Saturday, 25 March 2017

खारे दाणे


स्टेशन ते माझे घर चालत साधारण दहा ते बार मिनिटांच अंतर, जलद चालणाऱ्यां करता त्याहूनही  कमी. मार्केटातून  गेलो तर थोडं जास्त. इतक्या अंतरात देखील एके जागी माझे पाय अचानक थांबतात खरं तर वळतात. एखादया मद्यपी माणसाचे पाय गुत्त्याकडे  वळावेत तद्वत माझे पाय पार्लेश्वर मंदिरा समोरील चणे-दाणे  वाल्याकडे  वळतात, आणि हे असे आजच नव्हे तर मी कमवायला लागल्या पासून गेली कित्येक वर्ष चालू आहे. जर मी स्टेशन वरून चालत आलो तर मंदिरा समोरच्या त्या भडभूंज्याकडे  खारे दाणे घेतल्या शिवाय माझे  पाउल पुढे पडतच नाही.

मला आठवतं ते पार्लेश्वराचे  जुने देऊळ आणि त्याच्या समोर बैठ्या चाळी सदृश्य इमारतीत असलेला हा चणे दाणे वाला. कमरे इतकी उंची असलेल्या भट्टीच्या बाजूला उभे राहून  रेतीने भरलेल्या  कढईत लोखंडी चाळणीने वर खाली करत दाणे भाजणारा भय्या, हे नित्य दिसणारे दृश्य. आता ती चाळ जाऊन तिथे ऊंच इमारत ऊभी आहे, देऊळ देखील खूप प्रशस्त झालं आहे पण तो चणे-दाणे वाला आहे तिथेच आहे, चणे-दाणे विकायला बहुदा त्याची मुले बसतात. बदल म्हणावा तर चण्यादाण्यांबरोबर आता तो शेव, फरसाण , पाणी पुरीच्या पुऱ्या व तत्सम काही बाही विकतो. खाऱ्या दाण्यांची चव आणि खाणारा मी, मात्र तोच आहोत, फरक म्हणाल तर तेंव्हा १० पैशाचे दाणे घेत होतो आता तेव्हढेच दाणे पाच रुपयाला घेतो.

दाणे खात खात घरी जाण्यातली गंमत काही और आहे. मी दाणे सोलून खातो, हो साले रस्त्यातच टाकतो, चूक आहे, पण बायोडिग्रेडेबल का काय जे म्हणतात ना, तसा कचरा आहे हा, म्हणून स्वतःला माफ करतो. खारे दाणे खाण्याचे  काही नियम आहेत. सोलून तोंडात टाकलेला पहिला दाणा संपता संपता दुसरा दाणा तोंडात गेला पाहिजे, दाणा तोंडात टाकतना थोड्या अंतरावरून तो तोंडात गेला पाहिजे,ओठांना हात न लागता. खाण्याचा वेग इतकाच असावा की दाण्यांचा तोबरा होता कामा नये आणि सर्वात महत्वाचा दाणा, म्हणजे पुडीतीला शेवटचा दाणा. चालता चालता तो दाणा खाणे हे एखाद्या बारीक कलाकुसर करणाऱ्या कारगिराला सुद्धा आव्हानात्मक ठरेल इतके कठीण, डाव्या हाताने पुडीचे तोंड  झाकलेले हवे व उजव्या हाताची तर्जनी व अंगठा यांच्या मदतीने पुडीचे शेवटचे टोक घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेला इतकेच फिरवावे की टोकाला अडकलेला  दाणा तिथून निसटावा पण पुडीच्या उघड्या तोंडातून त्याने रस्त्यावर आत्मघातकी उडी मारू नये. घडू नये, पण तसे घडलेच तर ते  दुःख शब्दात मांडणारा शब्दप्रभु माझ्या वाचण्यात अजुन तरी आलेला नाही. असो, तो शेवटचा दाणा जग जिंकल्याच्या थाटात तोंडात टाकता टाकता  डाव्या हाताने पुडीचा चोळा मोळा होऊन तो बोळा रस्त्याच्या कडेला फेकला गेला पाहिजे. (आता कचऱ्याच्या डब्यात जातो, घरी पोहोचल्यावर).

