महाभारत हे महाकाव्य अनेक व्यक्तिमत्वांची, अमुल्य रत्नांची अक्षय खाण
आहे. प्रत्येक पात्र हे अतिशय आखीव, रेखीव,
आपापले गुणविशेष जपणारी आहेत. वेद व्यासांनी ह्या पात्रांना उभं करतांना ज्याच्या
त्याच्या विशेषाप्रमाणे, वकुबाप्रमाणे, लायकीप्रमाणे
योग्य न्याय दिला आहे. माझ्या दृष्टीने एकच व्यक्तिरेखा अशी आहे की जिच्यावर
अन्याय झाला आहे असे वाटते. त्याच्या योग्यतेनुसार त्याला महाभारतात महत्व
मिळालेलं नाही असे वाटते. ती व्यक्तिरेखा
म्हणजे विदुर.
विदुर, ह्या नावाचा शब्दशः अर्थ हुशार, ज्ञानी असा
होतो. कुरु राजा विचित्रवीर्याच्या (शंतनू आणि सत्यवतीचा पुत्र) अंबिका व अंबालिका
या राण्यांच्या परिश्रमी नावाच्या दासीला वेद्व्यासांपासून नियोगाने झालेला पुत्र.
नात्याने कौरव, पांडवांचा काका, धृतराष्ट्र व पांडु (पंडु) यांचा कानिष्ट बंधु, म्हणजे एकाच पित्यापासून वेगवेगळ्या मातांना झालेले तीन
सावत्र पुत्र.
कुरु वंशातील सर्वात थोरला म्हणून सत्यवतीने प्रथम भीष्माला विचित्रवीर्याच्या
विधवा राण्यांना नियोगाने संतती देण्याची विनंती केली. भीष्माने आईला, (राजा
शंतनूची पत्नी ह्या नात्याने) तिला दिलेल्या स्वतःच्या वचनाची आठवण देऊन तिच्या
इच्छेची पूर्तता करण्यास असमर्थता प्रकट केली. नात्याने व्यास मुनी हे चित्रविर्य (चित्रांगद) व विचित्रवीर्य यांचे थोरले सावत्र बंधु
(सत्यवतीला पराशर ऋषींपासून झालेला पुत्र) व या नात्याने चित्रविर्य व
विचित्रवीर्य यांच्या अकाली अपत्यहीन मृत्युनंतर त्या काळातील नीतिनियमांनुसार
सर्व संमतीने, विधवा राण्यांना नियोग पद्धतीने वारस देण्यास योग्य. भीष्माने नकार
दिल्यानंतर सत्यवतीने कुरु साम्राज्याला नियोग पद्धतीने वारस देण्याची आज्ञा वजा
आवाहन व्यासांना म्हणजे आपल्या मोठ्या पुत्राला, केले आणि तदनुसार ह्या तीन
कुरुपुत्रांचा जन्म झाला.
थोरला धृतराष्ट्र हा जन्मतः अंध (अंबिकेचा), धाकटा पांडु (अंबालीकेचा) हा जन्मतः पंडुरोगाने
बाधित. राज्याचा वारस हा शक्यतो अव्यंग असावा असा दंडक असल्यामुळे, सत्यवतीच्या
आग्रहाने व्यासांना पुन्हा एकदा पुत्रजन्माचा प्रयत्न करावा लागला. यावेळी मात्र विचित्रवीर्याच्या
दोन्ही राण्यांनी संगनमताने परिश्रमी नावाच्या दासीला आपल्या ऐवजी व्यासांकडे
पाठविले आणि विदुराचा जन्म झाला. हा अव्यंग असूनही दासी पुत्र असल्यामुळे सूतपुत्र
ठरला व राजकुमार पदाला मुकला.
विदुर जन्माची कथा इथे पूर्ण होत नाही. ती पूर्ण जाणून घेण्याकरिता मांडव्य
किंवा अणि-मांडव्य ऋषींची कथा समजून घ्यावी लागेल. मांडव्य ऋषींना गैरसमजातून
कोण्या राजाने चोरीच्या आरोपात दोषी ठरवून सुळावर चढवले पण मांडव्य ऋषींना अनेक
दिवस सुळावर ठेऊन देखील मृत्यू आला नाही. राजाला आपली चूक कळली व त्याने ऋषींची
क्षमा मागितली. ऋषींनीही राजाला क्षमा केली. मात्र झाल्या छळाचा जाब त्यांनी
यमधर्माला (यमाला) विचारला. यमधर्माने दिलेल्या उत्तराने ऋषींचे समाधान झाले नाही
आणि त्यांनी यमधर्माला इहलोकी जन्म घेशील व तोही हीन कुळात असा शाप दिला. या
शापाची परिणीती म्हणजेच विदुराचा जन्म. यमधर्माने परीश्रमीच्या पोटी जन्म घेतल्यामुळे अर्थातच विदुर धर्मात्मा, धर्मज्ञ, नीतीज्ञ होता.
