Monday, 20 March 2023

चिउताईचा दिवस

आज २० मार्च चिउताईचा दिवस. नव्हतं ना माहीत? कसं असणार? व्यापारी उद्दिष्टे नाहीत ना? ना कुठे जाहिरात आहे, ना कोणी कुणाला चिऊताईच्या दिवसाचा संदेश पाठवत आहे.  ना कुणाला भेट कार्ड पाठवायचे आहे, ना भेट वस्तू द्यायची आहे. ना गुलाबाची फुलं द्यायची आहेत, ना चॉकलेट. २० मार्च लक्षात नाही राहिला म्हणून चिऊताई थोडीच रुसणार आहे? हे मात्र खरं नाही. कारण चिऊताई तर कधीचीच रुसलेली आहे.  हल्ली तीच दर्शन दुर्मिळ झालं आहे. पक्षीविद्येत वा पक्षिशास्त्रात कुठल्याही पक्षाचा आकार सांगतांना चिमणीचा आकार प्रमाण वा परिमाण म्हणून वापरला जातो. उदा. मैना आकार = चिमणी(+), सूर्यपक्षी आकार = चिमणी(-).  तात्पर्य चिमणीचा आकार बहुतांश वाचकांना ज्ञात होता, चिमणी हा पक्षी सर्वज्ञात होता वा सहजी दिसत होता.

आजकालच्या मंडळींना चिमणी दिसते कशी हेही कादाचीत माहित नसेल. चिमणा आणि चिमणी दोघे खूप वेगवेगळे दिसतात. चिमण्याचे कपाळ, शेपटीच्या वरचा तसाच पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग (लाळेरे बांधल्यागत), पोटाचा भाग पांढरा असून पाठीवर तपकिरी-काळ्या तुटक रेषा असतात. चिमणी मातकट तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळ्या तपकिरी रंगाच्या तुटक रेषा असतात आणि चोचीचा रंग फिकट तपकिरी असतो.

आमच्या लहानपणी काऊचिऊची गोष्ट माहीत नसलेले मुल शोधुन सापडलं नसत आणि आत्ता? आता बहुदा ती गोष्ट माहीत असलेली मुलं सापडणार नाहीत. मला आठवत, माझ्या लहानपणी माझी आई, काकू किंवा शेजारच्या वहिनी व्हरांड्यात तांदूळ निवडत असत. त्यांनी तांदुळतील निवडण, भातगोटे, नाचणीचा चुकार दाणा, गवताचं बी ताटातून खाली टाकलं रे टाकलं की टिपायला चांगल्या चार- सहा चिमण्या हजर असतं. आता व्हरांड्यात उभं राहून तांदूळ निवडणाऱ्या काकू, वाहिनीही नाहीत आणि चिमण्याही नाहीत.

माझ्या वयाच्या सगळ्यांनाच घराच्या वळचणीला, खिडकीच्या शटर मध्ये असलेलं चिमणीच घरट आठवत असेलं. घरटे बांधण्याकरिता काड्या, कापूस आणतांना चिमणा-चिमणीची चाललेली लगबग, आणि नंतर पिल्लांच्या चिवचिवाटात त्यांना भरविण्यासाठीची धडपड त्यावेळच्या घरांचा अविभाज्य भाग असल्यागत होता. अगदी दिवाळीच्या साफसफाईत देखील चिमणीच्या घरट्यात अंडी असतील तर त्याला हात लागत नसे. क्वचित कधीतरी घरात फिरणाऱ्या पंख्याला चिमणी धडके, आम्ही मुलं तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत असतांनाच ती आश्चर्यकारकरित्या उडून जात असे. चिमण्या स्वाभाविक मिळणाऱ्या संरक्षणामुळे मनुष्यवस्तीच्या आसपास राहतात. आता खिडक्यादारांना जाळ्यांनी वेढलेलं आहे, खिडक्यांना शटरही नाहीत. वातानुकुलीत घरांत कुठून असणार वळचणी आणि कुठून असणार घरटी?

संध्याकाळी साधारण चार पाचच्या सुमारास चिमण्यांची धूळ-मातीची आंघोळ पाहणे हा आम्हा मुलांचा एक मोठ्ठा कार्यक्रम असायचा. सतआठ-दहा चिमण्या जमिनीवर उतरून मातीत आपल्या पंखांनी धूळ माती अंगावर उडवून स्वतः भोवती गोल गोल फिरत. त्यांना माती बहुदा गरम किंवा उबदार वाटत असावी. ह्या आंघोळी मागचा नेमका उद्देश कधी कळला नाही. पण आम्ही मूलं धावत जाऊन त्यांना उडवत असू आणि चिमण्या जिथें बसल्या होत्या तिथें मऊ मुलायम मस्तीचे खळगे झालेले दिसत असत. आणि हो चिमण्यांना पाण्याच्या आंघोळीचे ही वावडे नाही. साठलेल्या किंवा त्यांना पिण्याकरिता ठेवलेल्या पाण्यात यथेच्छ खळबळ करीत सचैल स्नान करतानाही त्या दिसत. आम्हाला सगळीच गंमत वाटे. आता घरांभोवती, इमारतींच्या आवारात पावसाळ्यात चिखल (चिखलाची गंमत पुन्हा कधी तरी) होतो म्हणून कोंक्रीटीकरण केल्यावर माती दिसणार कुठे आणि चिमण्या येतील कशाला?

