८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो.
गुगल नुसार महिला दिनाचा इतिहास १९०७ इतका मागे जातो, पण आजच्या स्वरुपात महिला
दिन १९७५ पासून, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित
केल्यावर अस्तित्वात आला आहे. १९०७ पासून १९७५ पर्यंत वेगवेगळ्या दिवशी (जगाच्या
पाठीवर कुठे न कुठे स्त्रियांनी ह्या दिवशी अन्यायाला वाचा फोडलेली दिसते) पण
बहुतांशी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या तारखेला महिला दिन साजरा होत असे.
महिला दिन, जगभरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा आणि
कला इत्यादी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिलांचा यथोचित सत्कार करण्याचा
दिवस. या दिवशी अशा यशस्वी महिलांची ओळख जगाला होतेच पण त्याचबरोबर अनंत महिलांना आपापल्या
क्षेत्रात अतुल्य कामगिरी करण्याची स्फूर्ती देखील मिळते. महिला दिन साजरा करणारा समाज,
एका अर्थाने लिंग भेद नाकारून महिलांना समान संधीची ग्वाही देत असतो. त्याचबरोबर महिलांना
बरोबरीचे स्थान देतानां त्यांच्या सुरक्षिततेची हमी देखील घेत असतो.
संयुक्त राष्ट्रासंघाने महिला दिनाला नेमके स्वरूप देण्याचा
प्रयत्न केला, प्रत्येक महिला दिन एका मूळ संकल्पनेला धरून साजरा केला जातो, २०१७
साली #BeBoldforChange, बदल घडवून आणायच धाडस करा असं सांगणार वर्ष. मग तो बदल वृतीतला असो, स्त्री हिंसे
विरोधात असो किंवा स्त्रियांच्या प्रगतीकरता, शिक्षणाकरिता असो. २०१८, म्हणजे ह्या
वर्षी #PressforProgress ही संकल्पना घेऊन महिला दिन येत आहे. महिला दिनाची संकल्पना ठरविणाऱ्यांच्या
दृष्टीने योग्य वेळ आलेली आहे, २०१७ च्या पार्श्वभूमीवर, प्रगती करता आवश्यक ती वातावरण
निर्मिती झालेली आहे आणि हीच वेळ आहे प्रगतीचा आग्रह धरण्याची.
२०१७ साल, एका अर्थाने धाडसी बदलाच्या प्रयत्नांच, महिलांच्या लैंगिक
शोषणाला वाचा फोडणार वर्ष ठरलं. अत्त्याचार, जे आज नव्हे तर गेली कित्त्येक वर्षांपासून
चाललेले आहेत, कैक वर्षांपूर्वी झालेले आहेत. ह्या अत्त्याचाऱ्यांच्या विरोधात ब्र
काढण्याच धारिष्ट आजपर्यंत ज्या महिलांना झालं नव्हत, ते होण्याचं कारण महाजालावर सुरु झालेली ‘मी-सुद्धा’ (#MeToo) ही मोहीम आणि त्याचे
जगभरात उमटलेले पडसाद, #YoTambien मेक्सिको, स्पेन, दक्षिण अमेरिका, #QuellaVoltache इटली, #BalanceTonPorc फ्रांस, #Ana_Kaman अरब राष्ट्र. या सर्व हॅश टॅगवर सूर एकच होता
महिलांवर झालेले लैंगिक अत्यचार, आणि ते देखील कोणा सामान्य गुन्हेगारांनी नव्हे
तर प्रतिथयश, सुप्रसिद्ध, उच्चभ्रु मान्यवरांनी केलेले. अनेक वर्ष चालू असलेले.
२०१७ साल हे तसे अपवादात्मक नव्हे, वानगीदाखल २०१४ चे उदाहरण देता येईल. #YouOkSis रस्त्यावरील छळाविरुद्ध,
#WhatWereYouWearing अत्त्याचार झाला तेव्हा पिडीत महिलेने काय परिधान केले होते, जेणे करून
अत्त्याचाराला उद्युक्त केल्याबद्दल तिलाच जबाबदार धरता येईल (येथे पिंक
चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही), #SurvivorPrivilege अत्त्याचारग्रस्त महिलांचे
अधिकार, अशा अनेक मोहिमांमधून महिला, महाजालावर व्यक्त झाल्या होत्या. २०१७ मधे वेगळं काय घडलं जे
आधी घडलं नाही, तर या वर्षातील मोहिमांची व्याप्ती. ‘मी-सुद्धा’ या मोहिमेने जगभरातील
अनंत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली.
