Saturday, 27 March 2021

भीष्म

 

सूर्य कधीचाच मावळला होता. बहुदा अमावस्या असावी नभांगण तारकांनी खच्चून भरले होते. आकाश गंगेचा पट्टा त्या गर्दीतही उठून दिसत होता. दूर कुठेतरी कोल्हेकुई ऐकू येत होती. जवळच तरसांचे अशुभ हसणे ऐकायला येत होते. मधेच त्यांच्या दाताखाली फुटलेल्या हाडांचा आवाज त्या भेसूर शांततेचा भंग करीत माझ्या कानांपर्यंत पोहोचत होता. दिवसा गिधाडे, कुत्री, आणि सूर्यास्त होताच तरस, कोल्हे, महायुद्धात हकनाक मेलेल्या पशूंच्या मढ्यांवर ताव मारत असतात त्यांची पोट फुगून जमिनीला लागायची बाकी आहेत पण त्यांची मेजवानी काही संपत नाही. ज्या वीरांची पार्थिवं धड मिळाली त्यांच्यावर अग्निसंस्कार तरी झाले पण हत्तींच्या पायदळी दबुन, रथांच्या चाकाखाली भरडून जमिनीत गाडलेले मनुष्य देह तसेच कुजत पडले होते आणि हे रात्रींचर पुख्खा झोडत होते. अठरा अक्शौणी सैन्याचा संहार झाला होता. झालेला रक्तमांसाचा चिखल अजुन पुरता वाळला देखील नव्हता. एखादे तरस हुं हुं करीत माझ्या जवळ येतें आणि माझ्या जिवंतपणाची चाहूल लागताच दचकून माघारी फिरते.

या कुरुक्षेत्रावर महाभारतातील महासंग्राम झाला होता. महासंग्राम कशाकरिता? आंधळ्या महत्वाकांक्षेकरिता? दोन्ही बाजूंनी लढणाऱ्या सैनिकांचे एकमेकांशी काय वैर होते?, एकमेकांना ओळखत देखील नव्हते ते. भयावह होता तो नृसंहार. मी देवव्रत, मी भीष्म, भीष्माचार्य, भीष्म पितामह, कुरु वंशातील सर्वात वृद्ध सर्व साक्षी, महायुद्ध संपून अठरा दिवस लोटले. कुरुक्षेत्री शरशय्येवर, बाणांच्या तीक्ष्ण अग्रांवर माझा क्षीण देह तोललेला आहे आणि मी त्या वेदनांच्या पलीकडे जाऊन वाट पहातो आहे, उत्तरायण सुरु होण्याची वाट पहातो आहे.. या क्षणीही माझ्या आयुष्याचा क्षण अन क्षण माझ्या डोळ्यापुढे आहे मला विस्मरणाचे वरदान नाही.

शापीत गंगेच्या पोटी, शापीत अष्ट वसूंपैकी एक, देवव्रताच्या रूपाने जन्माला आला. वसिष्ठ ऋषींच्या शापामुळे आणि इंद्राच्या आज्ञेमुळे पृथ्वीवर मनुष्य योनीत जन्म घेणे अष्ट वसूंना क्रमपात्र होते आणि ब्रह्मदेवाने दिलेल्या शापामुळे कुरु राजा शंतनुची पत्नी होणे स्वर्ग लोकीच्या गंगेला अपरिहार्य होते. अष्ट वसुंनी गंगेला विनंती केली की आम्हाला तुझ्या पोटी जन्माला येउदे आणि जन्मत:च तू आमचा मनुष्य जन्म संपवून टाक. ठरल्याप्रमाणे सात वसूंना गंगेने नवजात अवस्थेतच पाण्यात बुडवून मुक्ती दिली पण शंतनुच्या विरोधामुळे आठव्या वसुला मात्र मनुष्य योनीत जगावं लागलं आणि खऱ्या अर्थाने शाप भोगावा लागला. आधीच ठरल्याप्रमाणे शंतनुला सोडून मला हृदयाशी कवटाळून गंगा, माझी माता स्वर्ग लोकी परत आली. क्षत्रियाला योग्य अशा अस्त्रशस्त्रा सहित सर्व विद्यात मी तेथेच पारंगत झालो. कुरु वंशाला साजेसा तरुण राजकुमार म्हणून मातेने मला माझ्या पित्याकडे, हस्तिनापूरचे महाराज शंतनु ह्यांच्या स्वाधीन केले. ती माझ्या वडिलांची आणि माझी पहिली आणि माझी माझ्या मातेशी शेवटची भेट.

