महाभारतकार महर्षी व्यासांनी महाभारत्तातील पात्र उभी करतांना प्रत्येक व्यक्तिरेखेला अक्षरशः अनंत छटा दिल्या आहेत आणि त्या सुद्धा इतक्या विविक्षित आहेत की त्या प्रत्येक छटेत ती व्यक्ती पूर्णतः वेगळी भासते. गांधारी ही अशीच एक बहुआयामी, बहुविध व्यक्तिरेखा.
गांधार नरेश सुबल, ह्याची कन्या.
धृतराष्ट्राची पत्नी, कौरवांची जन्मदात्री, महासती, पतिव्रता, धृतराष्ट्राचा
राज्याभिषेक न झाल्यामुळे महाराणी पदाला कायम मुकलेली, आणि
दुर्योधनाचा राज्याभिषेक झाल्यावर राजमाता पद भूषाविणारी, अशा अनेक रुपात ती
आपल्याला भेटते. पण एक स्त्री म्हणून गांधारी महाभारतातील कुठल्याही पर्वात वा
प्रसंगात समोर येत नाही. ती कौरवांची जन्मदात्री आहे पण माता, आई म्हणून तिची
व्यक्तिरेखा अपुरी वाटते. वरील वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना राजमाता गांधारीच्या
मनात भावनांचा काय कल्लोळ उठत असेल त्याची कल्पना महाभारतकारांनी बहुतेक वाचकांवर
व श्रोत्यांवर सोडली असावी.
गांधार, हिमालयाच्या
कुशीत, दऱ्याखोऱ्यानी वेढलेले एक छोटे राज्य सुबल त्याचा राजा आणि त्या निसर्गरम्य
वातावरणात रहाणारे त्याचे प्रजाजन. त्यांच्या ध्यानीमनी नसतांना अचानक हस्तीनापुराहून,
भीष्मांकडून गांधार देशीच्या राजकन्येला, गांधारीला, कुरुकुळाची स्नुषा होण्याची,
धृतराष्ट्राची पत्नी होण्याची मागणी येते. हस्तिनापुर, दूरवर यमुनेच्या काठी,
महाप्रतापी भीष्मांच्या कृपाछत्राखाली,
वसलेली पराक्रमी कुरूवंशाच्या राज्याची वैभवशाली ऐश्वर्यसंपन्न राजधानी एव्हढीच
ऐकीव माहिती. नाही म्हणायला, पंडू, दिग्विजयी अभिषिक्त सम्राट, दोन भार्या असूनही
अजून निपुत्रिक आहे हेही गांधार वासियांनी ऐकलं होतं. ही मागणी घेऊन येणाऱ्या
दुताबरोबर गाड्या भरूभरून भेटीदाखल दिलेले सोनंनाण, कपडेलत्ते कुरु ऐश्वर्याची
ग्वाही देत होती. आलेल्या भेटी ठेवायला गांधार नरेशचा खजिना देखील अपुरा पडला
असता. ह्या धनभाराच्या संरक्षणार्थ आलेली कुरु सैन्याची तुकडी देखील संख्याबळाने
गांधार सेनेपेक्षा जास्त होती. डोळे दिपवून टाकणारी ती धनसंपदा, एव्हढ्या मोठ्या
कुळाशी जुळून येणारी ही सोयरिक आणि मुलीच्या मुलांची हस्तिनापूरच्या गादीचा वारस
होण्याची शक्यता. हे सगळच सुबल राजाला स्वप्नवत वाटत होतें. हस्तिनापूरच्या
प्रस्तावाला नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. गांधारी केव्हढी भाग्याची!! गांधार देशाची
प्रजा जणू आनंदाच्या डोहीच तरंगत होती. विवाह हस्तिनापुरी संपन्न होणार होता.
गांधार नरेशाकडून फक्त होकाराची आणि कन्यादानाची अपेक्षा होती.
