Saturday, 9 October 2021

कुंती

कुंती, महाभारतातील असं एक व्यक्तिमत्व की जे रंगमंचावर दिसत नसलं तरी आपल्या अस्तित्वाची सदोदित जाणीव करून देत रहात. कुंती शुरसेनाची मुलगी. यादव कुलोत्पन्न, वसुदेवाची बहिण, कृष्णाची सख्खी आत्या. पाळण्यातील नाव पृथा, शब्दशः अर्थाने पृथ्वीची कन्या. कुंतिभोज राजाची दत्तक कन्या म्हणून कुंती.

महाभारत नावाच्या प्रचंड गुंतागुंत असलेल्या महाकाय जुळणी कोड्याच्या (jigsaw puzzle) काही प्राथमिक तुकड्यांची सुरवात कदाचित दुर्वास मुनींनी कुंतीभोज राजाला दिलेल्या भेटी पासून झाली असेल असे वाटते. महाकोपिष्ट दुर्वास मुनींची भेट म्हणजे यजमानांवर संकटच. त्यांच्या रागाच्या धाकाची कल्पना करा, एक पिता जो राजा आहे, दुर्वासांच्या दिमतीला असंख्य दास, दासी ठेवण्याची त्याची कुवत असूनही आपल्या मुलीला त्यांची सेवा करण्यास सांगतो. आज्ञाधारक कन्या आपल्या पित्याच्या इच्छेनुसार दुर्वास ऋषींची सेवा करून त्यांना प्रसन्न करून घेतें. संतुष्ट होऊन दुर्वास ऋषींनी तिला आशीर्वाद देऊन एक मंत्र सांगितला. त्या मंत्राचा जप करून कुंती ज्या मानवाचे, दानवाचे वा देवाचे स्मरण करेल, त्याच्या पासून तिला पुत्रप्राप्ती करून घेता येईल. (आजच्या सामाजिक मापदंडानुसार विचार करून कर्ण दुर्वास पुत्र होता असा मुद्दा मांडण्याचा मोह अनेकांना होईल पण कृपया तो टाळावा. अन्यथा कर्ण ब्राह्मण पुत्र ठरेल आणि व्यासांना महाभारत नव्याने लिहावं लागेल). थोडा विचार केला की या मंत्राचं किंवा दिलेल्या वराचं महत्व लक्षात येईल. भविष्यात कुंतीला जो पती मिळेल त्याच्या पासून तिला पुत्र प्राप्तीची शक्यता नाही आणि वेळेवर पुत्रप्राप्ती होणे हे राज्याला वारस देण्याच्या दृष्टीने आत्यंतिक गरजेचे असेल त्यावेळी हा मंत्र उपयोगी ठरेल ह्याची जाणीव दुर्वास ऋषींना होती असे म्हणावे लागेल. महाभारतातील अनंत प्रसंगांच्या साखळीतील अनेक सुरवातीच्या दुव्यांमधील एक दुवा म्हणता येईल असा हा प्रसंग.

तारुण्य सुलभ उतावळेपणा म्हणा, औत्सुक्त्य म्हणा, मिळालेल्या मंत्राचा वापर करून पहाण्याचा, त्याची शहानिशा करण्याचा मोह होण आत्यंतिक स्वाभाविक होतं आणि तो तसा कुंतीला झाला. त्या काळी आजच्या मुलामुलीं प्रमाणे इतक्या लहान वयात कोणावर आकृष्ट वगैरे होण्याचा प्रकार नसावा त्यामुळे मंत्राच स्मरण करतांना, रोज सकाळी उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना दिसणारं, त्याचं ते सालस गोजिरे रूपच, कुंतीच्या डोळ्यासमोर आलं असावं. दुर्वासांचा मंत्र फुकट जाण्याचा वा सफल न होण्याचा संभवच नव्हता. कर्णाचा जन्म झाला. हेतू, कुतूहल शमन करण्याचा होता, माता होण्याचा नव्हे. कर्णाच्या जन्माबरोबरच तिच्यातील मातेआधी क्षत्रिय राजकन्या जागी झाली, राजाला, राज्याला हानी पोहोचेल असं कोणतही कृत्य आपल्या हातून घडू नये यासाठी ती जागृत झाली आणि कर्णाचा त्याग हा सोप्पा मार्ग अनुसरून मोकळी देखील झाली. तिच्यातील या क्षत्रिय स्त्रीच्या असंख्य प्रसंगांचे निष्ठुर दाखले महाभारतात पदोपदी मिळतात.   