देवव्रताला, ज्या प्रतिज्ञेमुळे त्याला भीष्म ही उपाधी प्राप्त झाली त्या प्रतीज्ञेकडे जरा पाहू. माझ्या पित्याच्या, शंतनुच्या, सत्यवतीशी विवाह करण्याच्या मागणीला, दशराजाचा, सत्यवतीच्या पित्याचा विरोध होता. देवव्रत, शंतनुचा थोरला पुत्र, हस्तिनापूरचा अभिषिक्त राजकुमार आणि गादीचा वारस जिवंत असतांना सत्यवतीच्या संततीला सत्ता मिळणे दुरापास्त होते. पिता म्हणून आपल्या कन्येचे हित तो पहात होता. आपल्या पित्याची इच्छा पूर्ण करण्याकरिता मी हस्तिनापुराच्या सिंहासनावरचा आपला हक्क सोडून दिला. ज्या वयात वानप्रस्थाश्रमाचा विचार करायचा त्या वयात माझा पिता लग्नाचा विचार करीत होता. कां सोडला मी माझा अधिकार? तेव्हढ्याने दशराजाचे समाधान झाले नाही. दशराज विचारता झाला “देवव्रता, तुझ्या मुलांचं काय? उद्या ती सत्तेवर अधिकार सांगतील आणि सत्यवतीच्या मुलांबरोबर त्यांचा कलह होणार नाही ह्याची खात्री तू कशी देशील?” दशराजाला कुरु कुळातील गृह कलह बहुदा आधीच दिसला होता. उत्तरा दाखल मी तेथे हजर असलेल्या लोकांच्या समक्ष प्रतिज्ञा केली “आजन्म ब्रह्मचारी राहीन” प्रतिज्ञा लग्न न करण्याची नव्हती कारण राज घराण्यात विवाहेतर संतती होणे गैर मानले जात नव्हते. थोडक्यात कोणत्याही परीस्थित मी कुरु कुलाचा वंश पुढे चालवणार नाही ही प्रतिज्ञा. खरचं का मला, सत्तेची आस नव्हती? प्रतिष्ठित कुरु सिंहासनावर बसण्याची इच्छा नव्हती?  कां त्यागाची देखील एक प्रकारची झिंग असते.. मद्याच्या पेल्यागत, एक रिचवल्यावर दुसरा आणि मग तिसरा सहज उचलला जातो. चढत्या क्रमाने मी त्यागाची परिसीमा गाठली. जर मी नकार दिला असता तर?  महासंग्राम घडला नसता?

घोर प्रतिज्ञा कि अघोरी प्रतिज्ञा? जेव्हा कुरु कुळाला वंशाची नितांत गरज होती (सत्यवतीचा दुसरा मुलगा विचीत्रवीर्य, याच्या अकाली मृत्यू नंतर) आणि तो देणे ही कुरु कुळातील हयात पुरुष म्हणून सर्वस्वी माझी जबाबदारी होतीं ती जबाबदारी मी ह्या प्रतिज्ञेमुळे पार पडू शकलो नाही. माझ्या असाह्यते मुळे महर्षी व्यासांना (सत्यवतीला पराशर मुनीं- पासून झालेला पहिला पुत्र, विचीत्रवीर्याचा सावत्र भाऊ) विचीत्रवीर्याच्या विधवांना नियोगाने संतती धारण करण्याकरिता  पाचारण केले गेलं. परिणामत: अंध धृतराष्ट्र, नपुंसक पंडू आणि दासी पुत्र विदुर ह्यांचा जन्म. तिघेही हस्तिनापूरच्या राज्य पदासाठी अयोग्य. काय मिळालं मला माझ्या प्रतिज्ञेमुळे? ना माझा.. ना कुरु कुळाचा.. कोणाचाच फायदा झाला नाही. किंबहुना दशराज जे टाळण्याचा प्रयत्न करीत होता ते घडवून आणण्यात माझ्या प्रतिज्ञेने हातभारच लावला.

