Friday, 10 April 2020

कृष्णा


कृष्णेने उचले पर्यंत, गेले किती युग त्या डोहांकाठी पडून होतो, कोण जाणे. काळा शाळीग्राम, काळ्याशार पाण्याचा डोह, काठावर पाण्यात पाय सोडून अनंत काळापासून उभ्या असलेल्या वृक्षांच्या सावल्यांनी अधिकच गडद भासणारा. कृष्णेने हलक्या हाताने मला थंडगार पाण्यात सोडले. शहारलो, त्या थंडगार पाण्याच्या स्पर्शाने, पाण्याने अजून मला आपल्या मिठीत घ्यायचे होते. माझं लक्ष कृष्णेच्या चेहेऱ्याकडे गेलं. महायुद्धाच्या आगी पेक्षाहि धगधगणारी ती नजर शांत, गंभीर, या डोहाच्या पाण्यासारखी भासली. आणि हे काय? कृष्णेने आपले केस, ह्या महासंहाराला कारणीभूत ठरणारे आणि त्याचा शेवटही करणारे हे केस, आज मोकळे सोडले आहेत. मला कृष्णेची माफी मागावीशी वाटली. खरतर अनेक वेळा वाटलाय तसं, पण नाही मागितली.

कृष्णेने केस का मोकळे सोडावेत, मुळात बांधावेतच कां? भीमाची गर्जना आठवते ना, भर राजसभेत दुर्योधनाने आपली जांघ थोपटून कृष्णेस बसण्यास खुणावले ती जांघ गदेच्या प्रहाराने फोडणारा भीम! कपटाने? कोणी, कोणी कपट नाही केलं? की कपटी होण्याचा मक्ता फक्त शकुनी नी कौरवांकडेच होता? हो केलं कपट, पण दुर्योधनाचा तर वध केला? दुःशासनाने, हेच काळेभोर केस धरून कृष्णेला फरफटत राजसभेत आणली, ती रजस्वला एक वस्त्रा असताना. भर राजसभेत, माना खाली घालून बसलेल्या वयोवृद्ध, ज्ञानी, लाचारीने कृती शून्य झालेल्या भीष्म, द्रोणांसमोर, हर्शोन्मत्त होऊन, पुढे सांग, पुढे सांग असें विदुराला विनावणाऱ्या अंध बापासमोर, धृतराष्ट्रा समोर, कृष्णेची वस्त्र फेडणाऱ्या दुःशासनाची छाती फोडून ते उन उन रक्त प्राशन करून त्या रक्ताने माखलेल्या हातानी कृष्णेचे केस बांधण्याची घन गर्जना करणारा तो भीम. हा भीम आपले चारही भाऊ, कृष्णेचे पाचही पती हजर असताना आपल्या पत्नीची विटंबना टाळू शकला नाही. पुरुषार्थ कशात तर सुडात, म्हणे सूड घेतला. मी सूड घेतला म्हणून कृष्णे तू केस बांध नव्हे मी बांधतो. त्या रक्ताने बरबरबटलेल्या हातांनी भीमाने कृष्णेची वेणी घातली. तिने कुठे बांधले तिचे केस? मी नसतो तर त्या दिवशी काय झाल असत? कल्पनाच न केलेली बरी. तुला सम्राज्ञी बनवलं आणि साम्राज्य कसल तर शत शत विधवा स्त्रिया, माता, असंख्य अश्राप अनाथ बालके आणि गत योध्यांचे श्रापणारे वृद्ध माता पिता. माता म्हणून कृष्णेच्या पदरी काय पडलं तर इतक्या पुत्रांची माता असून निपुत्रिक मरण्याचच ना? कृष्णे तुझ कौतुक करावं तेवढ थोडच आहे. एव्हढया घोर प्रसंगात सुध्दा समयसूचकता शाबूत ठेवून तुझ्या निष्क्रिय पतींना तू दास्य मुक्त केलंस.  माहित होत मला हे असच होणार. नाही, कृष्णे अनेक वेळा वाटून देखील माफी मागायला जीभ रेटली नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व टाळू शकलो असतो?

