह्याच अवशेषांमध्ये झाले आहे अशी उद्बोधक माहिती अब्दुलने दिली.

 

सोनमर्ग सारखेच थंडगार, बर्फाळ स्वागत गुलमर्गने केले. भोवताल सर्वच बर्फाच्छादित होता. रस्ते देखील बर्फ बाजूला सारून मोकळे केले होते. त्यादिवशी हॉटेलमध्येच मुक्काम होता. गुलमर्गच्या वाटेवर तंगमर्गला थांबून गमबूट, ओव्हरकोट गोगल, सनक्रीम वगैरे घेऊन गुलमर्गला पोहोचलो. तंगमार्गला एका मार्गदर्शकाचा देखील बंदोबस्त केला होता. हॉटेलमध्ये प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण  केल्यानंतर फोटो काढण्याकरिता बाहेर आलो. परत येतांना हॉटेलच्या मुख्य दरवाजापासून ते स्वागतकक्षापर्यंत लाकडाचे फ्लोरिंग होते. मध्यभाग लोकांना चालण्यासाठी गालिच्याने झाकलेला होता. बोलण्याच्या नादात गालिच्यावरून न जाता मी लाकडी फरशीवर गेलो. फरशी ओली होती. काहीही कळण्याचा आता अस्मादिक पाय घसरून पार भुईसपाट झाले. पडतांना प्रतिक्षिप्त क्रियेने उजवा हात प्रथम जमिनीवर आपटला. शरीराचा तोल, भार हाताने सावरण्याच्या प्रयत्नात मनगटाने दगा दिला. हाड मोडणे आणि सरकणे ह्या दोन्ही गोष्टी एकाचवेळी घडल्या. बरोबरच्या कोणालाही मला सावरण्याची संधीच मिळाली नाही. लोकांच्या मदतीने उभा राहिलो. उजवे मनगट सोडून कुठेही दुखत नव्हते. बहुदा उजव्या हाताने मोठ्या अपघातापासून वाचवलं होतं, मनगटावर निभावलं असच म्हणावं लागेल.
हॉटेल मधील कर्मचारी मदतीकरता धावले. कुणीतरी बर्फ लावा म्हटल्यावर, एकाने धावत जाऊन बाहेरून बर्फ जमाकरून आणला. कुणीतरी हातात वाफाळणाऱ्या चहाचा कप ठेवला. बघता बघता मनगटाचा आकार बदलला. बर्फ लावून सुद्धा चांगलीच सूज आली. वेदना मुक्या माराचे गांभीर्य जाणवून देत होती. गुलमर्ग मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Centre) सोडून कोणतीही वैद्यकीय सुविधा उपलब्ध नव्हती. हाड मोडले आहे ह्या बद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नव्हती पण डॉक्टरी निदान आवश्यक होते. प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे नक्की झाल्यावर हॉटेलचा कर्मचारी आदिल मारुती व्हॅन घेऊन आला. मी आणि हेमा, माझी पत्नी त्याच्या बरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचलो. अत्यावश्यक माहिती घेऊन, शौकत आणि तारिक दोघा कर्मचाऱ्यांनी केस पेपर बनवून प्राथमिक तपासणी केली आणि हाड निखळले आहे असे निदान केले. खात्री करण्याकरता क्ष किरण चिकित्सा केल्यावर हेयरलाईन फ्रॅक्चर देखील आहे हे कळले. शौकत व तारिक दोघांनीही खूप धीर दिला. “यहां ऐसे बहोत पेशंट आते है, कोई चिंता की बात नहीं, हम ठीक कर देंगे”  ह्या केंद्रावर बर्फात स्केटिंग,स्कीईंग करतांना पडून हात, पाय फ्रॅक्चर झाल्याच्या खूप घटना घडतात त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना भरपूर अनुभव होता. डॉक्टर आले की ओढ (traction) देऊन हाड जागेवर आणू व मग प्लास्टर करू असे शौकतने सांगितले. शौकत आणि तारिक दोघांचेही बोलणे इतके आश्वासक होते की कोणताही किंतु, परंतु डोक्यात न आणता मी स्वतःला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे ओढ कशी देणार? भूल देणार का नाही? कितपत दुखेल? कोणतेही प्रश्न मला खरोखरच पडले नाहीत. थोड्यावेळात डॉ. बिलाल आले. हात बघितल्यावर शौकत आणि तारिकचे निदान अचूक आहे असे म्हणाले. ह्या सर्व काळात आदिल धाकट्या भावासारखा आमच्या सोबत होता. डॉ. बिलाल नी केस पेपरवर काय काय सामान लागेल त्याची यादी आदिलच्या हातात दिली. आदिल कुठून तरी सगळी सामुग्री घेऊन आला. ओपीडी मध्ये मला बसवल्यावर काहीही न बोलता तरिकने माझा उजवा दंड मागून घट्ट धरला. शौकतने हाताची बोटे धरून हात बळेच सरळ केला. रस्सीखेच करण्याचा दोर असावा अशी माझ्या हाताची अवस्था होती. डॉ. बिलालांनी आपल्या बोटांनी माझ्या मनगटावर विविक्षित ठिकाणी जोर द्यायला सुरवात केली. एखाद दोन मिनिटे हा प्रकार चालू होता. असह्य वेदनांनी त्या थंडीत देखील मला अक्षरशः घाम फुटला. मोठ्या कष्टांनी मी आरडाओरडा करण्याचे टाळले. ताण तसाच कायम ठेवून डॉ बिलाल आणि आणखीन एका सहकाऱ्याने हाताला प्लास्टर घालण्याचे काम केले. ह्या सगळया गडबडीत आमच्या दोघांच्याही अंगावर पुरेसे थंडीचे कपडे नव्हते हे लक्षातच आले नाही. हातावरचे प्लास्टर देखील ओले होते. वेदनेबरोबरच थंडीने माझा अंत बघायला सुरुवात केली. तारिकने मला गॅस हिटर समोर बसवले. डॉ. बिलालनी केस पेपर वर औषधांची नावे लिहून दिली. आदिल पुन्हा बाहेर जाऊन औषधे घेऊन आला. प्लास्टर सुकल्यावर आम्ही निघालो. आदिलच्या मदतीने केमिस्टचे बिल देऊन आदिलच्याच मदतीने पुन्हा रूमवर पोहोचलो. पुण्याला परत येऊन आमच्या अस्थिरोग तज्ञांना भेट दिल्यावर केलेले उपचार योग्य आहेत असे समजले आणि पुढील पाच आठवडे हात गळ्यात ठेवणे आले.

