Tuesday, 30 May 2023

अर्थ हरवलेले शब्द... ४

अर्थ हरवलेले शब्द ह्या मालिकेतील हा चौथा ब्लॉग. पहिल्या तीन ब्लॉग मध्ये आजही वापरले जाणारे पण आजच्या जीवन शैलीत अर्थ हरवलेल्या शब्दांचा उहापोह होता. ह्या ब्लॉग मध्ये मी दोन शब्दांविषयी लिहिणार आहे. त्या शब्दांच्या अर्थासोबतच ते शब्दही हरवले आहेत असे वाटते. गुगल शोधक वापरून जर एखाद्या शब्दाची व्याख्या शोधली तर शोधाच्या परिणामांच्या शेवटी, शब्द निर्माण झाल्यापासून त्या शब्दाचा साहित्यात किती वापर झाला याची टक्केवारी येते. तशी टक्केवारी मिळण्याची सुविधा जर कुठल्या मराठी शब्दकोशात किंवा तत्सम कुठल्याही साधनाद्वारे उपलब्ध असेल तर आपल्या आजच्या शब्दांचा साहित्यातील उपयोगाचा उतरता आलेख पाहायला मिळेल. इतकंच नव्हे तर बोली भाषेतील ह्या शब्दांचा वापर देखील कदाचित आता होत नसावा आणि असलाच तर अगदी नगण्य.

पाहिला शब्द आपल्या लहानपणी आपण बहुतेकांनी खुपदा ऐकला असावा, निदान आमच्या घरी तरी माझ्या आईच्या तोंडी मी हा शब्द अनेक वेळा ऐकला आहे. लहानपणी जवळजवळ बहुतेक जेवणानंतर असं म्हटलं तरी चालेल, “अरे अंचवलास तरी कां? की तसाच गेलास खेळायला?” खेळ अर्धवट टाकून जेवायला यायला लागल्यामुळे जेवण झाल्या झाल्या खेळायला पळाल्यावर आईची आतून हाक येत असे. अगदी मोठे झाल्यावर सुद्धा “आंचवून तरी या, आणि मग काय ते गप्पा मारीत बसा. हात वाळले देखील” जेवणाच्या ताटावर आम्हा भावंडांच्या गप्पा रंगल्या की आईची तक्रार.

आंचवणे म्हणजे, चूळ भरून तोंड, हात धुणे. सकाळी झोपून उठल्यावर, बाहेरून आल्यावर देखील आपण हात, तोंड धुतो, ते म्हणजे आंचवणे कां? नाही! जेवण, खाणं करून झाल्यावर चूळ भरून तोंड आणि खरकटे  हात धुणे याला आंचवणे म्हणातात. आहे की नाही, आपली मराठी भाषा सुंदर. एका विविक्षित वेळेला करायच्या त्याच क्रियेला शब्द मात्र वेगळा!!

माझ्या मुलीने लहान असतांना आजीच्या तोंडून आंचवणे हा शब्द ऐकला आणि पटकन विचारलं “आजी, काय म्हणालीस? पुन्हा म्हण!” तिने आमच्या तोंडून हा शब्द तो पर्यंत बहुदा ऐकला नसावा. आजीने पुन्हा तोच शब्द वापरल्यावर तिच्या लहानग्या चेहेऱ्यावर प्रश्न चिन्ह आले “म्हणजे काय?” आजीने अर्थ सांगितल्यावर स्वारी उष्टे हात धुवायला जागेवरून हलली.

असे शब्द माझ्या दृष्टीने एका कालखंडाचे द्योतक आहे असे वाटते. एकत्र कुटुंब, कुटुंबात आजी आजोबा असण्याच्या, एकत्र जेवण्याचा कालखंड. आजच्या जीवन शैलीत जागा लहान झाल्या, एकत्र कुटुंब पद्धती जाऊन विभक्त कुटुंब पद्धती स्थिरावली. ताट, वाट्या आणि भांडी जाऊन त्या जागी प्लेटस, काटे आणि चमचे आले. हात पुसायचे कागद आणि हस्तप्रक्षालन पात्रे आली (finger bowls). हाताने खाल्ल्यावर हात धुवून, खळखळून चूळ भरणेच उरले नाही तर त्याला उद्देशून असलेला शब्द तरी कसा राहणार?