पाण्याने आता मला पूर्ण वेढून घेतलं होत, खाली वर चहु बाजूला पाणीच होत. हळूहळू अंगाखालची हवा एकदा ह्या कुशीने एकदा त्या कुशीने अशी सोडत तळाकडे जात होतो. हवेचे बुडबुडे जळाच्या पृष्ठभागावर आवाज न करता फुटून तरंग निर्माण करीत होते. कृष्णेची नजर त्या तरंगांचा मागोवा घेत डोहाच्या काठा पर्यंत जात होती. पाण्यातून कृष्णेकडे बघताना ती खूप सुंदर दिसत होती, अनंत भोगलेल्या वेदनांचा मागमूसही नव्हता त्या चेहेऱ्यावर. सुंदर स्त्री माझ्या आयुष्यात काही नव्याने पहात नव्हतो. असंख्य गोपी ज्यांची नावे इतिहासाला नोंदताच आली नाहीत, राधा, रुक्मिणी, सत्यभामा, सोळा सहस्त्र स्त्रियांचा मी पती, पण कृष्णेच्या सौंदर्याची प्रत आज काही निराळीच भासत होती. सहस्त्र दीपांनी झगमगणाऱ्या दीपावलीचा प्रकाश, लख्ख चमकून डोळे दिपवणाऱ्या विद्द्युलतेचा प्रकाश आणि देवघरात तेवणाऱ्या शांत समईचा प्रकाश. प्रकाशच! पण एक दुसऱ्यां सारखा नाही. तसच काही सौंदर्याच असतं. समईच्या निरागस मंद तेवणाऱ्या ज्योतीच्या रूपावर जाऊ नका. नको तेवढे जवळ गेलात तर दाह केल्याशिवाय राहणार नाही.  ह्या शांत शालीन सौंदर्याचा देखील महायुद्धात सहभाग होता. तिच्या सौंदर्याची महती ऐकून स्वयंवराला आलेल्या रथी महारथीं मध्ये कर्ण, दुर्योधन आणि महायुद्धात कौरवांच्या बाजूने युद्धात उतरलेले अनेक राजे महाराजे हजर होते आणि त्या सर्वांना जे शक्य झालं नाही ते माझ्या परम मित्राने, अर्जुनाने सहजी केलं. अर्थात त्या वेळी माझ्या अस्तित्वाची दखल कोणी घेतली नाही. पण अर्जुनाला वरमाला घातल्यावर कृष्णेने मजकडे बघून केलेले स्मित बरच काही सांगून गेलं. याज्ञसेनी ती, यज्ञाच्या ज्वाळातून जन्माला आलेली अग्नी शिखाच ती. दहन करण हा तिचा स्थायी भाव. कां पाचांना मुठीत धरायला लावली? ती तर जळणार आणि त्यानाही जाळणार. माहित होत मला कोणी कोणी म्हणून सुखी होणार नाही. कृष्णे कितीवेळा तुझ्या समोर आलो माफी मागायला. पण तुझ्या नजरेला नजर देण्याचा धीरच झाला नाही. टाळू शकलो असतो मी. मी हे सर्व टाळू शकलो असतो?

लडिवाळपणे आंजारत गोंजारत पाणी मला तळापर्यंत घेऊन गेल. तळातल्या वाळूने देखील थोड बाजूला सरून मला जागा करून दिली. तळातल्या मऊ मुलायम वाळूत स्थिरावल्यावर मी पुन्हा कृष्णे कडे बघितलं, ती माझ्या बघण्याची जणू वाटच बघत होती, नजरेत क्षणभर निर्भत्सना वाटली. छे कसं शक्य आहे कृष्णेच्या नजरेत माझ्या बद्दल फक्त आणि फक्त प्रेमच असू शकत. मी श्रीहरी, कायम तिची सोबत करणारा, तिच्या एका हाकेत धावून येणारा तिचा मित्र. कौरवांच्या सभेतील ती घृणास्पद घटना वा धुऊन पालथ्या घातलेल्या अक्षय थाळीतून सुग्रास पक्वान्नांच्या पंक्तीच्या पंक्ती उठवून दुर्वास मुनिंच्या क्रोधाग्नी पासून पांडवांना वाचविणारा, अडी अडचणीला धावून येणारा संकट विमोचक असा सखा. माझी निर्भत्सना केवळ अशक्य, का हे माझ्या मनाचेच खेळ आहेत. नाही निर्भत्सना निश्चित नाही पण कणव, सहानुभूती? मला नेहेमीच असं वाटत आलाय कि कृष्णेला सगळ माहित आहे, कळतंय सगळ तिला. पण तरी मी तिची माफी मागायला हवी होती. टाळू शकलो असतो मी. मी हे टाळू शकलो असतो?. खरंच? खरंच का मी हे टाळू शकत होतों? स्वतःला कर्ता करविता म्हणवतो मग टाळणार कसं. खरच जे मी करतो ते स्वयं इच्छेने करतो?, कि कधी होणारं आहे, काय होणार आहे  हे नेमकं माहित असलेला मी, केवळ मी एकटाच, म्हणून करविता?.