माझ्या प्रयाणाकरिता खास रथाची
व्यवस्थाही आलेल्या लव्याजम्यात होती. सुबल्र राजाला आणि मला जणू गृहीत धरलेले
होते. माझी पाठवणी करतांना आईच्या डोळ्यातून वहाणारे अश्रू थांबतच नव्हते. मुलीचे
सासरी जाणे हे काही नवीन नाही. मी माझीच
समजुत काढत होते, आईच्या अश्रुंचे उत्तर शोधीत होते. मी इतकी दूर जात आहे, ती
देखील कायमची म्हणून असेल कदाचित. बाबा कसनुस अवसान आणून हसत होते. माझी अवस्थाही
काही वेगळी नव्हती पण त्याचबरोबर नव- जीवना बद्दल, नवऱ्या बद्दल अपेक्षाही होत्या.
शकुनी एकटाच केवळ अपवाद होता. त्याचा आनंद त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
गांधारीचा स्वतःच्या भाग्यावर
विश्वासच बसत नव्हता. गांधार देशातील सगळाच कारभार छोटेखानी. राजाला प्रजा कुटुंब
प्रमुख मानत होती. दुर्गम प्रदेशामुळे परकीय आक्रमणाची शक्यताही नव्हती सगळ कस
शांत, आनंदी. पर्वतराजीतील वाऱ्यापाण्यासारखं मुक्त, निर्मळ आणि स्वच्छंदी. मनात
नाही म्हणायला शंकेची पाल चुकचुकत होती. एव्हढ्या मोड्या राज्याची साम्राज्ञी होण मला
जमेल ना? तिथले
रीतीरिवाज, शिष्टाचार सगळ सगळच नवीन.
गांधार ते हस्तीनापूर एव्हढा लांबचा
प्रवास हा हा म्हणता संपला. सेवा करायला पुढे मागे दास दासी धावत होते आणि नुसत्या
कल्पनेनेच माझे मन फुलपाखरू झाले होते. मनाने कधीचीच मी हस्तीनापुरी पोहोचले होते.
आपल्या न पाहिलेल्या, होणाऱ्या पती विषयी विचार करण्यात, त्याचे चित्र ऐकीव
गोष्टींवरून आपल्या मन:पटलावर चितारण्यात मी गुंग होते. शकुनी आपल्या सख्ख्या बहिणीला काही
कमी पडू देत नव्हता. शकुनीचे हस्तीनापुरी मजबरोबर येणे थोडे खटकलेच होते. स्वत:चे
राज्य सांभाळायचे सोडून आपला भाऊ आपल्या बरोबर निघाला हे त्याच्या आपल्यावरील
प्रेम म्हणायचे की ऐशोआरामाची अभिलाषा हे नेमके उलगडत नव्हते.
हस्तिनापुर वासियांनी माझे जंगी
स्वागत केले. मोठ मोठे दरबारी मानकरी नगराच्या दारात स्वागताकरिता हजर होते. डोळे
दिपविणारा सोहोळा होता तो. नगरातील उंच उंच इमारती, वाडे, महाल, चौपदरी
रुंद रस्ते, दुतर्फा बांधलेली सुबक, रेखीव घरे सगळे कसे आखीव रेखीव जागाच्या जागी होतें.
काढलेल्या रांगोळ्या,
घातलेले अत्तरांचे सडे,
बांधलेली तोरणे,
उभारलेल्या गुढ्या,
लावलेल्या पताका, टांगलेली झुंबरे, सोडलेल्या फुलांच्या माळा, वाद्यांचा घोष, फडकणारे ध्वज,
नटलेल्या स्त्रिया आणि सजलेले पुरुष सगळे सगळे या गांधारीचे, माझे स्वागत करीत
होते.