दुसरा शब्द किती लोकांनी ऐकला असेल ह्या बद्दल मला जरा शंकाच आहे. मी माझ्या घरात, शेजारी पाजारी हा शब्द लहानपणी ऐकला आहे. त्याच वयात साने गुरुजींच्या गोष्टीतही हा शब्द वाचल्याचे आठवते. मी गोव्यात असतांना कोकणीत देखील आजचा शब्द त्याच अर्थाने वापरलेला ऐकला आहे. ‘अळसूद जाणे’ म्हणजे पाणी पितांना ठसका लागणे. खेळ अर्धवट टाकून धावत पळत घरात शिरून उभ्याने फुलपात्र (हा ही शब्द अर्थ हरवलेल्या शब्दात जमा झाला असल्याची शक्यता नाकारता येत नाही) तोंडाला न लावता घटाघटा पाणी पितांना ठसका लागल्यावर पाठीवर थोपटत आई म्हणत असे “बघ गेल ना अळसूद, अरे बसून प्यावं पाणी, बघ वर बघ, सासू कांदे सोलतेय” अळसूद आणि सासूने कांदे सोलण्याचं काय नात  आहे कोण जाणे आणि मुळात त्या वयात सासूचा उल्लेखच अनाकलनीय. पण आम्ही वर बघायचो, ठसका थांबायचा आणि आम्ही पुनश्च खेळण्याकरीता बाहेर पळत असू. जेवतांना, बसून बोलत असतांना, जर पाणी पितांना ठसका लागला तर वडीलधाऱ्यांपैकी कोणीतरी म्हणत “अळसूद गेलं, आत्ता कोण आठवण काढतय? सुमी असेल बहुतेक. जेवतांना एकमेकांच्या खोड्या काढायचात. आता सासरी गेल्यावर आठवण काढतेय”. सुमन सगळ्यात थोरली बहिण.   

आजकालच्या चौकोनी कुटुंबात, शिस्तीत वाढणाऱ्या आणि पूर्ण वेळ शाळा, जास्तीचे वर्ग (कोचिंग क्लासेस), कार्य शाळा ह्यात व्यग्र असलेल्या मुलांना खेळायलाच वेळ नसतो, धावत पळत पाणी पिण्याची गोष्ट दूरच राहिली. आपली कोणी आठवण काढली तर आपल्याला पाणी पितांना ठसका लागतो हे तर आता कोणाला माहितही नसेल. विनोदाचा भाग सोडा पण “अळसूद” ह्या शब्दाचा वापर आता होत नसल्यात जमा आहे. 

माझी बदलेल्या जीवन शैली बद्दल तक्रार आहे असे नाही, काळानुसार गोष्टी बदलत रहाणार हे सत्य आहे. जुने जाऊद्या मरणालागुनी.. असे म्हणतांना नेमके काय जाऊदे याचा विचार व्हावा असे वाटते. झऱ्याच्या पाण्याला खळखळ, अवखळपणा नसेल तर त्याचे सौंदर्य खचितच कमी होईल, नव्हे त्याला झरा म्हणताच येणार नाही. भाषेचे असेच काहीसे आहें असे वाटते. या आणि अशा अनेक शब्दांनी मराठी भाषेचे सौंदर्य नक्कीच वाढते. अन्यथा ती गुळगुळीत, सपाट होत जाईल आहे असे वाटते.    

Sunday, 21 May 2023

सेल्फी (आत्मचित्र)