सूर्य बहुदा अस्ताला कलला. सावल्या अधिकच गडद झाल्यात त्यात कृष्णेने नेमके केस मोकळे सोडलेत. तिचा चेहेरा नीट दिसत नाही आहे. नजरही नेमकी उमगत नाही. कृष्णेच्या नजरेत नेमकं तेच तर म्हणायचं नसेल. नियतीच्या नियमांना मी देखील अपवाद नाही. नाहीतर पारध्याचा बाण नेमका माझ्या अंगठ्याला कसा लागता? माफी मागण हा देखील माझ्या मोठे पणाचाचं भाग. हेच बघाना पांडवांच्या बाजूने लढलो कौरवांच्या नाशाला ते स्वतः सोडले तर मीच खरा जबाबदार. तरी एव्हढा सुद्धा वाईट पणा माझ्या वाटेला आला नाही. मी कायम वंदनीयच राहिलो. कर्णाची तर गोष्टच वेगळी, कर्ण, कर्ण का आठवावा या क्षणी? कृष्णेशी आणि कर्णाशी माझ नात सारखच होत, खर नाही वाटत? ज्यांच्या वाटेला टोकाच दुःख येत साहजिकच ते मला अधिक जवळचे वाटतात.

आता कृष्णा जवळ जवळ दिसतच नाही. मुळात ती सावळी, ती जिथे आहे तिथला काळोख जरा जास्त गर्द वाटतोय इतकंच. माफी? कसली माफी मागणार होतो मी? खरच का टाळू शकणार होतो मी महाभारत? नियतीचे प्रत्येक पाउल ठाऊक असलेला मी, असहाय, फक्त साक्षीदार!.

युगे न युगे ह्या डोहाच्या काठी शाळीग्राम होऊन पडलो होतो, पांडव संन्यस्थ होऊन निघाले म्हणून कृष्णा इथे पोहोचली आणि तिच्या हाताने जलसमाधी मिळाली, तिची कसली माफी मागणार होतो मी?

Friday, 31 January 2020

काssss पोछे!!


मथळा वाचूनच, ज्यांनी आयुष्यात पतंग उडविला आहे किंवा अजूनही उडवत आहेत (कागदी पतंग, गैरसमज नसावा) त्यांना वेगळा विषय प्रवेश लागणार नाही. पण ज्यांनी एका धारधार धाग्याने (प्रसंगी आपलं रक्त सांडून), वाऱ्यावर स्वार होऊन स्वर्गारोहण करण्याच्या किंवा मुसंडी मारून रसातळाला जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या पतंगावर ताबा ठेवण्याची अनुभूती घेतलेली नसेल त्यांना ह्या पतंगाख्यानाचा पुरेपूर आनंद घेण्याकरिता खालील शब्दांच्या व्याख्या समजून घ्याव्या लागतील.

कणी -पतंगाच्या वरच्या टोकापासून (नाक) शेपटीला जोडणाऱ्या काडीला मागच्या बाजूने ठराविक अंतरावर छिद्रे (एकूण ४) पाडून त्यातून ओवून बांधलेली दोरी. त्यात देखील प्रकार आहेत, नाकाकडील २ छिद्रे ही पतंगाच्या आडव्या व उभ्या काठीच्या छेद बिंदू पाशी असतात व शेपटी कडे असलेल्या २ छिद्रांचे अंतर नाकापासून छेद बिंदू पर्यंत असलेल्या अंतरा इतके असेल तर ती कणी ०-०, एका बोटाच्या जाडी इतके जास्त असेल तर ती १-० आणि २ बोटांच्या जाडी इतके जास्त असेल तर २-०, ३-० कणी बांधून पतंग उडविणारे विरळाच. कणी पतंगाला, पतंग उडविणाऱ्याशी जोडते. पतंग उडविणाऱ्याने धागा ओढल्यावर नाक वर ठेवून ऊर्ध्व मार्गाला लागण्याचा आदेश पतंगा पर्यंत ही कणीच पोहचविते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कणी पतंगाचा तोल सांभाळते. विवेकाचे जेव्हढे महत्व मानवी मनाचे संतुलन राखण्यात आहे तेव्हढेच महत्व कणीला पतंगाच्या आयुष्यात आहे.