यथावकाशाने कुंतीचा विवाह बलिष्ट कुरुवंशातील युवराजाशी, पंडुशी झाला. पंडूला कुंती पासून अपत्य होत नाही असे दिसल्यावर, मद्र कन्या माद्रीशी पंडूचा दुसरा विवाह केला गेला (त्या काळीही, पुरुषी अहंकारामुळे, पुत्र प्राप्ती ही बहुदा केवळ स्त्रीची जबाबदारी होती, अर्थात कुंतीने ती पार देखील पाडली). स्वाभिमानी कुंतीला कदाचित अपमान वाटला असेल किंवा पंडूच्या मर्यादा ठाऊक असल्यामुळे मनोमन हसूही आलं असेल. सर्व संमत्तीने नियोगाने पुत्रप्राप्ती करून घेण्यासाठी पंडू दोन्ही भार्यांसह वनात निघून गेला. काळ आपल्या गतीने जात होता, धृतराष्ट्राचा विवाह गांधार देशाच्या राजकन्येशी गांधारीशी झाला (आणि रंगमंचावर शकुनीच्या रूपाने खलनायकाचा वावर सुरु झाला – प्रसंगांचे कंगोरे दर्शवण्याचा मोह आवरला नाही). (वाचा ब्लॉगपोस्ट गांधारी). गांधारी गरोदर असल्याच्या बातम्या कुंती पर्यंत पोहोचल्या आणि तिची घालमेल सुरु झाली. ज्या कामा करिता आपण वनात आलो ते काम पूर्ण करावं, असा धोशा तिने पंडूच्या मागे लावला. हेतू, क्षत्रिय राज्ञीचा, पंडूच्या गादीला वारस मिळावा, कुरुवंशाचे राज सिंहासन पंडू पुत्रांकडे रहावं (नियोगाच्या नियमांनुसार अशी मुले त्यांच्या जैविक वडिलांची न मानता आईच्या पतीची मानली जात असतं).

सिंहासनाला वारस म्हणून एकच पुत्र असून भागणार होतं. राजा हा शांत, धर्मप्रिय, मृदू, सत्यवचनी असावा पण राज्य राखण्याकरिता वाढविण्याकरिता, मिळवण्याकरिता (ही परिस्थिती ओढवू शकते ह्याची पृथेला पूरेपर जाणीव होती) हे गुण पुरेसे नाहीत. शौर्य, गरज पडल्यास क्रौर्य, युद्ध शास्त्रात नैपुण्य, कुशाग्र, बलाढ्य, थोडक्यात काय षड्रीपुंशी दोस्ती नाही पण फारकत देखील घेतलेली नसावी अशा योध्यांची राजाला निश्चित गरज आहे. ह्या सर्वांकरिता बाहेरील कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या सहोदरांची साथ मिळाली तर अधिक काय हवं? ह्याची कुंतीला पुरेपूर कल्पना होती. नियोग किंवा दुर्वासांनी दिलेला मंत्र जे असेल ते असो, पण नियोगा करिता वा मंत्रोच्चार करतांना स्मरण करण्याकरिता, निवड केलेल्या देवतांची नावे पाहिली की कुंतीच्या दूरदृष्टीला दाद द्यावीशी वाटते. यमधर्म, वायू आणि इंद्र हे क्रमशः युधिष्टिर, भीम व अर्जुन ह्यांचे जन्मदात्रे ठरले. पुर्वनियोजनानुसार युधिष्ठिरा पाठोपाठ भिमार्जुनांचा जन्म बरच काही सांगून जातो. माद्रीला मंत्र सांगण्याचा मोठेपणा आणि त्यानंतर पंडूला व माद्रीला तिने मिळू दिलेला एकांत (तिच्या सारख्या दक्ष स्त्रीच्या हातून ही चूक होऊ शकत नाही). ह्यात शापित दुबळ्या पंडूची आहुती पडली आणि माद्री सती गेली. माद्रीच्या रूपाने सत्तेचा एका दावेदार निर्माण होण्यापूर्वीच संपला आणि नकुल सहदेव लहान वयातच कुंतीच्या पदरा खाली आले. कुंती पुत्रांबारोवर त्यांची नाळच जणु कायमची जोडली गेली (पंडू व धृतराष्ट्र देखील एकाच पित्यापासून पण भिन्न मातांच्या पोटी जन्माला आले होते). एका महत्वाकांक्षी राज्ञीला जगण्याकरिता एक हेतू मिळाला. पुढचा प्रवास केवळ पंडू पुत्रांना त्यांचा हक्क मिळवून देणे वा त्यांनी तो मिळवण्याकरिता त्यांना तयार करणे हे उद्दिष्ट गाठणे या दिशेने चालू राहिला.

