“हेहीवाचा” ह्या माझ्या ब्लॉग मधून आतापर्यंत मी महाभारतातील शल्य, घटोत्कच, कृष्णा, भीष्म आणि गांधारी ही पात्रे माझ्यापरीने उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. महाकवी व्यासांचं महाभारत, ही विविध व्यक्तिमत्वांची कधीही न संपणारी खाण आहे. आज महाभारतातील असेच एक न उलगडलेलं, बहुतांशी दुर्लक्षिलेलं, किंबहुना महाभारतात त्याच्या असण्याच प्रयोजन न कळणारं व्यक्तिमत्व, तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे.
बहुतेकांना अश्वथामा माहीत आहे तो लहानपणी
वडिलांच्या गुरुकुलात आलेल्या राजापुत्रांप्रमाणे दूध पिण्याकरिता हट्ट धरणारा आणि
महायुद्धाच्या अखेरीस झोपलेल्या पांडव पुत्रांचा वध करणारा चिरंजीव म्हणून.
कुरुगुरू
आचार्य द्रोण (द्रोणातून जन्माला आलेला?
आद्य Test Tube Baby?) आणि कृपाचार्यांची भगिनी कृपी ह्यांना शंकराच्या कृपाप्रसादाने झालेला
पुत्र. जन्मतःच मस्तकी तेजस्वी रत्न धारण केलेला. ज्या रत्नाच्या प्रभावामुळे
तहानभूकेपासून मुक्त असलेला. जन्मतःच त्याने उच्चैःश्रवा सारखा ध्वनी केला म्हणून त्याचे नाव अश्वथामा पडले. (ग्रीक
पुराणात आलेल्या centaur शी तर साधर्म्य नसेल? उगाच आपली शंका).
भारद्वाज
मुनींचा पुत्र द्रोण वडिलांचं गुरुकुल असून देखील अग्निवेशांच्या आश्रमात
शिक्षणासाठी राहिले. कदाचित पितृ प्रेमामुळे मुलाच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ नये
हा त्या मागचा हेतू असावा. अग्निवेशांच्या आश्रमातच गुरुबंधू असलेला पांचाल देशाचा
राजपुत्र द्रुपद पुढे जाऊन राजा झाल्यावर द्रोणांना ओळख देण्यास नकार देतो
किंबहुना दरबारातून अवमानित करून पाठवतो. अपमानित द्रोण गुरुदक्षिणा म्हणून
पांडवां करवी द्रुपदाला पराजित करून सूड घेतात. पांचाल देशाचे साम्राज्य विभागून
उत्तर पांचालचा राजा म्हणून अश्वथाम्याचा राज्याभिषेक करतात.
ह्या
प्रसंगा पर्यंत अश्वथाम्याच्या बालपणीची दुधाची गोष्ट सोडली तर महाभारतात त्याचा खास
असा उल्लेख आढळत नाही. राजा होण्याचं वय असून देखील वडिलांच्या अपमानाचं परिमार्जन
करण्याचा प्रयत्न अश्वथाम्याकडून झालेला दिसत नाही. पांडवांच्या पराक्रमाने राज्य
मिळालेलं असून देखील कौरवांच्या बाजूने पांडवाच्या विरुद्ध लढतांना तो दिसतो. इतकेच
नव्हे तर आत्यंतिक अधर्माने पांडवांचा वध करण्याचा प्रयत्नही तो करतो. १८ दिवस
चाललेल्या महाभारतातील युद्धात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या महावीराने
गाजवला होता. अश्वथाम्याच्या नावावर मात्र त्यातील कोणताही दिवस नाही. घटोत्कचाचा
पराभव करण्यात अश्वथाम्याला आलेल्या अपशामुळे घटोत्कचाच्या वधाकरीता कर्णाला वासवी
शक्तीचा वापर करावा लागला (वासवी शक्ती जर अर्जुना बरोबरच्या युद्धात कर्णाकडे
असती तर महायुद्धाचा निकाल कदाचित वेगळा लागला असता). नाही म्हणायला, घटोत्कचाच्या
राक्षस सेनेचा समर्थपणे प्रतिकार करून त्याच्या पुत्राचा त्याने केलेला वध ही एक
जमेची बाजू. पित्याच्या, द्रोणाचार्यांच्या मृत्युनंतर नारायणास्त्राचा वापर आणि कृष्णाच्या
समयसूचकतेमुळे त्याचा फसलेला प्रयोग हे योद्धा म्हणून नोंद घेण्यासारखे प्रसंग.