जे करायचं नव्हतं तेच करीत आलो. प्रथम आपल्या सावत्र भावाचा विवाह. आपली नाही तर त्याच  भावाच्या विधवांना नियोगानी झालेली मुले सांभाळली, त्यांचे विवाह केले. त्यांच्या मुलांचा म्हणजे माझ्या नातवांचा सांभाळ केला आणि ज्या कुरु कुळाच्या सिंहासनावर बसण्यास, सत्ता उपभोगण्यास नकार दिला होता, तीच सत्ता अनिर्बंध, अनभिषिक्त अनुभवली. जो गृह कलह टाळण्याचा प्रयत्न केला त्या वितुष्टाची परिणीती म्हणून आज शरशय्येवर एकटा पडून, देह त्यागाच्या योग्य वेळेची वाट पाहत आहे.

खरचं काय मिळवलं मी? क्षत्रिय धर्माला अनुसरून योद्धा म्हणूनही कधी माझं नाव झाल नाही. काशी राजाच्या कन्या (अंबा, अंबिका आणि अंबालिका) ह्यांच स्वयंवरातून हरण करतांना कुरु कुळाचा प्रभाव कामी आला. काशी राजानेही विचार केला असेल कुरु कुळाशी सोयरिक होत असेल तर विरोध का करावा? गांधार देशाच्या राजकन्येचा अंध धृतराष्ट्राशी केलेलेला विवाह असो किंवा कुंती, माद्रीचा नपुंसक पंडूशी विवाह असो, केवळ कुरु कुळाशी संबंध जुळून येत होता म्हणून चालून गेलं. त्यात माझं श्रेय काहीच नाही. ह्या स्त्रियांचे मिळाले असतील तर शापच. (हा एक वेगळाच विषय आहे). युधिष्टीराने केलेल्या राजसूय यज्ञाच्या सांगतेचे यजमानपद शिशुपाल सांगत असताना देखील स्वीकारण्याचे धाडस मला झाले नाही. राजसभेत द्रौपदी वस्त्र हरणाच्या वेळी हस्तक्षेप करून चाललेला प्रकार मी थांबवू शकलो नाही. कां मला खात्री नव्हती, कि मी थांब म्हटल्यावर धृतराष्ट्र पुत्र माझ ऐकतील? दुर्योधनाच्या नादाने विराटाच्या गोधनाचे हरण करण्याकरिता कुरुसेने सोबत गेलो आणि एकट्या अर्जुनाच्या हातून कर्णद्रोणा सहीत सर्वजण पराभूत होऊन शरमेने माना खाली घालून हस्तिनापुरी परत आलो .

