माझ्या नित्य रहिवासाची जागा सायन मुंबई
असून अर्थार्जनाची कर्मभूमी नवीन मुंबई असल्यामुळे न चुकता नित्य नेमाने, दररोज
(रविवार आणि सम शनिवार सोडून) सकाळी व संध्याकाळी (खरतर रात्री) सायन ते नवी मुंबई
आणि परत हा जवळजवळ जाऊन येऊन ५०-५५ किमी चा प्रवास घडतो. घडतो, असे म्हणण्याचं
कारण, सारथ्य सक्षमपणे सांभाळणाऱ्या चक्रधर स्वामींवर सर्व भिस्त ठेऊन मी मागील
आसनावर निर्धास्त बसतो आणि रथ जाईल तसा जात राहतो. सुरवातीला वेळेचा सदुपयोग करा, गेलेला क्षण
परत येत नाही वगैरे, बराच वेळ खर्ची पाडून, पूर्वी ऐकलेले सुविचार आठवून, वर्तमान
पत्र वाचनाने सुरवात करून, व्होट्सअॅप पर्यंत येऊन सर्व प्रयत्न सोडून दिले.
आता त्या वेळात काय करतो?, खिडकीच्या
बाहेर बघत बसतो. काय सांगू, खूप
गंमत आहे असं बघत बसण्यात. चालकांचे (बेस्ट ने प्रवास करायला लागे पर्यंत ड्रायव्हरला
मराठीत प्रती शब्द नाही असाच माझा समज होता) विविध नमुने पाहायला मिळतात. मला
नेहमी वाटत्तं की चालकांच्या स्वभावाच प्रतिबिंब त्यांच्या गाडी चालवण्याच्या
पद्धतीत दिसून येतें. वरवर बघता चालकांचे, चार गट त्यांच्या पंथ निवडीवरून मी पाडतो.
वाम, उत्तम, उपलब्ध
आणि स्वैर. पंथांच्या नावांवरून तुम्हाला त्यांच्या शिकवणीची व त्यांचे अनुसरण
करणाऱ्यांच्या स्वभावधर्माची थोडीफार कल्पना आली असेलच. तरी थोडं अधिक खोलात
शिरतो.
ज्या पंथाचे आचरण करणाऱ्यांना आणि त्यांच्या
सभोवती असणाऱ्या सर्वांस, सारखाच धोकादायक असणारा, अर्थात स्वैर पंथ. ह्या पंथाचे
अनुग्रहित साधारण १७-२५ वयोगटातील दिसतात, एखाद-दोन कमी किंवा जास्त. वेळ दिवसातील
कोणतीही. पण ह्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ सूर्यास्त नंतर जसजशी रात्र वाढत जाते
तशी होतें. मध्यरात्री नंतर काही ठरावीक रस्त्यांवर त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. ह्या
पंथाचं अनुसरण करणाऱ्यांची काही व्यवछ्छेदक लक्षणे आहेत. उदा. यांत्रिक दुचाकी, (मोटार सायकल वा मोटार बाईक) ही
प्रवासाच साधन नसून लोकांना घाबरवण्याचे वा मुलीबाळींमधील सूमार बुद्धिमत्तेच्या
वर्गाला प्रभावीत (प्रभे शिवाय) करण्याचे हत्यार आहे असा विश्वास. रहदारीचे नियमन
करणाऱ्या लोह पट्टी (सिग्नल) वरील लाल दिवा हा इतरांना थांबवून, स्वैर मार्गीयांनाच
जाण्याकरिता असतो अशी ठाम समजूत इत्यादी. ही मंडळी तुमच्या ध्यानीमनी नसताना
तुमच्या गाडीच्या डाव्या अथवा उजव्या (बहुदा डाव्याच) अंगाशी घसट करीत तुम्हा
समोरून तुम्हाला प्रसंगाचे आकलन हो होस्तो पुढील वाहनाशी लगट करीत त्याही
वाहनाच्या पुढे अदृश्य होतात. समोरील वाहनाला मागे टाकून या स्वैराचारींचे पुढे
जाणे सर्वस्वी तुमच्या नशीबावर अवलंबून असते. ही मंडळी ह्यांच्या वैयक्तिक जीवनात
देखील बेदरकार असावीत, योग्य
अयोग्य, चूक
बरोबर ह्याचा विचार न करता, परिणामांची
तमा न बाळगता, क्षणिक थरारा करता, रोमांचक अनुभव घेण्याकरता ह्यांच्या
हातून काहीही कृत्य घडू शकेल. एकूणच ह्यांची संगत टाळता आली तर उत्तम.