मांजा- काचांची भुकटी, शिरस, भात इत्यांदीचे मिश्रण लावून सुकवलेला धारधार दोरा, माणसाला पतंगाशी जोडणारी नाळ. मांज्या विषयीची बहुतांश माहिती ही ऐकीव आहे कारण मांजा घरी बनविण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. मांजा हा विकत आणणे, हेच खरे. मांज्याचे, तार मांजा, बारीक मांजा, दुधी, गुलाबी, काळा इत्यादी प्रकार, दुकानात टांगलेल्या फिरकी वरून खाली आलेल्या मांज्याच्या टोकाची परीक्षा करून, समजून घ्यावे लागतात. जिव्हेच्या धारेगतच मांजा काम करतो, जरा निष्काळजी झालात की रक्त निघालेच म्हणून समजा.

ढिल देणे- मांजा घट्ट न धरता पतंगाला वाऱ्यावर मनसोक्त उडू देणे (उडविणाऱ्याला तेवढीच विश्रांती). ढिल दिल्यावर वा सोडल्यावर स्वतःभोवती गिरक्या घेत लांब जाणारा पतंग, मुक्त छंदातल्या एखाद्या रचने प्रमाणे वाटतो. जरा ढिल जास्त झाली तर पतंग कोणत्या दिशेला जाईल ते सांगता येत नाही त्यामुळे थोड थांबून दिशेचा, वाऱ्याचा अंदाज घेत घेत मांजा सोडवावा लागतो. स्वातंत्र्या बरोबर निर्बंधांचे महत्व सांगणारे आणि इतके विनासायास सापडणारे  दुसरें समर्पक उदाहरण नाही.

हापसणे- दिलेली ढिल ओढून घेणे, मांजाला ताण मिळाल्यावर पतंगाला सरसर वर चढताना बघून लहानांबरोबर मोठे देखील टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. परिस्थितीचे भान राखून हात आखडता घेण्याचा किंवा स्वगृही येताना, जाणाऱ्या पावलांवर पाय टाकत परतण्याचा प्रकार आहे हा.

फिरकी किंवा चकरी - मांजा गुंडाळण्याचे व लागेल तसा सोडण्याचे लाकडी, आता बहुदा प्लास्टीकचे (चिनी बनावटीचे) साधन. गाशा गुंडाळणे हा शब्द प्रयोग फिरकीला बघूनच बहुदा सुचला असावा.

गुंता- अकार्यक्षम फिरकी धारकामुळे हापसलेला मांजा जमिनीवर पडून राहतो आणि कोणता दोरा कुठून कुठे गेला आहे? कोणता दोरा ओढला तर सुटून बाहेर येईल वा अधिकच अडकेल हे समजणे महा कठीण होते. अतिशय हळुवार हातानी हलके हलके मांजा मोकळा करावा लागतो. जोरात ओढाताण केली तर गुंता आणखीनच घट्ट होत जातो, मांजा काचतो आणि सहज तुटू शकतो. तुटलेला मांजा गाठी मारून जोडला तरी पाहिल्यासारखा होत नाही.  नाईलाजच झाला तर गाठ मारावीच लागते. यातला तरबेज ती इतकी बारीक मारतो की हात फिरवल्याशिवाय गाठ आहे हे लक्षातच येत नाही. नात्यांचा गुंता देखील असाच हळुवार सोडवावा लागतो, धसमुसळे पणा केला तर कायमचा दुरावा. नात्याचा धागा एकदा का काचला की परत कधीच पहिल्यासारखा होत नाही आणि गाठी पडल्या तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी गत, म्हणूनच तो होणार नाही ह्याची काळजी घेणे अधिक शहाणपणाचे आहे.

बदवणे- पतंग जास्तीत जास्त उंच उडवणे, सर्व भाषातील शब्द कोशकार ह्या शब्दाच्या व्युत्पत्ती वर अजूनही खल करीत आहेत.

