आज खरंतर
औदुंबर कविता आठवण्याचं तसं काहीही कारण नाही. त्र्यंबक बापुजी ठोंबरे उर्फ बालकवी
यांची ना आज जयंती आहे ना पुण्यतिथी. पण काही गोष्टी चिरकाल स्मरणात रहातात त्यापैकी
एक, ही कविता आहे. माझ्या समवयस्कांना बहुदा औदुंबर म्हटल्यावर, ते एका वृक्षाचे
नाव आहे हे आठवण्यापुर्वी बालकवींची कविता आठवेल.
शाळेत असतांना इयत्ता
१० वीच्या अभ्यासक्रमात ही कविता होती. आज ही कविता अभ्यासक्रमात आहे का ह्याची
मला कल्पना नाही. माझ्या सहाध्यायींना नक्की आठवेल की शाळेत ही कविता दोन प्रकारे
शिकविली होती. एक शब्दार्थासहित अर्थ, कवितेतील
सौंदर्य स्थळे, व्याकरण इत्यादी आणि दुसरा प्रकार म्हणजे त्या कवितेचा अन्वयार्थ, कवितेचे
रसग्रहण, गर्भितार्थ, कवीला कवितेतून काय सांगायचे आहे आणि त्याने ते कसे सांगितले
आहे याचे वाचकांनी स्वतःच्या संवेदनशील मनाने विचारपूर्वक केलेले विवेचन, विश्लेषण
वगैरे.
ही कविता आठविण्याचे आणि त्यावर काही लिहावेसे वाटण्याचे तात्कालीक निमित्त म्हणजे व्हॉट्सअॅपवर आलेली एक चित्र फीत. ज्या मध्ये कवी वैभव जोशी यांनी स्पृहा जोशीं बरोबरच्या मुलाखतीत केलेले ह्या कवितेचे विश्लेषण. त्याचबरोबर ह्याच मुलाखतीत कवी वैभव जोशी यांनी केलेल्या औदुंबर कवितेच्या विश्लेषणाने सुरवात करून, प्रसाद आठल्ये यांनी, आम्ही पार्लेकर-एप्रिल २०२३ च्या अंकातील त्यांच्या औदुंबर ह्या लेखात दिलेला, कै. नी. र. सहस्त्रबुद्धे सरांनी दहावीच्या वर्गात सांगितलेला अन्वयार्थ वाचनात आला आणि आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. आजही जवळजवळ ४८ वर्षांनी कै. नी. र. सहस्त्रबुद्धे सरांचा मंत्रमुग्ध करणारा तो रसग्रहणाचा तास डोळ्यासमोर उभा राहिला.
मला लिहिण्यास
उद्युक्त करण्यासाठी ह्या दोन गोष्टी पुरेश्या होत्या.
माझ्यापुरते
बोलायचे झाले तर त्या वयात, मी मंत्रमुग्ध होण्यात, कवितेच्या रसग्रहणाहून सरांचे
वक्तृत्व, शिकविण्याची हातोटी आणि सादरीकरण जास्त कारणीभूत होते, असे आज वाटते. औदुंबराच्या
त्या प्रथम दर्शनानंतर चार दशकाहून अधिक काळ आयुष्यातील चढ उतार पाहिले,
वेगवेगळ्या भावभावनांचा, आशा निराशेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आणि आज ह्या
कवितेबद्दल किंबहुना तिच्या रसग्रहणाबद्दल स्वतःचा एक दृष्टीकोन तयार झाला. ह्या
दृष्टीकोनाच्या भिंगातून पाहिल्यावर आणि त्याच बरोबरीने केलेल्या थोड्याफार
वाचनाने ही कविता खूप वेगळी दिसायला लागली आणि वरील उल्लेखिलेली दोन्ही रसग्रहणे
ही संवेदनशील मनाने केलेल्या विश्लेषणाच्या जोडीने सर्जनशील मनाची स्वतंत्र
निर्मिती आहे असे वाटू लागले.
