महाभारत म्हटले, की आपल्याला आठवतात
काही ठरावीक पात्र. श्रीकृष्ण, द्रौपदी, पांडव. त्यांच्यात देखील सर्व प्रथम भीमार्जुन,
मग धर्म, खलनायक म्हणून दुर्योधन, दुशाःसन, संमिश्र भावना घेऊन कर्ण, आणि अनेक
प्रश्न चिन्ह घेऊन भीष्म, द्रोण. अजून ताण दिला तर गांधारी, धृतराष्ट्र,
विदुर व कपटी शकुनी. महाभारतातील धर्मयुद्धाचा विचार केला तर आठवतात ते भीष्म, द्रोण, कर्ण
या महारथींचे प्रश्नांकित मृत्यू. जाता जाता उपाख्यान म्हणता येईल असा एकलव्य
देखील आठवल्याशिवाय रहात नाही. ह्यातील प्रत्येक पात्र स्वतंत्र लेखाचा विषय आहे
हे खरेच, पण आठवत नाही तो घटोत्कच.
महाभारतावर जितका विचार करतो तितका महाभारतकार
महाकवी व्यासांच्या प्रतीभेचा अविष्कार विस्मयकारक, केवळ थक्क करून सोडणार वाटतो.
या महाकाव्याच्या निर्मिती बद्दल प्रचलित कथेनुसार हे महाकाव्य व्यासांनी सांगितले
आणि गणपती ने लिहिले? व्यासांना असा लेखनिक हवा होता की जो त्यांच्या काव्योघाच्या
वेगाने, त्यांना मध्ये न थांबवता लिहू शकेल, जे काम गणपतीने पार पाडलं. ह्याचा मुद्दाम उल्लेख
करण्याचं कारण, महाभारतातील पात्र योजना आणि प्रसंगांचा अनुक्रम.
हेच बघाना, कुंती कुमारीका असताना,
कवच कुंडल घेऊन जन्माला आलेला सूर्यपुत्र कर्ण, अधिरथाने सांभाळले म्हणून सूत
पुत्र, द्रोणांनी
घेतलेली शिष्यांची परीक्षा, तेंव्हा
कर्णाने अर्जुनाला दिलेले आव्हान, कर्णाचा
झालेला पाणउतारा आणि त्याचवेळी दुर्योधनाने केलेला त्याचा सन्मान त्यामुळे कर्णाची कौरव पक्षाशी झालेली कायमची
बांधिलकी, वारणावतातील लाक्षागृहातून वाचून वनात गेलेल्या भीमा हातून झालेला
हिडींब राक्षसाचा वध, भावाच्या मृत्युनंतरही भीमाच्या प्रेमात पडलेली हिडींबा आणि
तीजपासून झालेला भीमपुत्र घटोत्कच, द्रौपदी स्वयंवर व युद्धाचे ढग जमू लागल्यावर इंद्राने
ब्राह्मण वेषात कर्णाकडे मागितलेलं कवच कुंडलांच दान आणि त्या बदल्यात कर्णाला
दिलेली अमोघ वासवी शक्ती आणि शेवटी पांडवांचा झालेला विजय व कुरुकुलाचा झालेला
विनाश. हे सर्व प्रसंग वरवर जरी स्वतंत्र दिसले तरी त्यांचा एकमेकांशी अगदी जवळचा
संबंध आहे. किंबहुना ते एकमेकांवर अवलंबून आहेत. महाभारत हे जर महाकाव्य आहे असें
मानून आपण विचार करू लागलो तर, व्यासांच्या प्रतिभेला विनम्र अभिवादन करावे लागते.
ते अशाकरता की ही सर्व पात्रे, प्रसंग महाकाव्याचा ओनामा करण्यापूर्वी त्यांच्या
मनःचक्षु समोर सुस्पष्ट असावीत, आणि नेमके त्याच कारणास्तव महाकाव्याची निर्मिती
हा एक अखंड ओघ असणार होता आणि तो कोठेही खंडित न करता लिहिणारा, अवगत करणारा
सहाय्यक त्यांना हवा होता.