काय केलं नाही मी गुह कलह टाळण्याकरिता? माझ्या प्रतिज्ञेचा तोच तर खरा अर्थ होता. शेवटचा प्रयत्न म्हणून दुर्योधनाने दिलेले कौरव सेनेचे सेनापतीपद मी स्वीकारले. दुर्योधनाने जे केवळ औपचारिकता म्हणून देऊ केले होते. अर्जुन माझ्या विरोधात लढणार नाही आणि तह होऊन यातून मार्ग निघेल असें वाटत होते पण कृष्णाला हे मंजुर नव्हते त्याने अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केले. माझ्या अधिपत्याखाली मी महायुद्धाचे पहिले नऊ दिवस जणू लुटुपुटीचे युद्ध खेळत होतो. दोन्ही पक्षांकडून कोणताही महत्वाचा योद्धा धारातीर्थी पडला नाही. हे फार दिवस चालणे शक्य नव्हतं. नवव्या दिवशी कृष्णाने रथातून उतरून मी भीष्माचा शेवट करतो असें सुचविले होते. त्यालाही युद्ध खऱ्या अर्थाने व्हायला हवे होते. द्रोण, कर्ण इत्यादी महारथी ही लुटूपुटीची लढाई फार काळ चालू देणार नव्हते. मार्ग एकच होता युद्धात धारातीर्थी पडणे. दक्षिणायन सुरु असल्यामुळे मृत्यू येऊन चालणार नव्हतं पण युद्धातून बाजूला होणे अत्यावश्यक होते. कृष्ण पांडवांचा त्राता असताना पांडवांचा पराभव केवळ अशक्य होता. मी सेनापती पदावर असताना कौरव हरते तर  ह्याहून मोठी नामुष्की नव्हती. तेंव्हा माझ्या पतनाचा मार्ग मीच भोळ्या युधिष्टिराला दाखवला आणि शिखंडीला पुढे घालून अर्जुनाने सोडलेल्या बाणांनी मी धारातीर्थी पडलो. शरशय्येवर पडून आज उत्तरायणाची वाट पहातो आहे.

मागे वळून पहाताना एक गोष्ट निश्चित जाणवते भीष्म प्रतिज्ञेच्या बदल्यात जे मिळालं त्याच महत्व मला कळलंच नाही. मला काय मिळालं? तर शंतनु कडून इच्छा मरणाचा वर!! खरंतर केवढे मोठे वरदान होते ते. सात वसुंनी गंगेच्या मदतीने शापातून मुक्तता मिळवली होती आणि ह्या आठव्या वसुला खुद्द त्याच्या पित्याने नेमकी तीच संधी उपलब्ध करून दिली होती,  “जा शापातुन मुक्त हो, स्वगृही, स्वर्गात जा”. त्या वरदानाच मी काय केलं तर उत्तरायणाची वाट बघण्याकरिता वापरलं. काय चुकल माझं? नात्याने कौरव, पांडव दोघेही मला सारखेच मग मी असत्याची बाजू घेऊन कौरवांकडून का लढलो? कृष्ण पांडवांच्या बाजूने आहे ह्यातच निर्णय झाल्यासारखाच होता. मी पांडवांच्या पक्षात गेलो असतो तर काही वेगळ घडलं असत का? कां कौरवांचा मिंधा झालो होतो मी? कां सारा दोष नियतीचा म्हणायचा आणि आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त व्हायचं?    

मी शापीत म्हणून जन्माला आलो आणि शापीत म्हणूनच जाणार हेच खरं!

Thursday, 4 March 2021

चहा

हा विषय खरेतर चहा पितापिता बोलून संपविण्याचा नाही. आजपर्यंत ह्या विषयावर जगभरात इतकं लिखाण झाल असेल, कि त्याची पानं मोजली तर आसामातल्या चहाच्या मळ्यातील पानांपेक्षा कदाचित जास्त किंवा तितकी तरी नक्कीच भरतील. मी त्यात भर घालण्याच्या विचारात नाही. पण .. नेहमीचच, जित्याची खोड ..

चहा कसा असावा ह्या वर तज्ञ मंडळीत बरीच मतमतांतर असतील, पण माझ्या दृष्टीने तो कसाही चालतो. फक्त हवा तेंव्हा नेमका मिळाला पाहिजे आणि नाही म्हणायला चहा गरम असावा. (कोल्ड टी च्या जमान्यात ह्यावरही वाद होईल).  