बालकवींची
जनमानसात प्रचलित असलेली काहीशी उदास, निराश अशी
प्रतिमा, आणि त्यांच्या
मृत्युभोवती असलेले गूढतेचे सावट (अपघात की आत्महत्या?) ह्या पार्श्वभूमीवर
वाचकांनी केलेला त्यांच्या कवितांचा उहापोह मनाला पटत नाही. निराशा, औदासिन्य आयुष्यात कोणाला चुकलेले आहे? पण त्याच अनुषंगाने
झालेले त्यांच्या कवितेचे विश्लेषण हे काहीसे अन्यायकारक आहे असे वाटते. रसग्रहण करतांना जर वर केलेली सीमित व्याख्या
ग्राह्य धरली तर ज्या कवितेचे रसग्रहण करावयाचे आहे त्या कवितेचा कवी, एक व्यक्ती
म्हणून कसा आहे, तो कसा विचार करतो हे समजून घ्यावे लागेल आणि औदुंबर कवितेवर
लिहिण्यापूर्वी तसा प्रयत्न मी करणार आहे.
बालकवींनी
त्यांच्या उण्यापुऱ्या २८ वर्षांच्या आयुष्यात, १६३ कविता लिहिल्या (त्यातील
कित्येक कविता अपूर्ण1 आहेत). प्रामुख्याने निसर्गकवी हीच ओळख त्यांच्या कवितांमधून दिसून येते. बालकवींचे
माझ्या पाहण्यात आलेले उपलब्ध चरित्र2 जर वाचले तर मित्रपरिवारात आनंदी असणारा, प्रांजळ, प्रामाणिक, लहान मुलांत रमणारा, सांपत्तिक
स्थैर्य नसलेला, परिस्थितीशी संघर्ष करणारा, संवेदनशील, आणि अनाकलनीय सर्जनशीलता
असलेला कवी नजरेसमोर समोर उभा राहतो.
कवींचे
अंतरंग किती गूढ असते, व त्यांच्या कवितांवरून वाचकांना जे
उमजते त्याने कवींच्या अंतरंगाचा ठाव घेणे
कसे अशक्य आहे, याचे वर्णन स्वतः बालकवींनी आपल्या कवींचे अंतरंग ह्या कवितेत केले आहे.-
सख्या वाचका, गीत कवींचे ऐकुनिया कानी
न वदे, कळले महाकवींचे अंतःकरण निदानी
.....
जा, जाउनिया अब्धि किनारीं एक शुक्तिका घेई
रंग मनोहर दीप्तिहि अनुपम याविण अन्य न कांहीं
अगाधगहने सागरलहरी झांकुनी ठेविती कांहीं
गूढतळींची त्या विषयीं ती शब्दही बोलत नाहीं
असे असूनही, कवीच्या अनुपस्थितीत, त्याची अभिव्यक्ती हीच त्याची ओळख आहे, असे मानून त्याच्या इतर कवितांचा, साहित्याचा केलेला अभ्यास हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा निदान कवडसा ठरेल असे वाटते आणि कवीला नेमके काय सांगायचे आहे वा त्याने कोणत्या मनःस्थितीत ही रचना केली आहे त्याच्या थोडेतरी जवळ जाता येईल.
मी बालकवींना प्रांजळ, प्रामाणिक अशा करता म्हटले आहे की त्यांच्या मानसिकतेचे प्रतिबिंब त्यांच्या कवितांमधून सहज आणि सातत्याने प्रतित होते. प्रसंगानुरूप आलेली खिन्नता, विषण्णता असो अथवा निसर्ग सानिध्यात झालेला विमुक्त आनंद असो वा निसर्ग दर्शनाने प्रभावित होऊन भारावून जाऊन निसर्गाचे वर्णन करतांना सुचलेल्या कल्पना, उपमा, उत्प्रेक्षा असोत त्या त्यांच्या स्फटीकासारख्या कवितेतून स्पष्ट उमटतात. वानगीदाखल खालील कवितातील ओळी पहा-
निराशेचे गीत
काळाच्या भेसूर
दाढा
करुं टपल्या
हाय! चुराडा !!
