कृष्णेने उचले
पर्यंत, गेले किती युग त्या डोहांकाठी पडून होतो, कोण जाणे. काळा शाळीग्राम,
काळ्याशार पाण्याचा डोह, काठावर पाण्यात पाय सोडून अनंत काळापासून उभ्या असलेल्या
वृक्षांच्या सावल्यांनी अधिकच गडद भासणारा. कृष्णेने हलक्या हाताने मला थंडगार
पाण्यात सोडले. शहारलो, त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने, पाण्याने अजून
मला आपल्या मिठीत घ्यायचे होते. माझं लक्ष कृष्णेच्या चेहेऱ्याकडे गेलं. महायुद्धाच्या
आगी पेक्षाहि धगधगणारी ती नजर शांत, गंभीर, या डोहाच्या पाण्यासारखी भासली. आणि हे
काय? कृष्णेने आपले केस, ह्या महासंहाराला कारणीभूत ठरणारे आणि त्याचा शेवटही
करणारे हे केस, आज मोकळे सोडले आहेत. मला कृष्णेची माफी मागावीशी वाटली. खरतर अनेक
वेळा वाटलाय तसं, पण नाही मागितली.
कृष्णेने केस
का मोकळे सोडावेत, मुळात
बांधावेतच कां? भीमाची गर्जना आठवते ना, भर राजसभेत दुर्योधनाने आपली जांघ थोपटून कृष्णेस
बसण्यास खुणावले ती जांघ गदेच्या प्रहाराने फोडणारा भीम! कपटाने? कोणी, कोणी कपट नाही
केलं? की
कपटी होण्याचा मक्ता फक्त शकुनी नी कौरवांकडेच होता? हो केलं कपट, पण दुर्योधनाचा तर वध
केला? दुःशासनाने, हेच काळेभोर केस धरून कृष्णेला फरफटत राजसभेत आणली, ती रजस्वला
एक वस्त्रा असताना. भर राजसभेत, माना खाली घालून बसलेल्या वयोवृद्ध, ज्ञानी,
लाचारीने कृती शून्य झालेल्या भीष्म, द्रोणांसमोर, हर्शोन्मत्त होऊन, पुढे सांग, पुढे
सांग असें विदुराला विनावणाऱ्या अंध बापासमोर, धृतराष्ट्रा समोर, कृष्णेची वस्त्र फेडणाऱ्या
दुःशासनाची छाती फोडून ते उन उन रक्त प्राशन करून त्या रक्ताने माखलेल्या हातानी
कृष्णेचे केस बांधण्याची घन गर्जना करणारा तो भीम. हा भीम आपले चारही भाऊ,
कृष्णेचे पाचही पती हजर असताना आपल्या पत्नीची विटंबना टाळू शकला नाही. पुरुषार्थ
कशात तर सुडात, म्हणे सूड घेतला. मी सूड घेतला म्हणून कृष्णे तू केस बांध नव्हे मी
बांधतो. त्या रक्ताने बरबरबटलेल्या हातांनी भीमाने कृष्णेची वेणी घातली. तिने कुठे
बांधले तिचे केस? मी
नसतो तर त्या दिवशी काय झाल असत? कल्पनाच न केलेली बरी. तुला सम्राज्ञी बनवलं आणि
साम्राज्य कसल तर शत शत विधवा स्त्रिया, माता, असंख्य अश्राप अनाथ बालके आणि गत योध्यांचे
श्रापणारे वृद्ध माता पिता. माता म्हणून कृष्णेच्या पदरी काय पडलं तर इतक्या
पुत्रांची माता असून निपुत्रिक मरण्याचच ना? कृष्णे तुझ कौतुक करावं तेवढ थोडच आहे.
एव्हढया घोर प्रसंगात सुध्दा समयसूचकता शाबूत ठेवून तुझ्या निष्क्रिय पतींना तू दास्य मुक्त केलंस. माहित होत मला हे असच होणार. नाही, कृष्णे अनेक
वेळा वाटून देखील माफी मागायला जीभ रेटली नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व
टाळू शकलो असतो?
पाण्याने आता
मला पूर्ण वेढून घेतलं होत, खाली
वर चहु बाजूला पाणीच होत. हळूहळू अंगाखालची हवा एकदा ह्या कुशीने एकदा त्या कुशीने
अशी सोडत तळाकडे जात होतो. हवेचे बुडबुडे जळाच्या पृष्ठभागावर आवाज न करता फुटून
तरंग निर्माण करीत होते. कृष्णेची नजर त्या तरंगांचा मागोवा घेत डोहाच्या काठा
पर्यंत जात होती. पाण्यातून कृष्णेकडे बघताना ती खूप सुंदर दिसत होती, अनंत
भोगलेल्या वेदनांचा मागमूसही नव्हता त्या चेहेऱ्यावर. सुंदर स्त्री माझ्या
आयुष्यात काही नव्याने पहात नव्हतो. असंख्य गोपी ज्यांची नावे इतिहासाला नोंदताच
आली नाहीत, राधा, रुक्मिणी, सत्यभामा,
सोळा सहस्त्र स्त्रियांचा मी पती, पण कृष्णेच्या सौंदर्याची प्रत आज काही निराळीच
भासत होती. सहस्त्र दीपांनी झगमगणाऱ्या दीपावलीचा प्रकाश, लख्ख चमकून
डोळे दिपवणाऱ्या विद्द्युलतेचा प्रकाश आणि देवघरात तेवणाऱ्या शांत समईचा प्रकाश.