महाभारतात ज्या व्यक्तिरेखेत वागण्यात व बोलण्यात तफावत, दोष आढळत नाही अशी
व्यक्तिरेखा म्हणजे विदुर असे म्हणायला हरकत नाही.
विदुर आणि पांडवांची आई कुंती ह्यांच्या नात्याची वीण काही वेगळीच आहे.
कुरुपुत्र लहान असतांना, कौरव, पांडवांना नेहमीच पाण्यात बघत असत. त्यातूनही
भीमावर त्यांचा जास्तच राग होता. अर्थात भीमाची दांडगाई हे देखील त्याला कारण असू
शकेल. राग इतका होता की भीमाला ठार मारण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यातला
विषप्रयोग सगळ्यात गंभीर होता. विषप्रयोगानंतर मृच्छित भीमाला जखडून नदीच्या डोहात
फेकून देणे हा तर कळस होता. कुंतीला काळजी पोटी धृतराष्ट्र किंवा भीष्मांकडे जाणे
सहज शक्य होते. ते अधिक योग्यही ठरले असते. त्या दोघांनी अधिकार वाणीने लहान दुर्योधनाला
कदाचित खडसावले असते. पण तसे न करता कुंती
विदुराकडे, कौरवांच्या काकांकडे गेली. विदुराला तसे बघायला गेले तर कोणतेच अधिकार
नव्हते व त्याच्या कडे उपायही नव्हता. पण कुंतीचा विदुरावर इतका विश्वास होता की विदुराने
भीम किंबहुना पांडव कसे ईश्वरी अवतार आहेत आणि त्यांना अपाय करण्याची कोणाची प्राज्ञा
नाही अशी कुंतीची समजूत काढल्यावर ती निश्चिंत झाली. महाभारतातील युद्धादरम्यान कुंती
विदुराकडेच राहिली होती. त्या कठीण प्रसंगात विदुराने तिला आधार दिला.
महायुद्ध संपून युधिष्ठीर सिंहासनावर स्थानापन्न झाल्यावर पांडवांचे राज्य
सुरु झाले. कालांतराने कौरव जेष्ठांनी (धृतराष्ट व गांधारी) वानप्रस्थाश्रमात जावे
असे ठरवले. त्या दृष्टिहीन दामपत्याची काळजी घेण्याकरिता विदुर त्यांच्याबरोबर
वनात निघाला. कुंती खरंतर राजमाता, कुंतीची सर्व
स्वप्ने, आकांक्षा पूर्ण झाल्या होत्या आणि खडतर आयुष्यानंतर प्रथमच उपभोग घ्यायची
संधी कुंतीला मिळाली होती. पण अशावेळी तिने धृतराष्ट्र व विदुराबरोबर
वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणं प्रशस्त मानलं.
युधिष्ठीर हा कुंतीने आवाहन करून झालेला यमधर्माचा मुलगा. युधिष्ठीर आणि विदुर
यांच्यात कमालीचं साम्य पदोपदी जाणवतं. दोघंही नेहमीच कटाक्षाने धर्माचरण करीत.
विदुराला सगळेच पांडव प्रिय होते पण त्यातल्यात्यात विदुराचा ओढा युधिष्ठीराकडे
सर्वात अधिक होता. लाक्षागृहासारख्या बाक्या प्रसंगात आणि थोड्याशा चुकीने देखील
प्राण जाण्याची शक्यता असतांनाही भीमार्जुनांना सोडून त्याने युधिष्ठीरावर विश्वास
दाखवला आणि त्याच्या योजनेनुसार युधिष्ठीर सर्व पांडवांचे आपल्या आईसमवेत प्राण
वाचविण्यात यशस्वी ठरला. विदुराचा विश्वास त्याने सार्थ ठरवला होता.
महाभारत युद्धानंतर, युधिष्ठीर सम्राटपदी विराजमान झाल्यावर, विदुराने, राजा
कसा असावा याचा उपदेश युधिष्ठीराला केला. महायुध्द संपल्यावर भीष्म शरपंजरी
उत्तरायण सुरु होण्याची वाट पहात होते तेंव्हा विदुराने युधिष्ठीराला भीष्मांकडे
जाऊन राजनीती म्हणजे काय? राज धर्म म्हणजे काय? धर्माचे पालन म्हणजे काय? याचे मार्गदर्शन घ्यायला सांगितले. थोडक्यात विदुराने युधिष्ठीराला एक आदर्श
राजा बनविण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला.
