“वास येतोय कां? बघ रे”, “नाही बाकी काहीच लक्षण नव्हती, न ताप न खोकला पण वास येत नाहीसा झाला होता”, “मोगऱ्याच्या गजऱ्याचा वास नाही आला? लागलीच चेक करून घ्या हों” असे कित्येक संवाद आजकाल नित्याचेच झाले आहेत. “वासा” भोवती एक वलय निर्माण झाले आहे. कोणत्याशा कपड्यांच्या पावडरीच्या जाहिरातीने “डाग चांगले असतात” हे वाक्य लोकप्रिय केलं आहे. त्याच चालीवर “दुर्गंधी चांगली असते” अशी म्हणायची वेळ आली आहे. वास कोणता आहे हे महत्वाचं नाही. तो येतोय ना?? हे महत्वाचं. खरंतर मराठीत वास म्हणजे सुवास; कारण दुर्गंधीला घाण असा “सुगंध” (सुस्पष्टच्या धरतीवर) शब्द आहे.
असो, आजच्या
तात्कालिक परिस्थितीमुळे एक गोष्ट माझ्या बाबतीत मात्र नक्की झाली, ती म्हणजे वास
येणे (घेणें म्हटले की हेतुपुरस्कर केलेली क्रिया) या अत्यंत स्वाभाविक घडणाऱ्या
क्रियेची जाणीव झाली, त्या क्रियेबद्दल जागरुकता आली. खूपवेळा आपण बघण्याची क्रिया
करीत असतो पण आपल्याला दिसतच असें नाही हा अनुभव प्रत्येकालाच केव्हा न केव्हातरी आला
असेल. चक्षु पटलावर उमटलेली प्रतिमा मेंदू जो पर्यंत वाचीत नाही तो पर्यंत
दिसण्याची वा बघण्याची क्रिया पूर्ण होत नाही. माहितीचं रुपांतर ज्ञानात होत नाही.
तद्वतच नाकात शिरणाऱ्या हवे बरोबर गंधकण आत जातच असतात पण त्याचं विश्लेषण मेंदूने
करे पर्यंत, नाकाला रुमाल लावायचा, “वा” म्हणायचं, की नुसताच वास घेत राहायचं, हे
ठरत नाही. लोकलने नित्य प्रवास
करणाऱ्यांना वांद्र्याची खाडी गेलेली कळतं देखील नाही.
थोडक्यात काय?
ह्या नवीन जागरूकतेमुळे आपल्याभोवती एक भले थोरले गंध विश्व आहे ह्याची प्रकर्षाने
जाणीव झाली. सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत येणाऱ्या प्रत्येक गंधाची (सुवास वा
दुर्गंधी) मेंदूकडून पावती मिळायला लागली. सकाळी टूथपेस्ट, ब्रश काढण्यासाठी अगदी
झोपेंत जरी बेसिन वरील कपाट उघडलं तरी आता ओळखता येणारा शेविंग क्रीम आणि
आफ्टरशेव्हचा संमिश्र वास, चहाच्या पाण्यात किसून आलं टाकल्यावर येणारा वास, त्या आधणात चहाची पत्ती टाकल्यावरचा वास, चहा गॅस वरून
उतरवून संथावल्यावर गाळण्यापुर्वी येणारा वास, ताजं दूध
तापल्यावर येणारा वास (शिळ दूध तापल्यावर वास वेगळा येतो) आणि ते दूध चहात
घातल्यावर चहाचा येणारा वास. प्रत्येक वास वेगळा आहे आणि तो आता मला ओळखता येतो. खोटं
वाटेल तुम्हाला, पण भाजीत मीठ आहे की नाही हे मला आजकाल वासावरून कळते. तुम्ही
प्रयत्न करून बघा. हे वास पूर्वीही होतेच, मला येत
नव्हते इतकंच. सकाळी फिरायला बाहेर पडल्यावर झुळूकेबरोबर स्वागत करणारा
प्राजक्ताचा मंद पवित्र वास. नुकत्याच येऊन गेलेल्या वादळी पावसात तर येणारा पाऊस,
तो येतोय याची सुवार्ता घेऊन पोहोचलेल्या मृदगंधाने मला अगोदरच दिली होती. जणू “तप्त
धरेची दाद मिळाली नाकाला आधी, मग ऐकली कानांनी, नंतर डोळ्यांनी पाहिली”! ओल्या गवताचा वास वेगळा, ओल्या पालापाचोळ्याचा वास वेगळा. एक जिवंत, एक गत. अगदी
नव्याने सापडलेला वास म्हणजे वाहत्या स्वच्छ पाण्याचा वास, हो तो काहीसा दुरून
देखील येतो. अवर्णनीय, कारण तो कशासारखा नाही, ज्याने त्याने त्याचा घेतला पाहिजे
(अनुभूतीला पर्याय नाही), त्या वासाला अजून नाव सापडलेलं नाही, नसेलच कदाचित.