प्रकाशच! पण एक दुसऱ्यां सारखा नाही. तसच काही सौंदर्याच असतं. समईच्या निरागस मंद
तेवणाऱ्या ज्योतीच्या रूपावर जाऊ नका. नको तेवढे जवळ गेलात तर दाह केल्याशिवाय
राहणार नाही. ह्या शांत शालीन सौंदर्याचा
देखील महायुद्धात सहभाग होता. तिच्या सौंदर्याची महती ऐकून स्वयंवराला आलेल्या रथी
महारथीं मध्ये कर्ण, दुर्योधन आणि महायुद्धात कौरवांच्या बाजूने युद्धात उतरलेले
अनेक राजे महाराजे हजर होते आणि त्या सर्वांना जे शक्य झालं नाही ते माझ्या परम
मित्राने, अर्जुनाने सहजी केलं. अर्थात त्या वेळी माझ्या अस्तित्वाची दखल कोणी
घेतली नाही. पण अर्जुनाला वरमाला घातल्यावर कृष्णेने मजकडे बघून केलेले स्मित बरच
काही सांगून गेलं. याज्ञसेनी ती, यज्ञाच्या ज्वाळातून जन्माला आलेली अग्नी शिखाच
ती. दहन करण हा तिचा स्थायी भाव. कां पाचांना मुठीत धरायला लावली? ती तर जळणार आणि
त्यानाही जाळणार. माहित होत मला कोणी कोणी म्हणून सुखी होणार नाही. कृष्णे
कितीवेळा तुझ्या समोर आलो माफी मागायला. पण तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीरच झाला
नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व टाळू शकलो असतो?
लडिवाळपणे
आंजारत गोंजारत पाणी मला तळापर्यंत घेऊन गेल. तळातल्या वाळूने देखील थोड बाजूला
सरून मला जागा करून दिली. तळातल्या मऊ मुलायम वाळूत स्थिरावल्यावर मी पुन्हा
कृष्णे कडे बघितलं, ती
माझ्या बघण्याची जणू वाटच बघत होती, नजरेत क्षणभर निर्भत्सना वाटली. छे कसं शक्य
आहे कृष्णेच्या नजरेत माझ्या बद्दल फक्त आणि फक्त प्रेमच असू शकत. मी श्रीहरी,
कायम तिची सोबत करणारा,
तिच्या एका हाकेत धावून येणारा तिचा मित्र. कौरवांच्या सभेतील ती घृणास्पद घटना वा
धुऊन पालथ्या घातलेल्या अक्षय थाळीतून सुग्रास पक्वान्नांच्या पंक्तीच्या पंक्ती
उठवून दुर्वास मुनिंच्या क्रोधाग्नी पासून पांडवांना वाचविणारा, अडी अडचणीला धावून
येणारा संकट विमोचक असा सखा. माझी निर्भत्सना केवळ अशक्य, का हे माझ्या
मनाचेच खेळ आहेत. नाही निर्भत्सना निश्चित नाही पण कणव, सहानुभूती?
मला नेहेमीच असं वाटत आलाय कि कृष्णेला सगळ माहित आहे, कळतंय सगळ
तिला. पण तरी मी तिची माफी मागायला हवी होती. टाळू शकलो असतो मी. मी हे टाळू शकलो
असतो?. खरंच? खरंच
का मी हे टाळू शकत होतों?
स्वतःला कर्ता करविता म्हणवतो मग टाळणार कसं. खरच जे मी करतो ते स्वयं इच्छेने
करतो?, कि कधी होणारं आहे, काय होणार आहे हे नेमकं माहित असलेला मी, केवळ मी एकटाच,
म्हणून करविता?.
सूर्य बहुदा
अस्ताला कलला. सावल्या अधिकच गडद झाल्यात त्यात कृष्णेने नेमके केस मोकळे सोडलेत.
तिचा चेहेरा नीट दिसत नाही आहे. नजरही नेमकी उमगत नाही. कृष्णेच्या नजरेत नेमकं
तेच तर म्हणायचं नसेल. नियतीच्या नियमांना मी देखील अपवाद नाही. नाहीतर पारध्याचा
बाण नेमका माझ्या अंगठ्याला कसा लागता? माफी मागण हा देखील माझ्या मोठे पणाचाचं भाग. हेच
बघाना पांडवांच्या बाजूने लढलो कौरवांच्या नाशाला ते स्वतः सोडले तर मीच खरा
जबाबदार. तरी एव्हढा सुद्धा वाईट पणा माझ्या वाटेला आला नाही. मी कायम वंदनीयच
राहिलो. कर्णाची तर गोष्टच वेगळी, कर्ण, कर्ण का आठवावा या क्षणी? कृष्णेशी आणि
कर्णाशी माझ नात सारखच होत, खर
नाही वाटत? ज्यांच्या वाटेला टोकाच दुःख येत साहजिकच ते मला अधिक जवळचे वाटतात.
आता कृष्णा जवळ
जवळ दिसतच नाही. मुळात ती सावळी, ती जिथे आहे तिथला काळोख जरा जास्त गर्द वाटतोय
इतकंच. माफी? कसली माफी मागणार होतो मी? खरच का टाळू शकणार होतो मी महाभारत? नियतीचे
प्रत्येक पाउल ठाऊक असलेला मी, असहाय, फक्त साक्षीदार!.
युगे न युगे
ह्या डोहाच्या काठी शाळीग्राम होऊन पडलो होतो, पांडव संन्यस्थ होऊन निघाले म्हणून कृष्णा इथे
पोहोचली आणि तिच्या हाताने जलसमाधी मिळाली, तिची कसली माफी मागणार होतो मी?