ह्या चौघांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्यामुळे आम्ही आमची सहल पूर्ण करू शकलो. अगदी गुलमर्ग मध्ये देखील बाकीच्यांनी बर्फावरच्या साहसांचा आनंद पुरेपूर घेतला.     

काश्मीर सहल काश्मीरी खाण्याबद्दल न लिहिता पुरी होणार नाही. आपण पाच पक्वानांच ताट सणासुदीला वाढतो तसाच पण मुख्यत्वे मांसाहारी आणि काही शाकाहारी पदार्थांचा एकाच ताटात समावेश म्हणजे काश्मिरी वाझवान. काश्मिरीमध्ये वाझ म्हणजे स्वयंपाक किंवा स्वयंपाकी आणि वान म्हणजे विकत घेणें.  कमीतकमी पाच मांसाहारी आणि दोन किंवा तीन शाकाहारी पदार्थांच्या समुदायाने वाझवानची थाळी सजते. ज्याच्यात्याच्या ऐपती प्रमाणे ही संख्या वाढत जाते. राजेशाही किंवा नवाबी वाझवानची थाळी ३६ खाद्यपदार्थांनी सजते. त्यात १५-३० पदार्थ मांसाहारी असतात. अनेक पदार्थांचा एकाच वेळेला आस्वाद देणारी वाझवान थाळी खाद्ययात्रींकरिता एक सुखद अनुभव आहे. नद्रू याखनी, ही कमळाची देठे व दही वापरून केलेली रसभाजी आहे. त्यात वापरलेल्या मसाल्यांमुळे त्याची लज्जत अधिकच वाढते. काश्मिरी हलव्याने थोडीशी निराशा केली. सढळ हाताने सुकामेवा घालून केलेला आपला शिरा ह्या व्यतिरिक्त काही वेगळ वाटलं नाही. काश्मिरी पुलाव देखील खास वेगळा वाटला नाही. भरपूर सुकामेवा घालून केलेला काहीसा गोडसर पुलाव. गोड पदार्थात फिरनी आणि गरम गरम गुलाबजाम लाजवाब.