काढा ! हो !!
यांतुनि काढा !!!
द्या दीनाच्या
उत्तर द्या हांकेला; उठवाहो ! मेलेल्याला !!
काय असे संसारांत?
स्वार्थ सुखाची झाली होळी
परमार्थाची राख रांगुळी
दुर्दैवाची पिकली पोळी
काय राहिले जगतांत
वडिलांच्या मृत्यूनंतर लिहिलेली यमाचें दूत ह्या कवितेत त्यांच्या उदासीनतेचे तात्कालिन एक कारण मिळाल्यासारखे वाटते-
परिस्थितीचीं
कठोर भूतें
क्षणांत करिती
शून्य मनातें
पुर्वस्मृती मग
ताजी होते
जळतें त्यांत I हृद्याचे
होऊनि भूत
खिन्नता का येते हे जणु न कळल्यामुळे बालकवी त्यांच्या निराशा ह्या कवितेत लिहितात-
रात्र संपली दिवसही गेले I अंधपणा ये फिरुनि धरेला I
खिन्न निराशा परि हृदयाला – या सोडित नाहीं.
नित्यापरि रविकिरणे देतीं। रंग मनोहर सांध्यमुखी तीं
खळखळ ओढा गुंगत गीती-राईंतुनि वाहे.
सुंदर सगळें, मोहक सगळें। खिन्नपणा परि मनिंचा
न गळे
हाच कवी ज्यावेळी निसर्ग कविता करतो तेव्हा त्याच्या प्रतिभेचा फुलोरा अलौकिकच असतो असे म्हणावे लागेल. कवीच्या उत्कट भावना तितक्याच पारदर्शकतेने कवितेते उमटतात.
अरुण, निर्झरास, श्रावणमास
अशा बऱ्याच कवितांमध्ये कुशल चित्रकार कुन्चल्याच्या साह्याने काय रंग भरेल, इतके
सुंदर शब्दचित्र ह्या शारदेच्या रंगकर्मीने काढलेले आहे. फुलराणीचा उल्लेख
केल्याशिवाय कवीच्या प्रतिभेच्या भरारीची चुणूक दिसणार नाही. अरुण सारख्या कवितात अचेतानावर सचेतनत्वाचा आरोप करून
(चेतनगुणोक्ती) अचेतानाचे सौंदर्य अधिक खुलवण्याची त्यांची हातोटी खरोखरच
वाखाणण्यासारखी आहे.
पूर्व दिशा मधु
मृदुल हांसते गालींच्या गाली
हर्षनिर्भरा
दिशा डोलती या मंगल काली
किंवा
त्यांत लागला
कृष्णाचा3 कर पूर्वेच्या गाला
विनयवती ती
पूर्वदिशा मग अधोवदन झाली
निर्झरास या
कवितेत एखाद्या अवखळ खेळकर बालकाप्रमाणे खेळत, वाहणाऱ्या निर्झराचे चित्र वाचकांच्या
डोळ्यासमोर उभे रहाते-
कड्यावरूनि घेऊन उड्या, खेळ लतावलयीं फुगड्या
घे लोळण खडकावरती, फिर गरगर अंगाभोवती
जा हळुहळु वळसे घेत लपत छपत हिरवाळीत
श्रावणमास ही तर अजरामर कविता आहे. ह्या कवितेतील श्रावणाचे वर्णन वाचून सृष्टीदेवतेला अक्षरशः स्वतःला आरशात पाहिल्यासारखे वाटत असेल.
उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा!
सर्व नभावर होय रेखिलें सुंदरतेचे रूप महा!
बलाकमाला उडतां भासे कल्पसुमांची माळचि ते,
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि किं एकमतें!