जपानी आणि चिनी बांधवांनी (उल्लेख करायला पण हल्ली भीती वाटते) चहा पिण्याच्या या सोप्या साध्या क्रियेचा उत्सव केला आहे. छोटे छोटे सुरेख कलाकुसर केलेले चिने मातीचे कान नसलेले कप (चषक, पेला चहाला योग्य नाही वाटत), त्यांची ताई शोभेल अशी पण नाजूक किटली. त्यातून बाहेर पडताना वाफ देखील बहुदा जपानी संगीताच्या लयीत बाहेर पडत असेल. पाय मुडपून जमिनीवरच्या आसनावरची बैठक. चहाचा हवेत दरवळणारा तो तरल सुगंध. (वास नव्हे. आलं उकळताना येतो तो.. तोही काही वाईट नसतो म्हणा) त्यात मिसळलेला धुपाचा मंद गंध. (धूप कांडी नव्हे) अहाहा! त्यात अदबीने, सुहास्य मुद्रेने, ते देखील, त्या माहोलाला साजेसं (वातावरण चालला असता.. पण माहोलात आहे ते वातावरणात नाही) हाताच्या अंजलीतून (ओंजळीत आणि अंजलीत काही तरी फरक आहे?) दिलेला तो कप, तितक्याच हळुवार पणे आपल्या हातात घेतल्यावर, बाकीच्या कषायांच्या हातात कप जाई पर्यंत  थांबून,  किंचित वाकून अभिवादन केल्यागत करून, मगच तो कप ओठाला लावायचा. हुश्श!!

माझा चीन मधला अनुभव सांगण्यासारखा आहे. एका मिटिंग मध्ये कुल्लड सारखेच पण त्याहून मोठे आणि वर कलाकुसर असलेले कप ग्रीन टीने भरून ठेवले होते. चहा गरमच प्यावा या नियमानुसार मी तो संपवला. जणू अदृष्यातून अवतरावी तशी एक सेविका अवतरली आणि तत्परतेने तिने तो भरला. कमरेत थोडं झुकून सुहास्य वदनाने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून ती पुन्हा अनंत्तात विलीन झाली. हे इतकं वेगाने घडलं की काही समजे पर्यंत तो वाफाळलेला कप माझ्या अधरांची अधिरतेने वाट बघताना दिसला. त्या वातानुकुलीत कक्षात मलाही मोह आवरला नाही आणि मी तो रिता केला. त्या चपळ बालिकेने मला पुनः प्रत्ययाचा आनंद देत माझा रिकामा कप पुन्हा भरला आणि मीही तिला नाराज केलं नाही. अस दोन तीन वेळा घडल्यावर काहीतरी चुकतंय हे माझ्या लक्षात आलं. ग्रीन झाला म्हणून काय झालं शेवटी पाणीच ना? त्यातून वातानुकुलीत कक्ष. पाण्याने आपल काम केलं. माझी अवस्था काय झाली होती म्हणून सांगू, एकतर स्त्री दुभाष्या मार्फत संवाद साधण्याचा प्रयत्न करत चाललेली सभा, माझ्या अवस्थेचे तिला काय वर्णन करायचं आणि काय विचारायचं? सगळा प्रसंगच. मिटिंग संपण्याची एव्हढ्या आतुरतेने मी खचितच वाट पहिली असेल.

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात, तद्वत, जितक्या प्रकृती तितके चहाचे प्रकार असें म्हणायला हरकत नाही.  इराणी, मसाला, ग्रीन, काळा, हरबल, निलगिरी, इत्यादी आणि हल्ली नव्याने लोकप्रिय होणारा म्हणजे तंदुरी, बासुंदी. शेवटचा प्रकार चाखायचा अजून धीर झालेला नाही.