लाक्षागृहातून सहीसलामत निसटल्यानंतर अज्ञातवासात भीमाकरवी घडवलेला बकासुर व हिडींब राक्षसांचा निप्पात आणि त्या पश्चात बलाढ्य राक्षस वंशाशी कायमचे वैर टाळण्याकरता भीम व हिडीम्बेच्या विवाहाला दिलेली मान्यता. न्यायाने घटोत्कच हा पांडवांचा वारस ठरलास असता, ते टाळण्याकरिता, हिडींबेला मुल झाल्यानंतर, ती भीमाशी कोणताही व्यवहार वा संबंध ठेवणार नाही असे हिडीम्बेकडून घेतलेले वचन. ह्या तिच्या कृतींमधून, कुंतीच्या  राजकीय मुत्सद्देगिरीचा एक नमुना आपणास पहावयास मिळतो असे म्हणायला हरकत नाही. हे करीत असतांना एक स्त्री म्हणून हिडीम्बेला काय वाटेल, तिचे भीमावर प्रेम होते म्हणून ती ह्या दिव्याला तयार झाली ह्या कशाचाच परिणाम निर्णय घेतांना कुंतीवर झाला नाही. ह्याच हिडीम्बेच्या पुत्राचे, घटोत्कच्याचे बलिदान कृष्णाने कुरुक्क्षेत्रावरील महायुद्धात दिले आणि अर्जुनाला मारक ठरणारी वासवी शक्ती वापरण्यास कर्णाला भाग पडले (वाचा ब्लॉगपोस्ट बलिदान).

द्रौपदीला स्वयंवरात खरतर, पण पुरा करून, अर्जुनाने जिंकले होते. द्रौपदीने देखील मनोमन अर्जुनास वरले असावे. पाच पांडव तिला घेऊन परत आल्यावर तिचा विवाह पाचांशी व्हावा ही कुंतीची आज्ञा काही अंशी अमानुष वाटली तरी ती पाच पांडवांना घट्ट बांधून ठेवणारी ठरली. खास करून नकुल व सहदेव, ज्यांच्यात त्यांच्या वडीलबधुंइतकी क्षमता नव्हती. ही आज्ञा देतांना देखील द्रौपदीला, अर्जुनाला काय वाटेल, त्यांच्या भावना, ह्याचा विचार ती करत बसली नाही. द्रौपदीला पाहताक्षणी तिच्या लक्षात आलं की ह्या अलौकिक सौंदर्याचा मोह बाकीच्या भावांना आज न उद्या पडल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तो प्रश्न निर्माण होण्यापुर्वीच तिने निकालात काढला.  

ह्या सगळ्या तिच्या निर्णयांवर कडी म्हणजे कुंतीची आणि कर्णाची भेट. बघण्यासारखे आहे, त्या भेटीची वेळ, नेमेकी महायुद्ध सुरु होण्यापूर्वी, कर्णाने पूर्ण निर्धाराने दुर्योधना बरोबर उभं रहाण्याचा निर्णय घेतल्यानंतर. भेटीत कर्णाला त्याच्या जन्माचे रहस्य सांगितल्यावर त्याची सर्व बलस्थाने मुळापासून उखडली जातील ह्याची पूर्ण कल्पना कृष्णाला होती. कृष्णाच्या इच्छेनुसार ती गोष्ट कुंतीने अमलात आणली. ज्या कर्णाला आपण सोडून दिले त्याच्या कडून आपल्या चार  पुत्रांकारिता अभय मागतांना तिला यातना झाल्या होत्या की नाही ते कळायला मार्ग नाही. हे करीत असतांना तिने आपल्या पाचही पुत्रांना वाचवले (अर्जुनाला कृष्णाचे अभय होते).   

यादव राजकन्या म्हणून जन्माला आल्यापासून, ते कुरु राज्याची राजमाता होण्यापर्यंत, कुंतीने केलेला हा प्रवास बघतांना डोळ्यासमोर एक राजकारणी, धूर्त धुरीण, धोरणी, काहीशी कठोर आणि जन्मदात्री असूनही पुत्रांची निवड करणारी स्त्री उभी राहिल्याशिवाय रहात नाही. किंबहुना कुंतीला महाभारताला दिशा देणारी स्त्री म्हटली तरी फारसं गैर ठरणार नाही. 

4 comments:

vikas satam said...

इतके विविध कंगोरे असलेलं व्यक्तिमत्त्व एका लेखात कसं बरे कवर करू शकतोस?!!

अनंत बेडेकर said...

लेख खूप छान लिहिला आहे ...
भाषा वापरताना तुझा संयम निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

Josh1 said...

छान वेगळे विचार

Unknown said...

Khup chan