जवळ जवळ पस्तीस-छत्तीस
वर्षांनी आज “फ्रेंड्स?” अशी रिक्वेस्ट पुन्हा
करता आली. टेक्नोलॉजी दुसरं काय! खरंतर रिक्वेस्ट म्हणजे विनंती, मैत्रीची विनंती?
विसंगती वाटते. प्रश्र्न? माझ्याशी मैत्री करशील? चुकतंय काही तरी, अस विचारून
मैत्री थोडी ना होते? मैत्र जीवाचं असत, मैत्री होते, करता येत नाही. मैत्री चा
रुकार?, स्वीकार?, होकार? जाऊ दे.
“तू मला माझी
मैत्रीण वाटतेस, आपण चांगले मित्र होऊ असं मला वाटतं आणि तुला?” अस प्रत्यक्ष भेटीत
विचारलं होतं. हो तेव्हा, पस्तीस-छत्तीस वर्षांपुर्वी, आठवतं? मला चांगलं आठवतंय, ती
जागा, तो महाविद्यालयाचा व्हरांडा जिथे मी हा प्रश्र्न तुला विचारला होता. अगदी काल
घडल्या सारखा आजही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. अगदी तुझ्या चेहेऱ्या वरच्या अविर्भावासकट. हो, म्हणताना जितंमया! असे भाव
होते तुझ्या चेहेऱ्यावर आणि डोळे मिस्कील
हसत होते, मी मागून येणार आणि हा प्रश्र्न विचारणार याची जणू खात्रीच होती तुला. किंबहुना
माझी वाट बघतच तिथे उभी होतीस तू. खूप राग आला होता मला माझा, इतका कसा मी गृहीत धरला जाऊ शकतो? पण तू हो म्हणालीस ह्याच्या आनंदात
तो राग कधी विरून गेला ते माझं मलाच कळल नाही. खूप खुश होतो त्या दिवशी. मित्रांनी
खूप खेचली, पण कुणा कुणाचाही राग नाही आला.
पुढचे दिवस खूप
वेगाने गेले, मैत्रीचे रुपांतर प्रेमात वगैरे. इतर युगुलांच्यात आणि आपल्यात एक
फरक होता निदान मला तरी तसं वाटत, चुकत असेन कदाचित. मैत्री करता मी हात पुढे केला, तेव्हढाच काय तो माझा पुढाकार. ब्रेकप,
प्रपोज काय जे आज कालची मुलं मुली
एकमेकांना सारखी करत असतात ते सगळ तूच केलस. तू विसरली सुद्धा असशील, इतक्या सहज,
बेफिकीरीने विचारलं होतसं, काय तर “माझं हो
आहे, तुझं ?” मी नाही म्हणालो असतो तर? तू नाही म्हणशील या भीतीने माझ विचारायचं कधी
धारिष्ट्य झालं नव्हतं, त्यामुळे मी नाही म्हणायचा सवालच नव्हता. हे ही बहुदा तुला
माहित होतं.
विसरली असशील, मी
मात्र अजून त्या पायऱ्यांशी घुटमळतोय. पुन्हा संधी मिळाली तर? उगाच काय विचार करायचा,
आत्या बाईला मिशा असत्या तर ... त्यातली गत. त्या नंतरचा अगदी प्रत्येक क्षण वगैरे
नाही पण बरेच प्रसंग मात्र आजही स्मरणात कायम आहेत. नाही म्हणायला काही क्षण चिमटीत
तसेच धरून ठेवलेत, पावसात चिंब भिजून घरी परतल्यावर, निरोप घेताना तुझ्या
डोळ्यातून जे काही बोललीस, शब्दात सांगणं अशक्य आहे, इतकं सांगितलंस. जर तुझ्या
दारात उभा नसतो, तर कृतीनेच उत्तर दिलं असत. तुझ्या वाढदिवसाला सकाळी उठल्याबरोबर नेमकी आठवण होते, अजून नाही विसरलो ती तारीख.
भेट, पुनर्भेट
दीर्घ असावी आणि निरोप थोडक्यात उरकावा, भावनांच्या लाटांनी निग्रहाच्या भिंती कोसळण्यापूर्वी वेगळं होता आलं पाहिजे. असं मानणारा मी, किती वेळ रेंगाळलो. तू मात्र, गळ्यातला एखादा बहुमोल अलंकार हलकेच काढून ठेवावा किवा भेट म्हणून मिळालेल्या नाजूक कलाकुसर केलेल्या
काचेच्या शोपीस वरच्या रिबिनीची गाठ अलगद सोडवावी इतक्या हळुवारपणे त्या नात्यातून बाजूला
झालीस. काही काळ जावा लागला मला उमजायला कि मैत्री संपलीय? दुःख झालं ? नाही नेमकं तसंही नाही म्हणता येणार, माझ्या अपेक्षेपेक्षा फारसं वेगळ काही घडल नव्हतं तरी देखील आत खोलवर काही तरी मोडून पडलं. मी कायमचा बदललो.
नाही! मी तक्रार
करत नाही. म्हणशील, इतकी वर्षे काय हाच विचार करतं होतास? साचलेल्या पाण्यासारखा? जीवन
कस प्रवाही असावं, तूच म्हणायचीस की आणखी कुणी? नाहीं आठवतं. नाही, खरचं अजिबात तक्रार नाही. मी माझ आयुष्य मजेत जगतोय. तुला बर वाटावं म्हणून नाही
म्हणत. सुखी संसार केलाय, करतोय. आम्ही सगळेच खूप आनंदी आहोत, एक मेकांवर भरपूर
प्रेम करतो. अनेक भाव भावनांचे अर्थ खरेतर लग्नानंतरच
कळले.
तुझ्या मनात आलं
असेल ना इतक्या सगळ्या आठवणी कुरवाळत कस शक्य आहे? लग्न करून सुखी संसार वगैरे? तू
कधी सिमेंटच्या गीलाव्यावर उठलेली कुत्र्या, मांजराची क्वचित कधी तीन बोट असलेली, कबुतराची किवां कोंबडीची पावलं बघितली असशील. तसचं काहीस आहे हे. माती मऊ ओली
असताना उठलेले ठसे आहेत, चिन्ह आहेत,आठवणी आहेत. त्यामुळे त्या तश्या रहाणं स्वाभाविक
आहे. आता वाळून कडक झालेल्या गिलाव्याला त्याच दुःख नाही किंबहुना जाणीव देखीलं नाही.
हां, आता अधेमधे कधी
कमी जास्त पाऊस झाला तर पाणी वाहून जातं, गिलावा पटकन सुकतो, पण या पावलांत मात्र
पाणी थोडं जास्त काळ राहातं इतकंच काय ते.
1 comment:
Mast
Post a Comment