बाकी काय असेल ते असो, पण टपरी वर दोस्तांबरोबर कटिंग मारण्यात (पिण्यात नाही) जी मजा आहे ती काही औरच. त्यातून भटाचा चहा. त्याला चहा बनवताना बघणे म्हणजे एखाद्या वाद्यावृंदाला हजेरी लावण्यागत आहे. फरक इतकाच की इथे रचनाही त्याचीच आणि वादकही तोच. त्याच्या पितळी कषाय पात्रात (त्याला धरायला एक दांडी असते आणि त्या दांडीला एक कळकट्ट फडके गुंडाळलेले असते) एक पितळी पळी उलट सुलट वेगाने, दूध कडेला किवा तळाला लागणार नाही ह्याची दक्षता घेत फिरत असते. आपल्या अस्तित्वाचा जागर करीत, भट अधून मधून ती पळी भांड्याच्या कडेवर आपटून (बहुदा दोनदाच) नाद करीत असतो. माप म्हणाल तर चहा, साखर मुठीने टाकली जाते. दूध, बाजूच्या ग्यास स्टोव्हवर उकळत असते आणि चहाच्या पातेल्यातील पळी, पळीतला चहा दुधात न पडता चपळाईने भरून घेत कळेकळे पर्यंत पुन्हा चहाच्या भांड्यात प्रविष्ट होत एक सफाईदार गिरकी घेते. खलबत्यातील आलं आणि वेलची (सालच दिसतात बहुदा) कुटून एकत्र केलेलं मिश्रण त्या उकळत्या रसायनात पडतं. हे सर्व चालू असताना, उजव्या हाताने चार किंवा पाच काचेचे ग्लास खाली ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत बुचकळून समोर उपडे ठेवले जातात. खरी गंमत पुढेच आहे, कषाय पात्रातील त्या उकळत्या रसायनाचे काही थेंब पळीने भट आपाल्या तळहातावर घेऊन चाखतो. अजून मी तरी भटाला त्या स्थितीतील चहात बदल करताना पाहिलेले नाही. पुढल्या क्षणी दोन्ही हातांनी कषाय पात्राची दांडी धरत समोरील फडक्याने (ज्याचा मूळ रंग काय असेल हे ब्रह्मदेवाला ही सांगणे शक्य नाही) झाकलेल्या भांड्यात उपडे करतो. कषाय पात्र पुन्हा धगधगत्या स्टोव्हवर चढवले जाते. त्यातील पळीने पायाशी असलेल्या दुसऱ्या बादलीतून (ग्लास बुचकळलेल्या नव्हे, तसा दोन्ही बादलीतील पाण्याचा रंग सारखाच असतो) पाणी भराभर भांड्यात घेऊन पुढील आधण ठेवले जाते. फडक्यातील चहा तोपर्यंत खालच्या भांड्यात जमा होतो. पण त्याने भटाचे समाधान होत नाही. मग हातातील सांडशीच्या (तेव्हढाच उपयोग पहिलाय सांडशीचा) मदतीने त्या फडक्यातील चहा पिळून घेतला जातो. फडक्यावरील चहाचा चोथा सफाईने गिऱ्हाईकांच्या मागे ठेवलेल्या डब्यात रिकामा होतो आणि गिऱ्हाईक देखील तितक्याच तत्परतेने भटाला वाट करून देतात. आता हे अभूतपूर्व रसायन उर्फ चहा नुकत्याच निथळलेल्या ग्लासात ओतून, हातात कमीत कमी तीन ग्लास घेऊन गिऱ्हाईकला पेश केला जातो. रोजचे गिऱ्हाईक (भटाकडे उकळा, (चहा नव्हे) व कॉफी देखील मिळते, पण ते काही खरे नव्हे) तितक्याच सफाईने तो गरम ग्लास अंगठा, तर्जनी व मधलें बोट या मध्ये पकडत, दोन पाऊले मागे होत नवीन गिऱ्हाईकांना जागा करून देते. भटाची कलाकारी, डोळे भरून पाहिल्यावर, गरम गरम चहाचे चवी चवी ने घुटके घेत दोस्तांच्या संगतीत रसनेला तृप्त करण्याचे सुख भाग्यवन्तानाच लाभते.

खरंतर चार दोन घोटातच चहा संपतो. चहा निमित्त असतो. दोस्तांबरोबर वेळ घालवण्यातच आनंद असतो. अर्थात त्यामुळे चहाचं महत्व काही कमी होत नाही.