फुलराणी
कवितेत हिरव्या हिरव्या गवतात वाऱ्यासोबत डोलताना दिसलेल्या कलीकेला बघून कविमनाने
किती सुंदर मोहक कथा निर्माण केली आहे. अल्लड कलिका मुग्ध तरुणी बनली आणि
रविकराच्या प्रेमात पडली, आणि त्यासोबत तिचा झालेले विवाह. निव्वळ शब्दांनी उभे
केलेलं चित्र वाचक अक्षरशः जगतो.
गाउं लागले मंगलपाठ,
सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवि सनई मारुतराणा कोकीळ घे तानांवर ताना!
नाचू लागले भारद्वाज, वाजविती निर्झर पखवाज,
नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर!
लग्न लागले! सावध सारे! सावध पक्षी! सावध वारे!
दंवमय हा अंतःपट फिटला भेटे रविकर फुलराणीला!
असो, औदुंबर हा विषय
असतांना बाकीच्या कवितांचा उल्लेख इतक्या खोलात जाऊन करण्याचं कारणच काय? असा
स्वाभाविक प्रश्न वाचकांना पडला असेल. तर त्याच साध सोप्प उत्तर आहे की हा बालकवींतील
सरळ स्वभावाच्या कवीवर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न आहे. त्यांच्या कविता,
शब्दातून जे सांगतात तेच त्यांना वाचकांपर्यंत पोहोचवायचे असते. त्यात गुढार्थ,
गर्भितार्थ असतो आणि तो शोधताना कवितेचा आनंद घालवावा असे मला वाटत नाही आणि खऱ्या
अर्थाने जर बालकवींच्या कवितांचा आनंद लुटायचा असेल तर जे शब्दचित्र ते वाचकांच्या
डोळ्यासमोर उभे करतात त्या चित्राचा आनंद घ्या. ते रेखाचित्र आहे, की oil on canvas आहे, की water colour आहे ह्याचा विचार
करू नका.
बालकवींच्या मोजक्याच बाकीच्या कविता अशा आहेत की ज्या कवितांवर चर्चा किंवा वाद झाले पण तेही बहुतेक कवितेच्या शब्दशः अर्थाशी निगडीत होते (उदा. धर्मवीर ज्यात जुन्या धार्मिक कल्पनांवर बालकवींनी चौफेर हल्ला चढवला आहे, अरुण – ह्य कवितेतील अरुणोदय कोणत्या ऋतूतला अथवा स्थळाचा आहे ह्याचा उल्लेख येत नाही हा आक्षेप होता). मग औदुंबर ह्या कवितेच्या बाबतीत अर्थावरून (खरंतर गर्भितार्थावरून) इतके लिखाण का झाले असावे? औदुंबर ह्या कवितेवर मी काही लिहिण्याचे धाडस करण्यापूर्वी कविता उधृत करणे संयुक्तिक ठरेल.
ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी
घेऊन
निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन
चार घरांचे गाव चिमुकले पैल
टेकडीकडे
शेतमळ्यांची दाट लागली
हिरवी गरदी पुढे
पायवाट पांढरी तयांतुनी
अडवीतिडवी पडे
हिरव्या कुरणांमधुनी चालली
काळ्या डोहाकडे
झाकळूनी जळ गोड काळिमा पसरी
लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला
औदुंबर
ही कविता एका निसर्गप्रेमी
कवीने निसर्ग दृश्य बघून केली आहे असे गृहीत धरून ह्या कवितेकडे बघितले तर एकच
गोष्ट खटकते. बाकी सर्व रंगसंगती (तटावर हिरवाळी, निळासावळा झरा, शेतमळ्यांची
हिरवी गरदी) नैसर्गिक दिसत असतांना अचानक येणाऱ्या पांढऱ्या पायवाटेवर वाचक
अडखळतो. पांढऱ्या रंगाची माती ही अगदीच अनैसर्गिक नाही (मातीतील कॅल्शीयम
कार्बोनेट, चुनखडी चे प्रमाण तसा रंग देईल) पण पायवाट ह्या रुपात कोणत्याही
कवीच्या कवितेत आलेली आढळत नाही. गमतीचा भाग म्हणजे पायवाट किंवा पायावटेचे वर्णन
बालकवींच्या दुसऱ्या कोणत्याही कवितेत आढळत नाही. ही पायवाट बा. भ. बोरकरांच्या
मुशाफिरा मधील पायावाटेसारखीच (स्तब्ध मार्ग तांबडा वळत जाय बंदरा) स्तब्ध आहे,
अडवीतिडवी पडली आहे पण तिचा रंग मात्र पांढरा आहे आणि ती काळ्या डोहाकडे जात आहे.