पौराणिक ग्रीक कथेत नार्सिसस हा सेफिससचा लिऱ्हायोपीपासून झालेला अतिशय देखणा पुत्र होता. ज्याच्या सौंदर्याचे गुणगान सगळीकडे गायले जात असे, कदाचित त्याचाच परिणाम असेल पण नार्सिससने कोणाच्याही प्रेम याचनेला कधीही प्रतिसाद दिला नव्हता. सरतेशेवटी एका तळ्याकाठी स्वतःचे प्रतिबिंब पाण्यात बघून तो त्या प्रतिमेच्या, स्वतःच्याच प्रेमात पडला. या अप्राप्य प्रेमापायी त्याची अन्नपाण्यावरची वासना उडाली आणि तळ्याकाठी नार्सिसस जणू खिळून राहिला. काही काळाने अन्नपाण्यावाचून त्याच जागी नार्सिससचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूच्या जागी एक फुलझाड फुलले, ज्याची फुले तळ्याच्या पाण्यात जणू डोकावून आपली प्रतिमा न्याहाळतात. त्या झाडाला नार्सिससचे झाड आणि फुलांना नार्सिससची फुले हेच नाव पडले.  आत्यंतिक आत्मकेंद्रित, सदैव आत्मप्रेमात, स्वतःच्या कौतुकात रमणाऱ्या, स्वतःला अवास्तव महत्व देणाऱ्या व्यक्तींना नार्सिसिस्ट नाव पडले आणि ह्या मनोवृत्तीला नार्सिसिसम.

नार्सिससची कथा आठवण्याचे कारण आज चहुकडे दिसणार सेल्फीचे (आत्मचित्र, स्वछबी) वेड. लहान नाही, थोर नाही जो बघावा तो, जिथे बघाल तिथे, हातातील किंवा सेल्फी स्टिकवर (स्वछबी दांडी) असलेला भ्रमणध्वनी वेवेगळ्या कोनातून फिरवत आत्मचित्र घेण्यात निमग्न असतात. याचा इतका अतिरेक झालाय, काय सांगू काहीजण / जणी ह्या आत्मचित्र काढण्याच्या नादात, भिंतीवर खऱ्याखुऱ्या (कागदी) फोटोत जाऊन बसले आहेत. थंड हवेच्या ठिकाणी कड्याच्या टोकावरून दिसणाऱ्या देखाव्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःची छबी उतरविण्याच्या नादात कड्यावरून पडून घडलेल्या मृत्युच्या घटना काही कमी नाहीत. समुद्रकिनाऱ्यावर अशाच नादात बुडून मेल्याच्या बातम्या सर्वानीच वाचल्या असतील. पूर्वी दोघांचा फोटो काढायचा असेल तर तिसऱ्याची गरज लागायची, स्वतःची छबी काढायची असेल तर दुसरा असल्याशिवाय ते शक्यच नव्हते. पण आता दूरध्वनीच्या ह्या भ्रमणध्वनी अवतारात ही गरज जवळजवळ संपली. बाकी कशात असेल किंवा नसेल, स्वतःची छबी उतरविण्यात मात्र आपण आत्मनिर्भर झालो आहोत खरे.

नार्सिसस निदादिसायला देखणा होता, लाखात एक होता. स्वतःच्या देखण्या रूपाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. त्याला दुसऱ्या कोणाही कडून आपल्या रुपाची ना पोच हवी होती ना कोणाकडून कौतुकाची, स्तुतीची अपेक्षा होती. तो बिचारा स्वतःतच मश्गुल होता. मात्र आजचे हे नार्सिसीस? ही मंडळी तोंडाचे चंबु करून, चित्रविचित्र कपडे घालून, हाताने वेडेविंद्रे अविर्भाव करीत स्वतःची छबी उतरवताना दिसतात. प्रत्यक्षाहून प्रतिमा ह्यांना उत्कट वाटते की काय कोण जाणे. कोणत्या कोनातून त्यांना स्वतःला ते चांगले वाटतात, हे त्यांना स्वतःला किंवा कदाचित परमेश्वरलाच ठाऊक. बर एव्हढे कष्ट करून फोटो काढलेत तर काढलेत, बसून स्वतः बघावेत, आपल्या रूपड्याचा काय घ्यायचा तो आनंद घ्यावा, तर ते नाही. ह्यातले बहुतांश फोटो सामाजिक माध्यमांवर टाकून लोकांचे लाईक्स मिळवण्यात, मोजण्यात या सेल्फिवेड्यांना जास्त आनंद मिळतो असे वाटते. तुम्हाला खरं नाही वाटणार, पण लाईक न केल्यामुळे मित्र, मैत्रिणीत भांडण झालेली मी पाहिली आहेत. 