लपेटणे- गुंडाळणे. हा शब्द प्रयोग इतका लोकप्रिय आहे कि त्याचा उगम पतंगाच्या खेळात आहे हे देखील लोक विसरले आहेत. हा शब्द थापा मारणे किंवा थापा मारून गुंडाळणे अशा अर्थी वापरला जातो. लपेटणे ही एक कृती आहें ज्यात मधली तीन बोटे दुमडून करंगळी आणि अंगठा जितका ताणता येईल तितका ताणून (वितेचा आकार) त्याभोवती मांजा गुंडाळायचा. तुम्ही जर सुटा मांजा (फिरकी शिवाय) विकत घ्यायला गेलात तर दुकानदार मांजा वरील पद्धतीने त्याच्या अंगठा व करंगळी ने केलेल्या वितेवर लपेटून इंग्रजी आठ आकारचं मांजाचं भेंडोळे कागदात बांधून तुम्हाला देईल. घरी येऊन अथवा तिथेच फिरकी वर तो न गुंतता गुंडाळणे हे कौशल्याचे काम आहे. स्वत:ची फिरकी घेऊन गेलात आणि पुरेशा किमतीचा मांजा जर घेतलात तर दुकानदार त्याचा फिरकीवरून तुमच्या फिरकीवर तो भरून देईल (येथे भरून ह्या शब्दाचा अर्थ डब्यात भरणे असा न घेता फिरकीवर गुंडाळणे असा घ्यावा).

कापोछे अथवा कायपोचे - (मराठी अस्मिता) अस्मानी द्वंद्वात पतंग बंधमुक्त झाल्यावर प्रतिस्पर्ध्याने केलेला जल्लोष (शंख ध्वनी). हे क्षेत्र मात्र येरागबाळ्याच नाही, तेथे पाहिजे जातीचे. तुमचं सगळ कसब पणाला लावून ह्या खेळात हवेत रहाणे, आपला पतंग शाबूत ठेवून विरोधकाचा मांजा आपल्या मांजाने घासून कापणे आणि सर्वात कळस म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा कापलेला (मांजा तुटलेला) पतंग तरंगत जाताना आपल्या पतंगाच्या मांजात कापोछे झालेल्या पतंगाचा लोंबता मांजा गुंतवून दोन्ही पतंगाना माघारी उतरवणे. पतंगाची खरी रंगत ह्या काटाकाटीतच आहे.
पतंगाच्या खेळात एका चमूत कमीत कमी तीन खेळाडू असावे लागतात, त्यातील एक न खेळणारा कप्तान असल्या सारखा असतो त्याचे काम पतंग नाक व शेपटी सोडून उरलेल्या दोन टोकांना पकडून स्वतःच्या डोक्यावर उंच धरून पतंग उडविणाऱ्याने सांगितल्यावर हवेत सोडणे (तो डोक्यावर उंच धरण्यापूर्वी मधली काठी वाकवून त्याला थोडासा बाक देणे), आणि पतंग हवेत गेल्यावर फिरकी बहाद्दर व पतंग उडविणाऱ्याच्या बाजूला उभे राहून प्रोत्साहन व नको असलेले सल्ले देणे एव्हढेच त्याचे काम असते. ह्या प्रेक्षक वजा खेळाडूची जागा त्याच्या अनुपस्थितीत फिरकीधराला घ्यावी लागते. थोडा मांजा जमिनीवर मोकळा सोडून फिरकी खाली ठेवून मग त्याला पतंग डोक्यावर धरून सोडताच पळत येऊन आपल्या फिरकी बहाद्दराच्या भूमिकेत शिरण्याचे कसब त्याला अंगी बनवावे लागते. फिरकीधराचे काम तसे जिकरीचे. पतंग उडविणाऱ्याच्या चुकीमुळे कापला गेला, तरी फिरकी घट्ट धरल्यामुळे ढिल मिळाली नाही म्हणून कापला गेला, असें पापाचे धनी व्हावे लागते. पतंग उडविणाऱ्याचा रुबाब काही औरच असतो. पतंग कापला जाण्यात त्याची कधीच चूक किंवा हार नसते. कसूर काय तो मांजाचा, पतंगाचा वा फिरकी धरणाऱ्याचा असतो.   