मत्स्यगंधा, योजनगंधा या खऱ्या असाव्यात याची आता खात्री
पटली. एक नवीन विश्वच जणू हळुहळु विदित होतंय असं वाटतं.
ध्यानधारणेच्या
संबधात कुठेतरी वाचलेलं आठवलं “श्वासावर लक्ष केंद्रित करा, श्वास आत घेताना जागरूक रहा, की तुम्ही श्वास आत घेताय.
सोडताना जाणीव असू द्या की तुम्ही श्वास सोडताय, आणि कृतज्ञतापूर्वक अनुभव घ्या,
प्रत्येक श्वासा बरोबर तुम्ही असण्याचा”. ध्यानधारणे संबंधात लिहिलंय तसंच काहीसं
अगदी कृतज्ञतापूर्वक अनुभवतो आहे माझं असणं येणाऱ्या प्रत्येक वासागणिक.
8 comments:
simple everyday action but deeply analysed.
वा वा खूप सुंदर विवेचनात्मक लेख...
वातावरण सुगंधी करणारा ...
सुवासिक!!
हा ब्लॉग वाचल्यानंतर काही हरवलेल्या वासांच्या स्म्रुती चाळवल्या-
पावसाळ्यात:
गच्च भरलेल्या सार्वजनिक कचरापेट्या पहिल्या पावसात भिजल्यावर येणारा आंब्याने प्रभावित वास
सार्वजनिक गणेशोत्सव मंडपाच्या ताडपत्रींचा डांबरकोटींग वास
शाळेकडे वळताना रस्त्यापलिकडच्या भय्याकडून येणारा भाजक्या दाण्यांचा गरमागरम वास
उन्हाळ्यात: तापल्या रस्तत्याच्या डांबराचा वास (हा आता कॉन्क्रीटमध्ये गाडला गेलाय)
थंडीत:
शाळूसोबत्यांशी गाल फुगवून फुंकत दिसणाऱ्या वाफा पाहता पाहता बाबूच्या गरमागरम वड्यांचा वास
वास पुराण उत्तम!!
छानच लिहितोस.सध्याच्या परिस्थितीत काहीही नकारात्मक न लिहिता...त्यातून सकारात्मक मिळालेला ठेवा.....जे सहज अणि सरळ आहे त्या गोष्टी गृहीत धरतो माणूस....हे ह्या लेखातून जाणवला
तुमच्या या लेखात वासांचे विश्लेषण छान केले आहे. वाहत्या स्वच्छ पाण्यालासुद्धा सुगंध असतो हे माहीतच नव्हते, किंबहुना त्याचा कधी विचारही केला नव्हता.
पहिला पाऊस पडल्यावर मातीचा एक सुगंध येतो, तो ही अतिशय मोहक सुगंध असतो आणि त्या बद्दल मी असे ऐकले आहे की तो सुगंध साठवून ठेवता येत नाही किंवा कृत्रिम रित्या तयार ही करता आलेला नाही. म्हणजे निसर्गाने हा हुकुमी एक्का आपल्या जवळच ठेवला आहे.
Rojachi kriya pan tyacha mahatva parinamkarak ritual sangitalat. Khup chhan
Khup chhan
Post a Comment