भ्रमणध्वनीच्या ह्या सुविधेचा चांगला उपयोग होताना देखील पाहिला मिळतो. जसं कौटुंबिक सोहळ्यात हजर असलेल्या सगळ्यांची छबी छायाचित्रकार नसतानाही काढणे. कुटुंबातील सर्वात उंच आणि बहुदा तरुण (आत्मचित्र काढण्याच्या कलेत खास प्राविण्य असलेला – सामाजिक माध्यमातील त्याच्या मुशाफिरीवरून हे बहुदा ठरत असावं) व्यक्ती कमीतकमी तीन चार छायाचित्रं काढून ही औचारीकता पूर्ण करून तात्काळ ते फोटो सामाजमाध्यमावरून छायाचित्रातील सर्व कलाकारांना पाठवतो. शेवटी भ्रमणध्वनी हे साधन आहे. त्याचा वापर जो तो आपल्या अकलेनुसार करतो त्याला कोण काय करणार.

मला आठवतंय, आम्ही लहान असतांना गरजेपेक्षा जास्त वेळ आरशासमोर उभे दिसलो की घरातील वडीलधारी मंडळी हटकत असतं, “आरशासमोर इतका वेळ काय करतो आहेस? आरशासमोर उभा राहिलास म्हणून बसके नाक अपरे होणारे आहे, की रंग उजळणार आहे?” नाहीतर “पुढचा जन्म माकडाचा येईल हो, असेच बघत बसलात तर”. माकडं आरशात बघताना कधी पाहिली नाहीत पण स्वतःची प्रतिमा न्याहाळत बसणे ह्यात काहीतरी चुक आहे हे बरीक लक्षात आलं.

अंतमुर्ख होऊन आत्मज्ञान, आत्मभान मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आत्मकेंद्रित, आत्मसंतुष्ट होऊन आत्मप्रेमात पडण्याचा मार्ग ही मंडळी कां निवडतात ह्याचा उलगडा होत नाही. 

Saturday, 13 May 2023

मातृदिन

 

लेखाच्या सुरुवातीलाच माझी भूमिका स्पष्ट करतो. लेखाचा मातृत्व, मातृत्वाची थोरवी, महानता, आई वा त्यासंबंधातील कोणत्याही भावनांचा अनादर करण्याचा उद्देश नाही. अनाहूतपणे कोणाच्या भावना दुखावल्या तर त्या बद्दल अगोदरच दिलगिरी व्यक्त करतो.

मातृदिन ही संकल्पना तसं बघायला गेलं तर, पाश्चिमात्यांकडून आलेली आहे. आपल्याकडे मातृदेव भव, पितृदेव भव ही भावना आहे. माता, पिता हे सदा वंदनीय आहेत आणि एखाद्या दिवशी मुद्दाम त्याची आठवण करून द्यायची, तसं बघायला गेलं तर गरज नाही. मातृदिनामागची जी कृतज्ञतेची भावना आहे ती खरोखर प्रशंसनीय आहे आणि ह्या निमित्ताने जर कोणा कृतघ्नास, जर मातेने जे दिले त्या बद्दल विस्मृती झाली असेल, तर कदाचित ह्या दिनी तरी त्याचे त्यास स्मरण होईल. पाश्चिमात्यांकडून ‘व्यक्त होणे’ हे खरंच शिकण्यासारखे आहे. मातृदिनी कृतज्ञताच आभाराच्या रूपाने व्यक्त व्हावी.

मातृत्व हे एखाद्या कडक व्रतासारखं आहे, आणि हे व्रत समजून उमजून अंगीकारलं तरच ते फलदायी ठरते. प्रसूती वेदनांपासून किंबहुना त्यापूर्वीच सुरु होणारं हे मातृत्व म्हणजे त्याग, मातृत्व म्हणजे निर्व्याज प्रेम, मातृत्व म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवता देत राहणं, माझं आयुष्य माझ्या बाळाला दे, असं परमेश्वराला साकड घालणारी ती आई. आई फक्त आणि फक्त देतच रहाते, आयुष्यभर तिला गृहीत धरले जाते, किंबहुना तिला गृहीत धरणे हा तिच्या मुलांचाच नव्हे तर समाजाचाही हक्क झाला आहे. वृद्धापकाळात, ती स्वतःचे सर्वस्व देऊन बसल्यावर मुले काळजी घेतील ही अपेक्षा देखील आजकाल अमान्य दिसते.   