पतंगाच्या खेळात पतंग कापला जाणे हा पतंगाचा शेवट नसून ते केवळ पतंगाच्या मालकी हक्कांचे हस्तांतर आहे. फरक इतकाच की हे हस्तांतर  ‘कसेल त्याची जमीन’ तद्वत, ‘पकडेल त्याचा पतंग’ ह्या न्यायाने होते. कटून (बहुदा इंग्रजी cut ह्या शब्दात ह्याचा उगम असावा) आलेला पतंग वाऱ्यावर हेलकावत येतों आणि उंचावलेले हात, काठ्या ह्यांच्या स्पर्धेत, तो कुण्या भाग्यवंताच्या हातात पडतो, आणि मग तो वीर, कोहिनूर गवसल्या थाटात तेथून धूम ठोकतो. कापलेला पतंग पकडणे हा अत्यंत रोमहर्षक अनुभव आहे, त्यातली गंमत, उत्कंठा आणि पतंग हातात मिळाल्यावर होणारी उत्तेजित अवस्था ह्याचे वर्णन मज पामरास शब्दात करणे शक्य नाही. त्याची अनुभूती घेणे हेच खरे. बहुतांशी वेळेला त्याच्या मागे धावणाऱ्याना हुलकावणी देऊन तो पतंग दुसरीकडे जाऊन पडणे किंवा झाडाच्या फांदीवर अडकणे हे इतके सर्रास घडते की पुढील आयुष्यातील आशा, निराशेच्या खेळांचे जणू ते बाळकडूच आहे. आत्ता आत्ता पर्यंत कुणा धनिक बाळांच्या हातातून हवेत मिरविणारा पतंग, क्षणात रस्त्यावर खेळणाऱ्या आणि आशाळभूतपणे आकाशात  उडणाऱ्या रंगीबेरंगी पतंगाकडे पाहणाऱ्या मुलाच्या चेहेऱ्यावर हसू फुलवून जातो. अनपेक्षित आनंद म्हणजे काय ह्याचा पुरावा त्याचा चेहेरा देत असतो.

ह्या सगळ्या खेळात केंद्र स्थानी असलेल्या पतंगाचा शेवट, बहुदा तो फाटण्यात अथवा झाडात, तारेत वा अॅन्टेनात (माझ्या तरुण वाचकांसाठी? दूरदर्शन वा आकाशवाणी चे प्रक्षेपण ग्रहण करून संचापर्यंत पोहचविणारी, गच्चीवर लावलेली यंत्रणा, खरतर अॅन्टेना हा स्वतंत्र विषय होईल) अडकून होतो. हा केवळ अपघात असतो. काय गंमत आहे पहा, जर प्रसंगाचे पर्यवसान दुःखात किंवा वेदनेत होत असेल तर तो अपघात आणि जर त्या प्रसंगातून आनंद निष्पत्ती झाली तर तो योगायोग. समोरून मित्र अचानक आला तर तो योगायोग आणि येऊन तुमच्यावर आपटला  तर तो अपघात. त्यामुळे पतंग उडवत असताना त्यावरचा ताबा सुटून जर तो वरील एखाद्या ठिकाणी अडकला तर तो क्षण फारच क्लेशदायक असतो. मांजाला टिचक्या देऊन तो सोडवण्याचे अनेक प्रयत्न फोल ठरल्यावर त्यापासून फारकत घेणे अनिवार्य होते. मांजा हाताला गुंडाळून जितका ताणता येईल तितका ताणून पतंगाच्या जितक्या जवळ तो तोडता येईल तितक्या जवळ तो तोडणे एव्हढाच पर्याय शिल्लक राहतो आणि मोठ्या जड अंत:करणाने त्याची अंमलबजावणी होते. अडकलेला पतंग जर शेवटचा असेल तर त्या अडकून वाऱ्यावर फडफडणाऱ्या पतंगाला श्रद्धांजली वाहत काही काळ तिथे त्याच्याकडे काहीशा आशेने, पण बहुतांशी दुःखाने पाहत उभे राहणे अनिवार्य असते. त्या नंतर थोड्याच काळात  काहीच घडले नाही अशा पद्धतीने असें प्रसंग आयुष्यात देखील अनेक वेळा येतात आणि काहीशा अशाच पद्धतीने आपण त्यांना सामोरे जात असतो.

एकूणच पतंगाचा हा खेळ मला अनेक वेळा आयुष्यावरच रूपक वाटतो. लहानपणी ह्या कशाचीच जाणीव होत नाही पण आज मागे वळून पाहताना तो खेळ वेगळाच वाटतो. असो. गेल्या संक्रांतीला पतंग उडवले नसतील तर पुढील संक्रांतीला नक्की उडवा, तसा संकल्पच करा आणि ही मजा एकदा तरी अनुभवा.