अन्याय करणाऱ्यांइतकाच सहन करणारा देखील जबाबदार असतो असे
म्हणतात, पण स्त्रियांवरच्या अन्यायाबद्दल असं म्हणणं काहीसं गैर वाटतं, कारण या
प्रकारात समजात आजही पिडीत महिलेलाच दोषी ठरविण्याचा
कल आहे. एक साधेच उदाहरण देऊन पुढे जातो. घटना घडल्यानंतर जवळचे, ज्यांच्या कडून पाठबळ
मिळण्याची अपेक्षा असते, त्यांचाच प्रश्न असतो, तू तिथे किंवा त्याच्याबरोबर
गेलीसच कां? म्हणजे आगळीक करणारा बाजूलाच राहिला. आवाज उठवण्याकरिता खरोखरच धाडस लागतं,
आणि तशी परिस्थिती असावी लागते. परिस्थितीला समाज जबाबदार आहे.
रोजचे वर्तमानपत्र वा कुठल्याही वृत्तवाहिनीवरील
कार्यक्रम स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या,
विनयभंगाच्या किंवा लैंगिक शोषणाच्या बातमी शिवाय संपतच नाही. जस जशा स्त्रिया नवीन
क्षेत्रात पदार्पण करू लागल्या आहेत, तसं तसे त्या क्षेत्रात नव नवे शोषणाचे, लैंगिक
भेदभावाचे प्रकार देखील होऊ लागले आहेत. क्षेत्र मग ते शैक्षणिक असो, कला असो, व्यवसाय
असो, लैंगिक छळाची घटना जणू अनिवार्य झाली आहे. होणाऱ्या तांत्रिक प्रगती बरोबरच अत्त्याचाराचे
स्वरूप देखील बदलू लागले. महाजालावरच्या सामाजिक माध्यमांवर प्रत्येकाचा वावर जणू आवश्यकच
झाला आहे. या सामाजिक माध्यमांचा वापर करून आपल्या मोहजालात फसगत करणाऱ्यांची
संख्याही काही कमी नाही. महाजालावरील छळामुळे मानसिक संतुलन बिघडल्याच्या घटना
दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लैंगिक छळाच्या घटना तर
रोजच्याच आहेत. या व्यतिरिक्त बलात्काराच्या घटना आपला सहयोग देतच असतात. वर
उल्लेखिलेल्या २०१७ मधील मोहिमांचा थोडक्यात अर्थ अन्यायाला, अत्त्याचाराला,
शोषणाला वाचा फुटली नाही म्हणजे ते झालेच नाहीत असे नाही. आज आपण २१ व्या शतकात असून
देखील समाज १०० वर्षांपूर्वी होता तसाच आहे कि त्याहून वाईट असा प्रश्न पडतो.
जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी अशाच काहीशा प्रसंगानंतर
लिहिलेल्या ओळी उधृत कराव्याशा वाटतात-
दारातून तू झुकुनी बघता
सळसळले ते
जुनाट जख्खड झाड वडाचे
।१।
|
मानवर करुनी हसलीस जेव्हा
थरथरले ते
जुनाट जर्जर झाड वडाचे
।२।
|
डोक्यावरचा पदर जाता
हलु लागले
जुनाट कुजकट झाड वडाचे
।३।
|
वाचा फुटता अन्याया मग
झुकू लागले
जुनाट पिचके झाड वडाचे
।४।
|
सुटलीस जेव्हां उंबऱ्या
मागून
उन्मळले ते
जुनाट जुनाट झाड वडाचे
।५।
|
उरले सडके लाकूड केवळ
अन सुकलेली काळी बांडगुळ
पण जाता जाता जुनाट जख्खड
प्रसवूनी गेला
नवीन वडांचे जुनेच जंगल
।६।
|
महिला दिन साजरा करणारा समाज हा एक प्रबुद्ध, जबाबदार समाज
असावा. ज्या समाजाने लिंग
भेदाला पूर्णविराम दिलेला आहे, ज्या समाजात स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती
म्हणून महिलांना स्थान आहे, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना समान संधी उपलब्ध
आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे हे उद्दिष्ट कमीत कमी १०० वर्षेतरी दूर आहे पण अशक्य
नाही.
हा विषय ढोबळमानाने दोन भागात विभागता येईल. एक -
स्त्रियांवर होणारे अत्त्याचार, मग तो बलात्कार, विनयभंग असो, कामाच्या, व्यवसायाच्या
ठिकाणी होणार छळ असो, वा घरात होणारा स्त्रियांचा मानसिक वा शारीरिक छळ असो. थोडक्यात भारतीय दंड संहिते
नुसार जो गुन्हा आहे. आणि दुसरा भाग लैंगिक असमानता आणि त्यामुळे होणारा अन्याय.
स्त्रियांवरील अत्त्याचार जरी समाजाच्या मानसिकतेशी निगडीत असला,
तरी फक्त त्यातील बदल पुरेसा नाही. मुख्यत्वे कायदा, कायद्याची अमलबजावणी, न्यायदानाची
तत्परता ह्या बाबींची सुधारणा अशा अत्त्याचाराना आवर घालण्यास अत्यावश्यक आहे.