असो, ह्या सर्व प्रसंगांचा उहापोह
येथे करण्याचे कारण महाभारतातील महायुद्धाच्या विजयाचं सर्व श्रेय श्रीकृष्णाला वा
पांडवांना दिले जाते, त्यांच्या विजयात घटोत्कच्याच्या बलिदानाचा वाटा केवढा मोठा
आहे हे कोठेही वाचावयास मिळत नाही. किंबहुना त्याच्या मृत्युचा उल्लेख देखील
बलिदानाचा, असा केलेला आढळत नाही.
सर्व प्रसंगांची सुसंगत मांडणी
करावयाची झाली तर कर्णाच्या जन्मापासून सुरवात करावी लागेल. जन्मजात कवच कुंडल
धारण करून आलेला कर्ण हा अवध्य होता. द्रोण शिष्य परीक्षेच्या वेळेला, अपमानित
झालेल्या कर्णाला, दुर्योधनाने अंगराज केल्यामुळे कौरवांना अर्जुनाच्या तोडीचा
किंबहुना काकणभर सरस असा धनुर्धर मिळाला. लाक्षागृहात सापडलेली शवे, पांडव व कुंती
ह्यांचीच आहेत ह्या गैरसमजाचा फायदा घेऊन स्वतःला पुरेसे प्रबळ करून मगच कौरवांचा
सामना करावा ह्या विचारने पांडव वनात राहत होते. त्याच वास्तव्यात मनुष्य भक्षक
हिडींब राक्षसाचा भीमाने निप्पात केला. त्याची बहिण हिडीम्बा भीमाच्या प्रेमात
पडली आणि अशा विचित्र विवाहाला कुंतीची संमती मिळाली आणि घटोत्कच जन्माला आला.
राक्षसीण, मानवाच्या प्रेमात पडून त्यांनी लग्न केल्याचं हे महाभारतातील एकमेव
उदाहरण. ह्याच कालावधीत पुढे द्रौपदी स्वयंवरा नंतर पांडवांचा पांचाळ कुळाशी संबंध
जुळून आला आणि त्यामुळे अधिक शक्तिशाली झालेले पांडव हस्तिनापुरात परत आले.
घटोत्कच्याच्या जन्माचे नेमके प्रयोजन काय होते? पुढील घटना क्रम पाहता केवळ अर्जुन रक्षणार्थ
त्याचा जन्म झाला होता असें वाटल्यावाचून रहात नाही.
आपल्या पुत्राचे रक्षण करण्याकरता
इंद्राने कर्णाच्या दानशूरतेचा गैर फायदा घेऊन त्याच्याकडून कवच कुंडले काढून
घेतली आणि कदाचित आपल्या कृत्याने खजील होऊन इंद्राने त्या बदल्यात स्वसंरक्षणार्थ
अमोघ वासवी शक्ती कर्णास बहाल केली. ह्या शक्तीचा वापर करून केवळ एकदा शत्रूचा नाश
करणे शक्य होते तदनंतर ती शक्ती इंद्राकडे परत जाणार होती. कवच कुंडलं
गमावल्यानंतर देखील, ह्या अमोघ शक्तीमुळे कर्णाच पारडं जड होतं. कर्ण ही शक्ती
अर्जुनावर प्रयोग करण्या करिता राखून ठेवणार हे देखील नक्की होते. अर्जुनाला
वाचवण्याचा एकमेव उपाय म्हणजे शक्तीचा वापर होईपर्यंत त्याने कर्णा समोर न येणे.
श्रीकृष्णाला ह्याची पूर्ण कल्पना होती, अर्जुनाच सारथ्य करताना त्याला कर्णा
पासून लांब ठेवण्याची खबरदारी तो घेत होता. अर्थात हे फार काळ शक्य झाले नसते. दुसरा पर्याय म्हणजे कर्णाला त्या शक्तीचा उपयोग
करायला भाग पाडणे. कर्णासमोर त्याचा स्वतःचा मृत्यू, वा कौरवांचा प्रलयंकारी विनाश
जर उभा राहिला असता तर त्याच्या कडून ही शक्ती वापरलि गेली असती. ह्या पर्यायात जो कोणी कर्णाला शक्तीचा उपयोग
करायला लावेल त्याचा मृत्यू निश्चित होता. थोडक्यात काय पांडवांना अशा महावीराची
गरज होती की जो युद्धात वरील परिस्थिती निर्माण करील आणि आत्म समर्पणाला तयार
राहील. रक्ताच्या नात्यांव्यतिरिक्त हे कृत्य करायला कोण तयार होईल?