माझ्या दृष्टीने इथे वाचकांची विचार करण्याची वाट, मार्ग (track) बदलला आणि मग
मागील ओळींचा देखील पुनर्विचार झाला आहे असे वाटते. जणुकाही पांढऱ्या पायवाटेच्या
स्पष्टीकरणार्थ बाकी संदर्भ बदलणे रसग्रहण करतांना वाचकांना भाग पडले आहे.
वाहत्या झऱ्याच्या काठावर
(तटावर) असलेली हिरवाळी आणि काठावरल्या हिरव्या झाडाझुडपांच्या सावल्या पडून सावळा
भासणारा निळा झरा, पावसाळा सोडून इतर ऋतूत त्याच्या वाटेवरल्या उंच भूभागांना वळसा
(असेच वर्णन निर्झरास ह्या कवितेत वर दिल्याप्रमाणे आले आहे) घालून जात असेल आणि
ते भाग बेटांप्रमाणे जलवेष्टीत असतील. ह्यात नैसर्गिक वाहाणाऱ्या झऱ्याच्या आणि
त्याच्या काठांच्या तंतोतंत वर्णनाव्यातिरिक्त काही शोधणे चुकीचे वाटते.
‘चार घरांचे गाव चिमुकले’ ह्या
ओळीतील चार हा आकडा घरांची निश्चित संख्या दर्शवत नसून गावाच्या आकारमानाचे द्योतक
आहे. गाव लहानसे आहे, छोटे आहे थोडक्या वस्तीचे आहे असे सूचित करतो आहे. ह्या
पलीकडे ‘चार’ ला नेण्याचे काहीच कारण उरत नाही.
पांढरी पायवाट हिरव्या कुरणांमधुनी काळ्या डोहाकडे चालली आहे. येथे ‘काळा’ हे डोहाचें नैसर्गिक वर्णन आहे (डोह काळाच असतो). डोहाच्या काळ्या रंगाचा गडदपणा बहुतांशी त्याच्या खोलीवर अवलंबून असतो. निसर्गाशी प्रामाणिक असलेला कवी डोहाला काळ्या व्यतिरिक्त कुठल्याही रंगात रंगविण्याचा प्रयत्न करणार नाही. पण, ह्या कवितेत असलेल्या डोहाच्या काळ्या रंगाची प्रत वेगळी करण्याचा कवीचा निश्चित प्रयत्न दिसतो. ह्या डोहाचा काळा रंग केवळ त्याच्या खोलीमुळे आलेला नसून, डोहाच्या पाण्यावर पसरलेल्या सावल्यांचा गोड काळिमा त्यात मिसळला आहे आणि त्या सावल्या काठावरच्या औदुंबर वृक्षाने पसरल्या आहेत. जेंव्हा बालकवींना काळ्या रंगाचा, डोहाच्या कल्पनेचा नकारात्मक वापर करायचा असतो तेव्हा त्यांनी केलेली शब्दयोजना खेड्यातील रात्र या कवितेत पहा-
ओसाड देवळा पुढती
वडाचा पार – अंधार दाटला तेथ भरे
भरपूर
........