विदुर, वर उल्लेखील्याप्रमाणे स्वतः यमधर्माचा, मांडव्य ऋषींची शापवाणी खरी
ठरविण्याकरिता परीश्रामिच्या पोटी जन्माला आलेला अवतार होता. वानप्रस्थाश्रमात तप
केल्यानंतर विदुराने देह ठेवला आणि महाभारतात असा उल्लेख आहे की विदुराच्या
देहातून एक तेजस्वी ज्योत बाहेर पडली आणि ती युधिष्ठीराच्या शरीरात प्रविष्ट
झाली.
वरील सर्व गोष्टींवरून महाभारताच्या काही अभ्यासकांनी युधिष्ठीर हा विदुराचा
नियोगाने झालेला कुंती पुत्र होता असे मत मांडले आहे. कुंतीला प्राप्त वरामुळे हे सहज
शक्यही होते. हा मतप्रवाह चूक की बरोबर ह्यावर भाष्य करण्या इतका माझा अधिकारही
नाही आणि अभ्यासही नाही. पण एक शंका मनात डोकावते की विदुराच्या सूतपुत्र असण्याचा
आणि पितापुत्राच्या ह्या नात्याचा महाभारतात नसलेल्या उल्लेखाचा काही संबध असावा
कां? पण तसेही वाटत नाही. कर्णाचा अपवाद (कुंती जरी
क्षत्रिय असली तरी ते ज्ञात नसल्यामुळे लहानाचा मोठा ज्या आईने केला तिच्या मागून
तो सूतपुत्र ठरला) वगळता महाभारतातील सर्व पात्रांचे क्षत्रिय, ब्राह्मण अथवा सूत
ठरणे सर्वस्वी त्यांच्या आईवर अवलंबून होते. आई जर दासी असेल आणि पिता भलेही
क्षत्रिय राजा (दासी पुत्र युयुत्सु हा धृतराष्ट्राचा पुत्र) असेल, किंवा वेद
व्यासांसारखा ब्राह्मण असेल (पंडू व धृतराष्ट्र क्षत्रिय ठरले कारण अंबिका आणि
अंबालिका ह्या क्षत्रिय कन्या होत्या आणि परिश्रमीचा विदुर सूत ठरला). महापराक्रमी
पांडवांच्या इतर पित्यांशी विदुराची तुलना होण्याऐवजी तो दुर्लक्षीतच राहिला असे
वाटते.
महाभारतात वैचारिक अथवा तत्वज्ञानाची चर्चा, उपदेश वा त्यावर अधिकाराने केलेलं भाष्य बहुतांशी दोनच ठिकाणी आढळते. एक श्रीकृष्णाने
अर्जुनाला सांगितलेली ७०० श्लोकांची गीता आणि विदुराने धृतराष्ट्राला सांगितलेली
५८८ श्लोकांची विदुर नीती. श्रीकृष्णाने आणि विदुराने आपापले तत्वज्ञान
महाभारतातील महायुद्धाच्या अगोदर सांगितले. दोघांचाही उद्देश्य अधर्माचा शेवट करून
धर्माची स्थापना करणे, झालेला अन्याय दूर करून
न्याय मिळवून देणे, जे योग्य आहे ते धर्मसंमत म्हणून ते घडवून आणणे असाच होता.
विदुराने अधर्माचे मूळ म्हणून धृतराष्ट्राकडे बघितले तर श्रीकृष्णाने अधर्माचा
समूळ नायनाट करणारा म्हणून अर्जुनाकडे बघितले. श्रीकृष्णाने अर्जुनाला यूद्धाला प्रवृत्त
करण्याकरिता गीता सांगितली तर विदुराने धृतराष्ट्राला युद्धापासून परावृत्त
करण्याकरिता नीतीमत्तेचे बोधामृत देण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णाने युद्धाचा
मार्ग निवडण्यापूर्वी मुत्सद्देगिरी, राजकारण, शिष्टाई करून पहिले होते. धृतराष्ट्राला पर्यायाने
दुर्योधनाला युद्धापासून परावृत्त करण्यात अपयश आल्यावर विदुराला दुसऱ्या
कुठल्याही मार्गाचा अवलंब करताच आला नाही.