महायुद्ध
संपल्यानंतर नसलेल्या कौरव सेनेचे सेनापतीपद दुर्योधनाने अश्वथाम्याला बहाल केले आणि कृतवर्मा व कुपाचार्यांच्या मदतीने
झोपलेल्या धृष्टद्युम्ना बरोबर पांडव पुत्रांचा (झोपलेले वीर हे पांडव आहेत ह्या
समजुतीमुळे) अश्वथामा वध करतो. तदनंतर झालेल्या अर्जुना बरोबरच्या द्वंद्वात दोघेही
ब्रह्मास्त्राचा प्रयोग करतात. विश्वाचा विनाश टाळण्याकरिता देवांच्या व ऋषींच्या
आवाहनावरून अर्जुन ब्रह्मास्त्र मागे घेतो पण अश्वथाम्याला आपले अस्त्र मागे घेता
येत नाही आणि त्याला ते उत्तरेच्या गर्भावर वळवावे लागते. हे अश्वथाम्याचं आणखीन
एक अपयश.
महाकवी
महाभारतकार व्यासांनी अस्वथामा ह्या पात्राची योजना दोन-तीन कारणांनी केली असावी
असे वाटते.
प्रत्यक्ष
महायुद्धापर्यंत कौरवांनी अनेक कपट कारस्थाने करून पांडवांना सत्तेपासून लांब
ठेवण्यात यश मिळवलेलं दिसतं तर प्रत्यक्ष युद्धात कौरवांकडील महावीरांचा पराभव व
मृत्यू पांडवांनी अवैध मार्गाने केलेला आढळतो. ही नैतिक-अनैतिक मार्गांनी
एकमेकांवर कुरघोडी करण्याची मालिका दुर्योधनाच्या मृत्युपर्यंत चालू राहिलेली
दिसते (गदा युद्धाच्या नियमानुसार कमरेखाली वार करणे गैर होते). त्रयस्थ भावनेने
जर आपण महाभारताकडे बघितले तर महायुद्धाच्या शेवटाकडे येता येता कपटनीती, खोट्याचा
आधार, अधर्माने केलेले युद्ध अशा अनेक अनैतिक मार्गांचा वापर दोन्ही पक्षांनी
सारख्याच प्रमाणात केलेला दिसतो. पण महायुद्धाच्या शेवटी अश्वथाम्या हातून
घडवलेल्या या कृत्याने पांडवांचे पारडे नैतिकतेच्या युद्धात अचानक जड होते आणि
कौरव हे कथेतील खलनायक ठरतात. एका नगण्य पण संदर्भाने महत्वपूर्ण पात्राच्या हातून
लेखकाने वाचकाचे मत इतक्या निर्णायकपणे बदललेले क्वचितच पहायला मिळते.
असूया,
मत्सर ही तुलनात्मक दृष्टीकोनातून निर्माण होणारी एक आत्यंतिक नकारात्मक भावना.
नकारात्मक अशाकरिता की ज्याला असूया वाटते तो जी उर्जा स्वतःभोवती निर्माण करतो ती
त्याचा तर ऱ्हास करतेच पण त्याच बरोबर ज्याच्या बद्दल त्याला असूया वाटते त्याचेही
नुकसान केल्याशिवाय रहात नाही. असूया कोणालाच चुकलेली नाही. दोन लहान, अगदी पाठोपाठच्या भावंडात देखील असूया पाहायला
मिळते, मोठ्यांची तर गोष्टच सोडा. जेव्हा ही असूया ती गोष्ट मिळण्याची लायकी
नसलेल्याला वाटते तेव्हा ही असूया अधिकच विद्रूप रूप घेतें. जे नेमके
अश्वथाम्याच्या रूपाने महाभारतकारांनी दाखवले आहे असे वाटते. अश्वथामा हा जन्मतः
चिरंजीव नव्हता. तसे असते तर ‘नरोवा कुंजरोवा’
हे युधिष्ठीराचे बोल ऐकताच आपली शस्त्र ठेवून आपल्या पुत्रास मृत्यू नंतर कोणती
गती प्राप्त झाली हे पाहण्यासाठी द्रोणाचार्य रथावर ध्यानस्थ बसले नसते आणि
धृष्टद्ध्युम्नास त्यांचा वध करण्यची संधी मिळाली नसती. अश्वथाम्याला चिरंजीव
होण्याचा शाप कृष्णाने दिला, जणू असूयेला चिरंजीवित्व बहाल झाले. ही सर्व भूतांचे
ठायी आढळणारी भावना महाभारतकारांनी महाभारतात अश्वथामा ह्या रूपकाने आणली असेल कां?
वरील
दोन्ही प्रयोजनांसहित तिसरे अगदी भिन्न प्रयोजन आहे असे वाटते. पांडव पुत्र, पाच
भावांचे पुत्र, भविष्यातील महायुद्धाची जणु बीजे. ह्यांचा वध घडवून महाकवी
व्यासांनी पुढील महायुद्धाची, भाऊबंदकीची शक्यताच
नष्ट केली. पांडव पुत्रांच्या वधा नंतर कृष्णाकरवी उत्तरेच्या गर्भाचे रक्षण करवून
कुरु महासत्तेला एकमेव वारस ठेवून संघर्षाचे मूळच नष्ट करण्याचा प्रयत्न तर
महाभारतकारांनी केला असेल कां?