सुखाची परमावधी म्हणतात ती हीच की
काय? एकदा
वाटे महाराणीचं स्वागत आहे हे, मग आश्चर्य काय त्यात. त्या आनंदोत्सवात लोकांच्या
चेहेऱ्यावरचा आंनद कृत्रिम का वाटतोय मला, काहींची नजर तर माझी कीव करीत
असल्यासारखी भासतेय, भासच
असेल बहुदा. असेच काहीसं निरोप घेताना आईवडीलांच्या डोळ्यात दिसलं कां? कन्या सासरी
चाललेली बघून असेल कदाचित. खरोखरीच का मी इतकी भाग्यवान आहे? कां शंका यावी
मला? स्वप्नातून जागी होईन कि काय मी?
दुसऱ्याच दिवशी ह्या स्वप्नांचा भंग
झाला, एखादे
नक्षीदार नाजूक काच पात्र खळकन फुटावे तद्वत. भीष्म पितामह आवर्जून मला भेटण्यास
आले. आपल्या धीरगंभीर आवाजात मला म्हणाले “मुली, तुझा होणारा पती जन्मांध आहे हे ठाऊक
असूनही तू ह्या विवाहाला मान्यता दिलीस, थोर आहेस. कुरु आणि व्यक्तिश: मी सदैव
तुझ्या ऋणात राहू. धन्य आहेस तू!” दोन्ही हातांनी मला आशिर्वाद देत पितामह माझ्या
उत्तराची वाट न बघता महालाबाहेर निघून गेले. जन्मांध? माझे पती जन्मांध आहेत? मला
हे माहित असूनही मी विवाहाला मान्यता दिली? कसं शक्य आहे? माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत
नव्हता. मला, मला तरी
हे निश्चित माहित नव्हते. मग भीष्मांनी असें का म्हणावे? ह्याचा अर्थ
एकच माझ्या आईवडीलांना, भावाला, शकुनीला हे ठाऊक होते तर. हतबुद्ध झाले मी. आलेला
हुंदका घशातच अडकला, इथे
रडण्याची चोरी होती. हळुहळू एकेका प्रश्नाची उत्तर मिळू लागली. आईच्या डोळ्यांना
लागलेली संतत धार. बाबांचा आनंदाचा मुखवटा. कां फसवल मला माझ्या खुद्द आईवडीलांनी?
पर्याय होता कां बाबांना? मला
मागणी घालायला आलेल्या दूतांबरोबर इतका फौजफाटा का होता याचे उत्तर मिळालं. सुबल
राजाला, माझ्या बाबांना धाक म्हणून पाठवलं होत तर सैन्य, नाहीतर कुरु राज्याचा
ध्वज मिरवणाऱ्या पथकावर हल्ला करण्याच वा लुटण्याच धारिष्ट्य कोणात होत? होकार जवळ जवळ
धमकावूनच घेतल्यासारखा होता. मला हे कळलं असत तर मी विरोध केला असता, जीवाच काही
बरवाईट करून घेतलं असत म्हणून बहुदा राज्यहीतासाठी माझा बळी गेला. काय करू मी? माझा भाऊ
शकुनी. त्याला सोडून इथे मी कोणालाच ओळखत नाही, आणि तो तर आधीच विकला गेलाय.
त्याच्या स्वतंत्र महालात गेल्यापासून त्याने माझी साधी चौकशी देखील केली नाही.
त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा करणार. विवाह अटळ आहे. आता राग येतोय सगळ्यांचाच
आणि सगळ्याचा. माझ्या असहायतेचा. कुरुकुळाला वारस हवा म्हणून माझा बळी, जन्मांध
धृतराष्ट्राला हक्काची दृष्टी मिळावी, त्याची कायमची काठी व्हावी म्हणून माझा बळी.