धर्माच्या स्थापनेचा मान अर्थातच श्रीकृष्णाकडेच गेला. हे अपयश खचितच विदुराने
सांगितलेल्या तत्वज्ञानाच नाही किंवा त्याचा दर्जा कमी ठरतो असाही त्याचा अर्थ होत
नाही. श्रीकृष्णाचे काम तसं बघायला गेलं तर सुकर होते. अन्याय झालेल्यालाच
अन्यायाविरुद्ध पेटवायचे होते युद्धाकरिता उभे करायचे होते. अर्जुनाचा युद्धाचा
सरावही झाला होता, मानसिक तयारीही, आयत्यावेळी त्याने कच खाल्ली म्हणून श्रीकृष्णाला
गीता सांगावी लागली. इतके असूनही सांगितलेल्या तत्वज्ञानाची खोली श्रीकृष्णाला
साजेशीच आहे. या उलट विदुराला मात्र अन्याय करणाऱ्यालाच तो कसा अयोग्य आहे हे
पटवून द्यायचे होते आणि नुसते पटवून द्यायचे नाही तर कृतीत देखील उतरले पाहिजे आणि
ते सुद्धा कोणाला? तर अशा बापाला जो आजवर दुर्योधनाची कर्तुते नजरे आड करीत जणु
त्याला खतपाणी घालीत होता आणि आजवर केलेल्या त्या सर्व अन्यायाचा परिपाक म्हणूनच भारतीय
महायुद्ध होत होते. बिकट काम होते. झारीने वाळवंट भिजविण्यागत प्रयत्न होते विदुराचे.
ह्या इतक्या सुस्पष्ट अशक्य परिस्थितही अहिंसक मार्गाने गोष्टी सोडविण्याचा
प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या विदुराचा म्हणावा तितका आदर झाला नाही असेच म्हणावेसे
वाटते.
विदुराचे ज्ञान, नितीमत्ता, नात्याचा अधिकार आणि धृतराष्ट्राच्या दरबारी असलेलं
मंत्रिपद, ह्या कशाचाही उपयोग द्रौपदी वस्त्रहरणाच्या
प्रसंगी तो प्रसंग टाळण्याकरिता झाला नाही. शेवटी त्यालाही मान खाली घालावी लागली.
लाक्षागृहाच्या प्रसंगी ती गोष्ट टाळू न शकल्यामुळे एखादे कारस्थान करावे अशा
प्रकारे त्याला पांडवाना गुप्तपणे मदत करावी लागली. श्रीकृष्ण शिष्टाई करता आला
तेव्हा तो विदुराकडे उतरला. विदुर उघडपणे पांडवांच्या बाजुने आहे असे दिसावे हा कृष्ण नीतीचा भाग असेलही कदाचित पण विदुरा
इतका तटस्थ आणि विश्वासू युद्ध पूर्व काळात दुसरा कोणीही नव्हता हे ही तितकेच खरे.
ज्या मिंधेपणाच्या कारणामुळे भीष्म, द्रोण
ह्यासारखे ऋषितुल्य महारथी अन्यायाच्या बाजूने सत्याची पूर्ण जाणीव असतांना
युद्धाला उभे रहिले, त्याच परिस्थितीत असलेल्या विदुराची तटस्थता आणि अन्यायाच्या
विरोधातील ठाम भूमिका ही खरोखर लक्षणीय आहे. स्वतःच्या नीतीमुल्यावर असलेल्या
श्रद्धेचे ते द्योतक आहे असे वाटते.
विदुर ह्या व्यक्तिरेखेच्या पदरात त्याच्या गुणविशेषांच्या तोलामोलाचा कार्यभाग पडायला हवा होता असे वाटते. विदुर त्या दृष्टीने महाभारतात उपेक्षित राहील्यासारखा वाटतो.
2 comments:
उपेक्षा इतकी टोकाची कि विदूरावर फारसं लिहिलंही गेलं नाही. असं काही वाचायला मिळालं कि त्याला थोडा तरी न्याय मिळाल्यासारखं वाटतं!
तुमचा महाभारताचा अभ्यास खूपच गाढा आहे. तुम्ही जे विदुरांच्या बद्दल विश्लेषण केले आहे ते आमच्या सारख्या खूप कमी वाचन असलेल्याना सुद्धा कळते आणि आवडते. तुम्ही मागे सुद्धा महाभरतावर जे लेख लिहिले होते ते ही छान होते.
असेच लिहीत रहा, आमच्या सरखांचे ज्ञानही वाढते आणि मनोरंजनही होते.
Post a Comment