ह्या कार्या करिता घटोत्कचा इतका
योग्य वीर दुसरा कोणीही नव्हता. एक तर तो राक्षसिणीचा पुत्र असल्यामुळे मायावी
युद्ध कला पारंगत होता. श्रीकृष्णाला जो संहार अपेक्षित होता तो करण्याची क्षमता
या वीराकडे होती. धर्म युद्धाची बंधने देखील त्याच्यावर नव्हती. घटोत्कचाचे जीवीत
कार्य त्याच्या जन्मा पूर्वीच निश्चित झालेले होते.
कौराव पांडवांच्या महायुद्धाच्या
उत्तरार्धात, शिखंडीला मध्ये घालून अर्जुना करवी केलेल्या भीष्माचार्यांच्या
पाडावानंतर द्रोणांच्या नेतृत्वा खाली झालेल्या संग्रामात एक दिवस धर्म युद्धाचे
नियम डावलून सूर्यास्तानंतर युद्ध सुरु राहीले आणि त्या संधीचा फायदा घेऊन श्री
कृष्णाने घटोत्कचाला युद्धात उतरविले. आपल्या राक्षस सेनेसह घटोत्कच कौरवांवर
तुटून पडला.
घटोत्कचाने अतुलनीय पराक्रम दाखवत
आपल्या मायावी युद्ध कलेने कौरव सेनेची पार दाणादाण उडवली, द्रोणाचार्या
सारख्या कसलेल्या योध्याचा देखील त्याच्या पुढे निभाव लागेना. द्रोणांची ही गत
झाल्यावर बाकीच्यांची काय कथा? कौरवांना पाळता भुई थोडी झाली आणि घटोत्कचाने
शत्रू सैन्याचा अविरत संहार चालूच ठेवला. शेवटी दुर्योधनाने कर्णाला गाठून कसही
करून घटोत्कचाचा बीमोड करावयाला सांगितले. कर्णाला दुर्योधन काय सुचवित आहे याची
कल्पना होती. वासवी शक्तीचा घटोत्कचावर प्रयोग करायला त्याने नकार दिला. मनोमन कर्णाला
खात्री होती कि वासवी शक्ती शिवाय तो अर्जुनाशी जिंकू शकत नाही. त्याने
दुर्योधानाला तसे सांगितले, ‘अरे आपण उद्याची सकाळ पहिली तर अर्जुनाशी लढण्याचा
प्रसंग येईल. ज्या वेगाने घटोत्कचाने कौरवांच नाश चालविलेला आहे त्या वरून
अर्जुनाशी लढायला उद्या कोणी शिल्लक राहील असें मला वाटत नाही. तेंव्हा घटोत्कचाला
या क्षणी ठार मारणे एव्हढाच पर्याय तुज पुढे आहे. ते तू वासवी शक्ती ने कर, अन्यथा
दुसऱ्या मार्गाने, तो तुझा प्रश्न आहे.’ झाले! दुर्योधनाच्या ह्या आदेशापुढे,
अंकित कर्णाचे काहीएक चालले नाही आणि वासवी शक्तीच्या प्रयोगाने त्याने घटोत्कचाचा
वध केला. त्यावेळेला पांडव वीरांकडून त्याच्या संरक्षणार्थ कोणीही धावून आले नाही.
वासवी शक्ती आपले काम चोख बजाऊन इंद्राकडे परतली. पर्यायाने अर्जुनाला अभय मिळाले.
ते युद्ध जिंकूनही, कर्णाची स्थिती, पराजिता सारखी झाली.
आपल्या चुलत्या करिता आणि पर्यायाने पांडवांच्या
विजया करिता दिलेल्या घटोत्कचाच्या बलिदाना नंतर अनेक प्रश्न निर्माण होतात. युद्ध
भूमीवर त्याचा बळी तो अनार्य होता म्हणून दिला गेला? की पुढे जाऊन सर्वात मोठा म्हणून तो
राज्यावर अधिकार सांगेल म्हणून? की राक्षस म्हणून बळी देण्यास तो योग्य होता? घटोत्कचाच्या
मृत्यूचा शोक द्रौपदी पुत्रांच्या शोका इतका करूण कां बरें वाटत नाही?