बदल्यात राजमाता पद, हे ऐश्वर्य जे मी कधीच मागितलं नव्हतं. अक्षरं जोडायची म्हटली
तरी एकाचा पाय मोडावा लागतो. नात्यातही नेमक हेचं असतं तडजोड करावीच लागते, पण
फसवणूक नाही. ज्या विश्वासावर नात्याची वास्तू उभी राहते तो मुळातूनच हरवला होता. बसं
ठरलं. मी धृतराष्ट्राची दृष्टी होणार नाही. त्याची काठी होणे मला मान्य नाही. मी ही
फसवणूक सहन करणार नाही. काय करणार होते मी? विवाहाला उभी रहाण्यापुर्वी माझा निर्णय मी जाहीर
केला “माझ्या पतीला जे दृष्टी सुख नाही ते मी उपभोगणार नाही. माझ्या डोळ्यांवर मी
आजन्म पट्टी बांधून राहीन” माझ्या
निर्णयाचा काय परिणाम होईल ते माझ्या ध्यानीमनीही नव्हते मी फक्त धृतराष्ट्राचा,
माझ्या होणाऱ्या अन्ध पतीवर सूड घेतल्याच्या आनंदात होते. माझा सूडाचा आनंद क्षणभंगुर
ठरला. माझ्या नावाचा जयजयकार सुरु झाला. पतिव्रता, महासती उपाध्यांनी माझा सत्कार
होऊ लागला, प्रजा माझी थोरवी गाण्यात दंग झाली. जी पट्टी मी माझ्या हाताने बांधली
तिची गाठ आता नीरगाठ झाली होती, कधीही न सुटण्याकरिता. ढोल ताशांच्या गदारोळात
विधवेला सती सती म्हणत नवऱ्याच्या चितेवर ढकलणारा हा समाज मला पट्टी कधीच काढू
देणार नाही हे नक्की होत. धृतराष्ट्राला
माझ्या निर्णयाने राग आला असेल, दु:ख झालं असेल तर त्याने ते तसं दिसू दिल नाही.
प्रत्येक स्त्रीची आपल्या
लग्नानंतरची पहिली रात्र कशी असेल याची काही स्वप्न, काही अपेक्षा असतात, त्या
स्वप्नांचा आकांक्षांचा चुराडा झाला. ती रात्र बाकी कशीहि असेल पण ती चाचपडण्यात
जाईल असें मात्र कधीही वाटल नव्हतं. तो जन्मजात अधू आणि मी माझ्या प्रतिज्ञेमुळे.
पुढील प्रवास तर एखाद्या दु:स्वप्नागत. आपल्याला सतत कोणीतरी पाहत आहे ही जाणीव
डोक्यातून निघतच नव्हती. धृतराष्ट्राला जन्मापासून ह्या गोष्टीची सवय होती
किंबहुना कोणीतरी सतत बाजूला असणे ही त्याची गरज होती आणि माझ्या बाबतीत ती
नव्याने निर्माण झाली होती. मीच निर्माण केली होती ती! धृत्राष्ट्राने जग बघितलच
नव्हतं, रंग नसणे म्हणजे काय हे समजण्याकरिता रंग एकदा तरी पहावे लागतात. प्रकाश
ज्याला माहीतच नाही त्याला अंधार असण्याचे वा प्रकाश नसण्याचे दु:ख काय समजणार? पण
माझ्याकरिता उगवणारा प्रत्येक दिवस हा रंगहीन, प्रकाशहीन होता. खरच कां हा
अंधार मी मनापासून स्वीकारला होता? स्वतःचे डोळे बांधून घेण्याच्या या निर्णयाचा
पश्चात्ताप कधीच झाला नाही कां?
माझ्या पहिल्या पुत्राचा,
दुर्योधनाचा जन्म. माझ्या मुलाच पाहिलं दर्शन? माझ्या हातांच्या स्पर्शाने, ओठांनी आणि सुईणीने
केलेल्या वर्णनावरून आलेली ती फक्त एक कल्पना. हे त्यानंतर प्रत्येक मुलाच्या
जन्माच्यावेळी झाल. पुढे पुढे मूल हातीपायी, नाकीडोळी धड आहेना एव्हढे विचारून माझे कुतूहल
मी शमवू लागले. स्तनपान करून निजलेल्या निरागस बाळाचा चेहेरा बघणे काही माझ्या
भाग्यात नव्हते. मातृसुख म्हणजे फक्त प्रसूती वेदानां, एव्हढच समीकरण माझ्याकरिता शिल्लक
राहीलं.