डोहात सावल्या पडती
काळया शार - त्या गर्द जाळिमधिं रात देत हुंकार
येथे झाडही बदलले आणि काळ्या
रंगाचे विशेषणं देखील.
ही अडथळ्यांची शर्यत पार केल्यावर आता आपण कवितेच्या रसास्वादाकडे वळुया. कवीच्या डोळ्यापुढे जे दृश्य आहे त्याची एकेका शब्दागणीक वाढत जाणारी व्याप्त्ती कवितेत अत्यंत स्पष्टपणे दृग्गोचर होते. बेटाबेटातून वहात जाणाऱ्या निळ्यासावळ्या झऱ्याने पूर्ण दृश्यच प्रवाही बनवले आहे. वाहणाऱ्या झऱ्याबरोबर पुढे गेलेली दृष्टी पार पलीकडच्या टेकडीकडे जाते आणि एक छोटेखानी टुमदार गाव दृष्टीला पडते. तसेच पुढे जातांना दाट हिरव्यागर्द शेतमळ्यांची दाटी दिसून येते. त्यापुढे कुरणे पसरली आहेत आणि त्यात अडवीतिडवी, नागमोडी पायवाट पडली आहे. ही कोठून येत आहे हे जरी कळत नसले तरी ती काळ्या डोहाकडे चालली आहे आणि त्या पायवाटेवरून कवी पोचतो तो जळात पाय टाकून बसलेल्या (असला) औदुंबरापाशी. ‘असला’ ह्या एका शब्दाने औदुंबराला सचेतन केले आहे त्याला व्यक्तिमत्व (स्थितप्रज्ञ) प्राप्त झाले आहे. शब्दांची निवड खरोखर बघण्यासारखी आहे. पाय टाकून ऐवजी पाय सोडून म्हटले असते तर काय बिघडले असते? कवितेच्या व्याकरणाला कदाचित मारक ठरले असते पण त्याहूनही पाय सोडून बसायला कोठूनतरी यावे लागते पण औदुंबर इथलाच आहे ह्या डोहाकाठचाच आहे. इथेच रुजला आहे. मोठा होऊन वृक्ष झाला आहे. या एका शब्दाच्या निवडीमुळे डोहाच्या खोली इतकीच गेलेल्या काळाची, डोहाच्या वयाची कल्पना येते.
डोह म्हटल्यावर त्याच्या बरोबर येणारी गूढता येथे अस्पष्टपणे येते, कारण तो उद्देश नाही. औदुंबरच कां? वड, पिंपळ का नाहीत? एकतर औदुंबराचे अस्तित्व पाण्याचा आढळ दाखवतो, त्यामुळे त्याचे पाण्याजवळ असणे हे संयुक्तिक आहे आणि दुसरं म्हणजे वड, पिंपळ ह्या वृक्षांसोबत नकारात्मक संदर्भ देखील जोडलेले आहेत तसे ते औदुंबराशी नसावेत. पुराणकाळापासून औदुंबर हे दत्तात्रयांच, त्रीमुर्तींच स्थान मानलेलं आहे. त्याने पसरलेल्या गोड काळीम्यात मांगल्याची भावना अभिप्रेत आहे. त्याची सावली अशुभ कशी असेल? मृत्यूची कशी असेल? मायेची सावली देखील काळी आणि भर उन्हात पांथस्थाला सुखावणारी वृक्षाची सावली देखील काळीच असते ना.
कवितेत शेवटी डोहच कां? दोन कारणे. एक तर कवीने पाहिलेल्या दृश्यात खरोखरीच डोह असेल तर मग अन्वयार्थाची गरजच संपते, कविता निखळ निसर्ग कविता म्हणून अनुभवता येईल पण तसे नसेल तर कवीला काय सुचवायचे असेल हा प्रश्न उरतो.