वाम मार्ग, ह्या मार्गाचे आचरण
करणारे उत्तम मार्गाच्या अगदी विरुद्ध असतात, पुढील वाहनाच्या डाव्या बाजूनेच पुढे जायचं असत
ह्यावर ठाम विश्वास ठेवणारे आणि ह्यात गैर काहीच नाही असं नुसते न मानता आचरणात
आणारे. तसं बघायला गेल तर हे लोक धाडसी असतात, धाडसी अशाकरता की, पुढील वाहन
चालकाच्या कृपेवर सर्वतः ह्यांचे जगणे अवलंबून असते. ह्यांचा वाममार्गावरून
जाण्याचा अट्टाहास बघितला कि कुठेतरी हे सर्व पांथस्थ डावरे असावेत आणि त्यांच्या
करता डावं हेच उजव असावे असं वाटतं, (खर सांगतो, डावऱ्यां लोकांनी गैरसमज करून घेऊ
नये पण हा संशोधनात्मक प्रबंधाला योग्य विषय आहे असें वाटते). ह्या मार्गावरून
जाण्याकरिता वयाची कोणतीही अट नसते. ह्यां पंथातील लोकांचा शेवट बहुतेक स्वैर
पंथांच्या मार्गाने जाण्याची मोठी शक्यता असते. ह्या मार्गाने जाणारी मंडळी बहुतेक
शोर्ट कट वर विश्वास ठेवणारी असवित. ‘जुगाड’ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात बहुतेक पहिल्या
पानावर असतो. ही मंडळी त्यामुळे लोकप्रिय असू शकतात पण त्यांच्या किती जवळ जायचं
हे ज्याच त्याने ठरवायचं आहे.
उपलब्ध मार्गीय, सहसा संधीसाधू
असतात. मार्गाच्या नावाप्रमाणेच कुठल्याही एका मार्गाचा आग्रह हे धरीत नाहीत. साधारणत:
पुढील वाहनाने निर्माण केलेल्या पोकळीचा फायदा घेत पुढे जाण्याच्या प्रयत्नात
दिसतात. वाम मार्गाचा वापर जर त्यांच्या करिता सुरक्षित असेल तर निषिद्ध नाही. सहसा
धोका पत्करत नाहीत आणि त्यांच्या पासून इतरांना धोका (त्याचा त्रास शेवटी त्यानाही
होणारच) पोहोचणार नाही असा त्यांचा प्रयत्न असतो. मुख्यत्वे सदैव स्वतःचा फायदा
बघणे इतकांच हेतू असतो. ही मंडळी ‘शेवट, अंगिकारलेल्या पद्धतीचे समर्थन करतो’ (End Justifies the Means) या विचारसरणीवर
विश्वास ठेवणारी असावीत त्यामुळे वैध, अवैध वगैरे भेद ते करीत नाहीत. ह्यांची संगत
नसली तरी फारसं बिघडणार नाही कारण फायदा शेवटी त्यांचाच होणार.
वरील तीन मार्गात विभागल्यावर उरणारी
बाकी मंडळी उत्तम मार्गाचा वापर करताना दिसतात. अर्थात ही संख्या तशी कमीच असते. तसं
बघायला गेलं तर ह्या मार्गाचे अनुकरण खूप सोपं आहे. रहदारीच्या नियमांचं पालन करणे,
वेळेवर निघणे वगैरे साधे सोपे नियम पाळण्याने ह्या मार्गाचे अनुकरण सहज शक्य आहे. नियम
पाळणे आणि इतर वाहनचालकांचा आदर करणे ही दोन पथ्ये पाळलीत तर गंतव्य ठिकाणी वेळेत
सुरक्षित पोहोचणे सहज शक्य आहे.
अर्थात आपला मार्ग आपणच
निवडायचा, सुज्ञास अधिक सांगणे न लगे!