दुर्योधनाचा राज्याभिषेकाच्यावेळी, पांडवांनी
राजसूययज्ञा नंतर केलेल्या सांगतेच्या वेळी, आद्य पूजेचा मान कृष्णाने स्वीकारला
तेंव्हा, द्यूतात पांडव सर्वस्व हरले तेंव्हा, शरपंजरी पडलेला भीष्म, दुर्योधानाच्या
मृत्युनंतर शोकाकुल झालेला धृतराष्ट्र
आणि महायुद्धात माझ्या सर्वाधिक
मुलांच्या मृत्यूला कारणीभूत झालेला भीम मानभावीपणे आमच्या संत्वानाकरिता आला
तेंव्हा, होय, या प्रत्येक वेळी आणि अशा अनेक क्षणी मला माझ्या डोळ्यांवरची पट्टी
ओरबाडून काढावीशी वाटली.
पुत्र जन्माच्या शर्यतीत कुंतीने
बाजी मारली. युधीष्टीराचा जन्म दुर्योधनाच्या आधी झाला. माझ्या पतीने औदार्याचा आव
आणीत पांडवांना खांडव वन देऊ केलं आणि त्यांनी त्याच नंदनवन करीत इद्र्प्रस्थ उभे
केले. त्यानंतर त्यांनी केलेला राजसूय यज्ञ, उभे केलेलं वैभव आणि मिळालेली वाहवा, प्रसिद्धी.
हस्तिनापूरच्या नाकावर जणू टिच्चून आपल साम्राज्य उभारल पांडवांनी आणि
कुरुकुलाच्या राजमातेच पद माझ्या हातून हिसकावून कुंतीच्या हाती सुपूर्त होतंय अस
वाटू लागलं. कुरुकुळाची राजमाता बनण्याचे माझे स्वप्न स्वप्नच राहील, असें वाटू
लागले दुर्याधानाच्या महत्त्वाकांक्षेने, शकुनीच्या कुटील नीतीने, आधीच अंध
असलेल्या धृतराष्ट्राने पुत्रप्रेमाने विवेकाचे सर्व दरवाजे बंद केल्याने त्या
स्वप्नांना आशेची पालवी फुटू लागली. एका क्रोधाच्या क्षणी स्वीकारलेल्या अंधत्वाबरोबर
आई म्हणून मुलांना योग्य मार्गावर चालण्याचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी मी झटकत
होते की मी जशी पूर्वी होते तशीच आजही असाहाय आहे. तेंव्हा आई वडील, भाऊ, भीष्म
ह्यांच्या पुढे आणि आता पती व पुत्रांपुढे. मागे न परतण्याच्या वाटेवर कौरवांची
वाटचाल सुरु झाली. पुढे घडला तो अतर्क्य नृसंहार. राहिले फक्त राजेपद, प्रजाहीन
राज्याचे.
आज वनात वानप्रस्थाश्रमात मागे वळून
बघतांना पुनःपुन्हा एकच विचार मनात येतो, काय उरलं
माझ्या हातात? ना मी महाराणी झाले, ना कुरुकुळाची
राजमाता. राजमाताच काय माता म्हणून घेण्याकरिता माझा एकही पुत्र जिवंत राहिला
नाही. स्वत:च पेटविलेल्या राज्य लोभाच्या वणव्यात सगळे जळून खाक झाले. ज्या
कुंतीचा आयुष्यभर मी द्वेष केला तिच्याच मुलांचे आश्रित म्हणून जगण्याची वेळ आली. भयंकरच
होते सारे आणि ह्याला जबाबदार कोण? माझे आईवडील, शकुनी, धृतराष्ट्र, भीष्म कां मी? मनोमन मी
सगळ्यांनाच श्रापित होते. कोणत्याही सूडाची किंमत ही मोजावीच लागते.