स्त्री ही क्षणाची पत्नी, प्रिया आणि अनंतकाळची माता असते हे म्हणत असतांना ती स्त्री कधी असते? ती ‘स्वतः’ कधी असते? अनंत काळची माता म्हणजे मुलांच्या (ती कोणत्याही वयाची असोत) संगोपनाची, मुलांच्या अडल्या-नाडल्याला उपयोगी पडण्याची कायम स्वरूपी जबाबदारी तिच्यावर टाकली आहे कां? पुरुषांना कधी क्षणाचा पती, प्रियकर आणि अनंत काळचा पिता म्हणल्याच कुणी ऐकलं आहे कां?

मातृत्व! एखाद्या गोष्टीचे, संकल्पनेचे एवढे उद्दात्तीकरण केलेले दुसरे उदाहरण सापडणार नाही. क्षणभर ह्या उद्दत्तीकरणापासून जरा दूर होऊन मातृत्वाकडे बघितलं तर काय दिसतं?

किती मुली स्वेच्छेने माता होतात? किती मुलींवर, कितीदा मातृत्व लादले जाते? अमेरिकेत (प्रगत राष्ट्र?) तर आता स्त्रियांना त्यांचा निवडीचा तर सोडाच, पण मातृत्व नाकारण्याच्या अधिकारपासून देखील वंचित व्हावं लागेल असं दिसतंय. किती मुलामुलींना मातापिता होणं म्हणजे काय हे खरोखर समजतं? त्यातील दोघांच्या जबाबदारीची जाणीव ठेऊन पालक बनण्याचा निर्णय किती जण घेतात?. पालकत्व ही एक पूर्णवेळ दोन्ही पालकांनी एकत्र पार पाडण्याची जबाबदारी आहे हे समजण्याएव्हढा समाज प्रगल्भ आहे कां?  आजकाल सुशिक्षित समाजांत ही टक्केवारी कदाचित जास्त असेल, पण भारतातील बहुसंख्यांकांचा विचार केला तर दृश्य खूप वेगळ दिसेल.

वरील गोष्टी जर सत्य म्हणून क्षणभर मान्य केल्या, तर हे उद्दात्तीकरण नेमक कां झालं आणि कुणी केलं?

ह्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीच, केवळ कारणीभूत आहे कां? की नि:संतान स्त्रीपेक्षा (ज्याला कदाचित वा बहुतांश वेळा ती कारणीभूत नसते), मातेला (पुत्रवती असेल तर अधिकच) समाजात जास्त मान मिळतो म्हणून पुरुषप्रधान संस्कृती इतक्याच स्त्रिया देखील, वा संपूर्ण समाज त्याला जबाबदार आहे? नि:संतान म्हणून बायकाच बायकांना हिणवताना दिसतात.

एखाद्या व्यक्तीला एकदा का देवघरात नेऊन बसवले की त्यांच्या मार्गावरून चालण्याची सामान्यांची जबाबदारी संपते. तसेच काहीसे ह्या उद्दात्तीकरणाचे आहे. वर्षातून एक दिवस मातृदिन साजरा केला, जातायेता मातृत्वाचा उदोउदो केला, की आपली माता सोडून (त्यालाही काही अपवाद आहेत) बाकी स्त्रिया ह्या कोणाच्या न कोणाच्या तरी माता असु शकतात, होऊ शकतात आणि मुळात त्या एक स्वतंत्र व्यक्ती आहेत आणि त्यानाही सन्मानाने वागवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे ह्याचा सोयीस्कर विसर पडला तरी चालतो.

ह्या आणि तत्सम सर्व संकल्पनामध्ये ‘माता’ ही एक व्यक्ती आहे, स्त्री आहे हे कुठे तरी हरवल्यासारखे, जाणीवपूर्वक विसरल्यासारखे वाटते. मातृत्वाचा खरोखर आदर करायचा असेल तर प्रथम आदर स्त्रीत्वाचा, स्त्रीचा करता यावयास हवा. कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ती एक दिवस न करता, सदोदित कृतज्ञ (being grateful) असणे हे जास्त महत्वाचे आहे.

ह्या मातृदिनी जर आपण स्त्रीत्वाचा आदर करण्यचा संकल्प सोडला तर मातृदिन खऱ्या अर्थाने साजरा होईल असे वाटते.