डोह हा शेवटाचं, परिणतीचे प्रतिक आहे. डोहातून पुढे काही जात नाही, प्रवाही, वाहत्या निळासावळ्या झऱ्याचेच डोहात रुपांतर झाले असेल अथवा तो ज्या नदीला, प्रवाहाला मिळत असेल, त्याचे डोहात रुपांतर झाले असेल. अवखळ झऱ्याचे खोल गहिऱ्या डोहात झालेले रुपांतर उथळ विचारांना आलेली परिपक्वता, आलेली खोली आणि त्याच बरोबर आलेले स्थैर्य, शांती दर्शवते असे वाटते. ज्या स्थैर्याची, शांततेची कवी आतुरतेने वाट पाहत आहे तेच कवितेत उमटले आहे असे वाटते.
कवीची
इच्छा ह्या कवितेत बालकवींनी केलेली मरणाची कल्पना बघा-
सत्याचीं स्वप्नें व्हावीं I सत्याला स्वप्नें यावी
स्वप्नींही स्वप्नें बघत I स्वप्नांतच व्हावा अंत!
मरण्याचें स्वप्नही गोड I जगण्याचें स्वप्नही गोड!
येणेपरी सर्वही भास I अमृताचे व्हावे कोष.
.....
प्रेतही माझें पाहून I प्रेमानें गुंगत गान
यापरि जग हर्षित व्हावें I हें इच्छीं जीवेंभावें!
यावरून
मृत्युच्या पलीकडे जाऊन आपल्या जगण्या-मारण्याने जग आनंदित व्हावे ही इच्छा मनात
धरणारा, उदात्त विचार करण्याची क्षमता असलेल्या एका कवीची कविता आपण वाचतो आहोत
ह्याची जाणीव होते,
मृत्यू हा शेवटापेक्षा कालचक्रातील पुढील टप्प्याची किंवा पुढील फेऱ्याची सुरवात आहे
असे म्हणता येईल. या चक्रातून कवीला
मुक्तीची अपेक्षा आहे आणि म्हणून औदुंबर कवितेतील औदुंबराचे अस्तित्व मृत्युपेक्षा
मोक्षाचे प्रतिक अधिक आहे असे वाटते.
निसर्गाचे इतके विहंगम, प्रशांत दृश्य समोर पाहिल्यावर कोणताही माणूस आपला मीपणा हरवून निसर्गाशी तादात्म्य पावेल, त्यातून तो बालकवींसारखा तरल संवेदनशील, सर्जनशील मनाचा असेल तर मग त्याला दिव्यत्वाची अनुभूती झाल्यावाचून कशी राहील? ती अनुभूती स्वाभाविकच वैराग्याच्या, विरक्तीच्या धवल, पांढऱ्या पायवाटेवरूनच जाईल असे वाटते.
संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे-
कविः करोति काव्यानि रसं
जानाति पण्डितः।
तरुः सृजति पुष्पाणि मरुद्वहति सौरभम्॥
अर्थात, एकाच
कवितेचे रसग्रहण वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते आणि रसग्रहण करणाऱ्या पंडितांवर ते
अवलंबून आहे. फुलांचा दरवळ, वारा घेऊन जातो. वृक्ष फक्त फुले फुलवतात.
इतके सगळे मंथन
केल्यावर देखील, बालकवींनी म्हटल्याप्रमाणे, समुद्र किनाऱ्यावरून उचललेल्या एका
शुक्तिकेचे, मोत्याच्या शिंपल्याचे कौतुक करावे, पण त्यावरून क्षीरसागरातील रत्नांचा अंदाज
बांधायला जाऊ नये, असेही वाटते.
[1] समग्र बालकवी – नंदा आपटे श्रेयस मालिका
[2] बालकवीची समग्र
कविता – संपादक प्रो. भा. ल. पाटणकर एम्. ए. नाशिक
[3] कर्षति इति
कृष्णः अर्थात ज्याचे किरण सर्वंकष आहेत असा जो सूर्य तो कृष्ण