चिमण्यांचा रोमान्स कधी बघितला आहेत का? मजेशीर असतो. दोन चिमणे एकाच चिमणीचे प्रियाराधन करीत असतात. मग दोघ अंग फुलवून एकमेकांना आव्हान देतात. एखाद दोन वेळा हूल दिल्यागत एकमेकांचा अंगावर जात अचानक दोघांची जुंपते आणि त्या द्वंद्वात स्थळ काळाच भान न राहता कधी जमिनीवर तर कधी फांदीवर अशी झोंबी होताहोता ती जशी चालू होते तशीच तडकाफडकी संपते. आव्हान वीर पोबारा करतो. हा सगळा प्रकार आपण त्या गावचेच नाही अशा थाटात चिमणाबाई बघत असतात. मग जिंकलेला चिमणा जरा जास्त फुलून उड्या मारीत तिच्या जवळ जातो. चिमणाबाई वेगळाच आवाज काढत त्याच्या अंगावर जाते तोही दोन उड्या बाजूला मारीत माघार घेतल्यासारखे करतो. सरते शेवटी चिमणाबाईंचा मिलानाकरिता होकार मिळतो आणि दोघं जोडीने घरट्याकरिता जागा शोधतात.

खरंच कां रुसली आहे चिऊताई? की चिमण्यांची संख्या जगात कमी झाली आहे? एका निरीक्षणानुसार भारतातील चिमण्यांची संख्या काही राज्यात २०% इतकी खाली आली आहे (Study by Indian Council for Agriculture Research) तर काही राज्यात ७०%. ह्याचे मूळ कारण त्यांच्या अधिवासाचा नाश, बेसुमार जंगल तोड. त्यातून भर म्हणजे नवीन बांधकामांमध्ये असलेली वातानुकुलीत घरे आणि बंद खिडक्या. कीटक नाशकांच्या वारेमाप वापरामुळे होणारा त्यांच्या अन्नाचा नाश. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे चिमण्यांची कमी होणारी संख्या.

चिमणी हा अन्न साखळीतील एक अविभाज्य घटक आहे. छोट्या कीटकांना भक्ष करतांना शिकारी पक्षाचं भक्ष्य ठरणारा हा पक्षी अन्न साखळीतला एक महत्वाचा दुवा ठरतो. ह्याचा जणु पुरावाच १९६० च्या दशकात, खरतर १९५८-१९६२ मध्ये चीन मध्ये मिळाला. त्यावेळच्या चीनी राज्यकर्त्यांनी चिमण्या नष्ट करण्याकरिता फतवा काढला. कां? तर चिमण्या पिकांच नुकसान करतात, आणि त्याचा परिणाम पिक उत्पनावर होतो. झालं. माणसाविरुद्धच्या लढाईत चिमणी किती टिकणार? चिमण्या विरोधी मोहीम फत्ते झाली. पण त्या वर्षी आलेलं पिकाच उत्पन्न, आधीच्या वर्षांच्या तुलनेने खूपच कमी आलं. टोळ धाडींचे प्रमाण खूप वाढले होते. चीनी राज्यकर्त्यांचे डोळे उघडले. निसर्गाचा तोल ढळवणे एक वेळ सोपे असेल पण सावरणे महा कठीण.   

नेचर फोरेवर सोसायटीचे संस्थापक व अध्यक्ष मोहंमद दिलावर यांनी हा दिवस २०१० साली  सुरु केला. सह्योग्यांबरोबर गप्पा मारता मारता ही कल्पना पुढे आली आणि सत्यात उतरली. जगभरात २० मार्च हा sparrow day म्हणून साजरा होतो. ह्या वर्षाच्या जागतिक चिऊताई दिवसाची मूळ संकल्पना “I Love Sparrow” अशी आहे. आपण हा दिवस साजरा करण्याकरिता काय करू शकतो? जागरुकता निर्माण करू शकतो, ज्यांना शक्य असेलं त्यांनी घराच्या आसपास पक्षी खाद्याचे फिडर टांगणे, पक्षांना पाणी ठेवणे. पक्षी घरे (Bird houses) लावता येतील वगैरे.

दिल्ली आणि बिहार राज्यांनी चिमणीला आपला राज्य पक्षी घोषित केले आहे. चिमणी हा इटलीचा राष्ट्रीय पक्षी आहे.

जागरूकता निर्माण करणे तर सर्व नक्कीच करू शकतात. अजूनही वेळ गेलेली नाही. आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न केला तर पुन्हा एकदा आपल्याला सकाळ-संध्याकाळ चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येईल आणि त्यांची संख्या वाढू शकेल.