लिंग भेदामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकरिता खऱ्या अर्थाने
समाज परिवर्तनाची गरज आहे. सामाजिक मानसिकतेतला बदलच केवळ लैगिक समानता आणू शकतो.
या परिवर्तनाची सुरवात समाजाच्या छोट्यात छोट्या घटकापासन सुरु होणे आवश्यक आहे
अन्यथा दिसलेला बदल तत्कालिक ठरेल. समाजाचे सर्वात लहान एकक, म्हणजे कुटुंब,
बदलाला सुरुवात इथून झाली पाहिजे. लिंग भेदाची ओळख नवीन पिढीला कुटुंबाच्या
चौकटीतच होते आणि म्हणूनच स्त्रीला एक व्यक्ती म्हणून दर्जा, सर्व प्रथम कुटुंबात
मिळणे गरजेचे आहे. कुटुंब प्रमुख हा शब्द प्रयोग हेतुपुरस्सर टाळला आहे कारण हा
शब्द प्रयोग निर्णय क्षमता एका व्यक्तीत केंद्रित करतो आणि जो आजच्या पुरुष प्रधान
समाजात पुरुष आहे. थोड्क्यात घरातील, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत स्त्रीचा समान
सहभाग अपेक्षित आहे. जेणेकरून मुलांसमोर एक कायम स्वरूपी उदाहरण राहील. मुलांचे
संगोपन करताना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होणार नाही ह्याची प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी
लागेल. अगदी सहज मारलेला शेरा “अग तुला नाही जमणार दादाला सांग”, नुकसान करू शकतो.
तिला का जमणार नाही ते सांगा अन्यथा तिच्या आणि दादाच्या डोक्यात फक्त लैंगिक तफावत
नोंदवली जाईल. अभ्यासक्रम निवडताना, आयुष्याची ध्येय ठरवताना, आयुष्याच्या ज्या
ज्या वळणावर मुलं तुमच्याकडे मार्गदर्शना करिता बघतील त्या वेळी शक्यतो लिंग हा
निकष न लावता योग्य तो सल्ला द्या.
लहान मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या समोर आई आणि
वडील हेच दोन आदर्श असतात. बहुतांशी मुले त्यांच्या पावलावर पाउल टाकून पुढे जात
असतात. आई, वडिलांची जबाबदारी वरील विषयाला अनुषंगून अतिशय जागरूकतेने पार पाडणे
गरजेचे आहे, जागरूकतेने अशा करिता साध्या बोलण्यात सुध्दा स्त्रीला कमी लेखल जाऊ
शकत उदा. पुढे हळू जाणाऱ्या गाडीला मागे टाकून पुढे जाताना, त्या गाडीतील स्त्री
चालक बघून ‘वाटलंच बाई असणार’ हा टोमणा वजा संवाद (जर चालक पुरुष असता तर ‘आयला
काय चालवतात’ असा असता), मागच्या सीटवर बसलेल्या मुलांना नेमका चुकीचा संदेश देउन
जातो. तुमचा उद्देश कदाचित तसा नसेलही. घरात मुलांसमोर होणार कोणत्याही स्त्रीचा
उल्लेख कसा होतो ह्या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मग स्त्री कोणत्याही
क्षेत्रातील असो.
ज्या क्षणी मुलं घराबाहेर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पडतील
त्या वेळी त्यांच्या डोक्यात महिलांबद्दल आदर आणि बरोबरीची भावना जर असेल तर ही पिढी
बदलाकरिता पोषक वातावरण निर्माण करू शकेल. हे समाज परिवर्तन आहे. त्याचे दृश्य
परिणाम दिसण्याकरिता कैक वर्ष, काहीएक पिढ्या कदाचित जाव्या लागतील. प्रत्येक
सुविद्य नागरिकाने हा वसा आपल्या पुढच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या पिढीला
देण्याकरिता देणे, अत्यंत आवश्यक आहे.
आपण भारतात जन्माला आलो हे आपले भाग्य आहे. भक्कम कुटुंब
व्यवस्था हा आजही आपल्या समाजाचा गाभा आहे, गार्गी, मैत्रेयी या सारख्या विदुशींचा
ह्या देशाला वारसा आहे, स्त्री ही देवी स्वरुपात कुठे सरस्वती, कुठे लक्ष्मी म्हणून घराघरात
पुजली जाते, इतर देशांच्या मानाने कदाचित आपलं काम सोपं आहे. फक्त गरज आहे ती
विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाने आपले योगदान देण्याची. मला खात्री आहे पाश्चिमात्य
देशांना या बाबतीत आपण नक्की मार्ग दाखवू शकतो.