मनात कोणताही पूर्वग्रह, अपेक्षा न ठेवता सहलीला गेल्याचा फायदा म्हणजे भेटलेल्या काश्मीरवासियांना मोकळेपणी भेटता आलं, त्यांच्याशी संवाद साधता आला. काश्मीरमध्ये लोकांचा अनुभव खूप चांगला आला. मग तो गाडीचा चालक असो, हॉटेल मधील रूम सर्विसचा स्टाफ वा वेटर असो, सगळ्यांचे वागणे अत्यंत अगत्यपूर्ण वाटले. पहिल्या पासून शेवट पर्यंत आमच्या बरोबर असलेल्या शौकतने, चालकापासून पर्यटन मार्गदर्शकापर्यंत सर्व भूमिका उत्कृष्ट पार पाडल्या. जागोजागी जाणवला तो प्रामाणिकपणा. लोक गरीब जरूर आहेत पण अप्रामाणिक नाहीत. आलेले पर्यटक हे पाहुणे आहेत आणि त्यांना त्रास होता कामा नये ही भावना घोडेवाले, स्लेज ओढणारे, बर्फावरची स्कूटर चालावणारे वा टॅक्सीवाले या सर्वांच्यात दिसली. प्रत्येक गोष्टीत भाव करावाच लागतो, पण कडवटपणा येत नाही.  शेवटी बक्षिसी किंवा टिपची अपेक्षा असतेच. पण नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे जे द्याल त्यात ते ख़ुश वाटले.

काश्मीर सहल संस्मरणीय झाली असेच म्हणावे लागेल. चुकलेला वसंतोत्सव पुन्हा जाऊन बघण्याची, तेथील लोकांना भेटण्याची इच्छा मात्र जरूर आहे.

 

6 comments:

Innovative Milind said...

खूप छान अरुण . अगदी सहज ह्या पृथ्वी वरच्या स्वर्गाची सफर करून आणलीस . धन्यवाद

Josh1 said...

खूप छान वर्णन

vikas satam said...

धन्यवाद अरुण, तुझ्यासोबत आज, दहा वर्षापूर्वी पाहिलेले कश्मीर (की काश्मीर!) पुन्हा पाहिले आणि न पाहिलेलेही प्रथम अनुभवले! कोणत्याही इझमचा चश्मा न लावता केवल उघड्या डोळ्यांनी कश्मीर अधिक एंजाॅय करता येते या माझ्या मताला तुझ्या ब्लाॅगने दुजोरा दिला. ईरान आलेल्या बादशहाला जे वाटलं तेच कुणाही पर्यटकाला आजसुद्वाधा वाटावं हेच कश्मीरचे वैशिष्ट्य!
गर फिरदौस बर रुए जमी अस्त
हमी अस्तो, हमी अस्तो, हमी अस्तो

Shubhada said...

खरंच तुमचं लिखाण सुंदर आहे ..कश्मिर च प्रवास वाचताना जणू काही आपण तिथे त्या निसर्गरम्य स्वर्गात फिरतो आहोत. ..असेच वाटले आणि आम्ही ही सर्वजण जवळ जवळ 2005 कीवा 2006 ला जावून आलो पण संपूर्ण प्रवास पुन्हा घडवला तुम्ही.......असेच लिहत रहा आणि आम्हाला पाठवा...तुमचे ही अनुभव

Prashant said...

मागील आठवड्यात मलाही तिथे जाण्याचा योग आला.
आपण केलेले वर्णन अतिशय चपखल आहे.

V. N. Khot said...

आताच तुमचा लेख वाचला. काश्मीर येथील निसर्ग सौंदर्यचे वर्णन खुपच छान केले आहे. ते वाचुन मला पुर्वीच्या सिनेमांची आठवण झाली, कारण त्यावेळेला अनेक सिनेमांचे चित्रण तेथे होत असे.
हजरतबल प्रार्थनास्थळ किंवा दर्गा शरीफला भेट दिली, पण तेथे आत काय पहायला मिळाले याची उत्सुकता वाटते.
वृक्षांच्या पायतळी बर्फाचा मागमूसही नव्हता, हे फारच आश्चर्यकारक आहे, आता पर्यंत हे मला माहित नव्हते. काय निसर्गाची कीमया आहे ?
एकुणच तुमचा लेख खूप माहितीपूर्ण आणि मनोरंजक आहे.