काल संध्याकाळी देखील, मी नेहमी प्रमाणे दाणे खात खात निघालो, थोडा पुढे जातो न जातो तर काकूंची हाक कानावर आली. देवळातून दर्शन घेऊन काकू घरी निघाल्या होत्या. काकू, म्हणजे आमच्या शेजारच्या दामले आजी, खरंतर त्यांना आजीच म्हणायला हवं, पण का कोणास ठाऊक,आम्ही सगळे त्यांना काकू म्हणतो. घरातील मोठे त्यांना काकू म्हणतात म्हणून असेल कादाचित. दामले काकूना आम्हा भावंडाचे खूप कौतुक, त्यांना स्वःतला मूलबाळ नव्हतं. मला आठवत, सहावीत जाताना माझी एक तुकडी  गेली तेव्हा माझ्यापेक्षा त्यांनाच अधिक दुःख झालं होतं. माझी समजूत काढताना म्हणाल्या, "गेली तर गेली, चारशे मुलांच्यात तू एकवन्नावा तर आहेस" (५० मुलांची एक तुकडी होती, सहावीमधे  दुसऱ्या तुकडीत गेलो होतो). मी थांबून मागे वळलो, चालत काकूंच्या जवळ गेलो. "काय हो काकू?, पिशवी घेऊ? "
"छे रे, असं काय वजन घेऊन चालले आहे? आणि हे रे काय ?" माझ्या चेहऱ्यावर भले मोठ्ठे प्रश्न चिन्ह, पटकन कपड्यांवर नजर टाकली काही पडलाय का?
"काय काकू?"
"बँकेत एव्हढा मोठ्ठा ऑफीसर तू आणि रस्त्यातून दाणे खात काय चाललायस? लोक काय म्हणतील?"
"काकू, दाण्याचा इतका खमंग वास आला की अगदी राहवलं  नाही, नेहमी नाही खात काही" धडधडीत खोट, पण काकुंच समाधान झालं .
"असूदे रे, माझ्या मेलीच काय ऐकतोस, मनात आलं म्हणून बोलले, राहूदे, बरं  चाललाय ना?"
"हो काकू" थोडा अवघडलो, काकूंच्या चालीने चालायचं म्हणजे? माझी अडचण त्यांच्या लक्षात आली. "अरे गेलास तरी चालेल". पडत्या फळाची आज्ञा मानून मी तिथुन पाय काढला.

प्रसंग अगदी छोटा, का खातो मी दाणे? कारण कदाचित माझ्या बाळपणाशी निगडीत असावं. लहानपणी हट्ट केल्याशिवाय दाणे मिळत नसत, आणि मिळाल्या नंतरचा आनंद! काय वर्णावा तो, अगदी  समाधी अवस्था. जिभेवर रेंगाळणारी ती खारट चव, दाणे कधी संपूच नयेत असच वाटायचं. किती सोप्प होत आयुष्य,आनंद मिळवणं. आज दाणे  खाताना बहुदा खोल कुठेतरी ते तणाव मुक्त बालपण पुन्हा अनुभवास येत असाव. दाणे हे माध्यम बनते माझ्या बाळपणाच्या अनुभूतिशी जोडणारे, नकळत पुनः प्रत्ययाचा आनंद देणारे, खरंच सांगतो, दाणे संपेपर्यंत, माझा ह्या व्यवहारिक जगाशी सम्बन्ध तुटतो आणि नकळत मी तणाव, चिंता ग्रस्त - माझ्या पासून खूप खूप लांब जातो. असेल का असं? अंन्तरमनात कोणत्या गोष्टीची  सांगड कशाशी घातलेली असेल सांगणं,  फार कठिण आहे. माझ्या बाबतीत म्हणाल तर खारे दाणे आणि तणाव, चिंता, भीति मुक्त स्वच्छंदी जगणे ह्यांची कुठेतरी खास जोडणी आहे. दाणे देखील खूप सारे नाहीत त्या पुडीत मावतील इतकेच, नाहीतरी मनाची तरल अवस्था फार काळ टिकायला मी योगी थोडाच ना  आहे?

2 comments:

Unknown said...

Sahi mastach lihile ahes vachtana dolya samor chitra ubha rahat. 👍👌

ashaagni said...

खरच खारदाणे खात थोडावेळ का होइना पाहिजे त्या आठवणीत रमणे हा नेहमी पेक्षा वेगळा अनुभव दिवसाचा शीण क्षणार्धात नाहीसा करतॊ. मला वाचून जाणवले तुला मात्र माझ्या करता दाणे खाऊन लिहायला लागले. असो असेच सुंदर विचार पोचवत रहा. आशा