Sunday, 10 June 2018

अर्थ हरवलेले शब्द... १



सगळ्याच भाषा आपापल्या परीने विविध भाषालंकारानी सर्वांगाने नटलेल्या असतात, तरी मराठीची गोडी काही औरच, मातृ भाषा आहे, म्हणून असेल कदाचित. मराठी भाषेतील साहित्य निर्मिती, साहित्यकारांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे जागोजागी घडणारे दर्शन, निर्मितीतील अभिजातता, विषयांतील वैविध्य, कालातीत असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार काय काय म्हणून सांगू. या सगळ्यांच्या मुळाशी असलेले अर्थपूर्ण शब्द, संस्कृतोत्पन्न असल्याचा पदोपदी मिळणारा पुरावा. मी गाणी ऐकतो पण त्यातले काव्य मला जास्त भावते, त्यातील अर्थ मला नेहेमीच आकृष्ट करतो. बोलताना, ऐकताना माझं लक्ष सारखं शब्दांकडे जातं. बदलत्या राहणीमानामुळे म्हणा किंवा त्यातील वेगामुळे म्हणा अनेक शब्दांचा अर्थ लोप पावतोय असे वाटते. का त्या शब्दांचा उपयोग, वापर करण्या योग्य स्थितीच उरलेली नाही, नेमक सांगणे कठीण आहे. वानगी दाखल परवाचीच गोष्ट पहा ना.

रविवार संध्याकाळ, दारावरची बेल वाजली मला कोणीही अपेक्षित नव्हतं. कुतुहूल मिश्रित मुद्रेने मी दार उघडलं. बघतो तो काय एक जुना सोबती दारात उभा. “कायरें आश्चर्य वाटलं मला बघून?” ध्यानी मनी नसताना अचानक दारात उभ्या राहिलेल्या मित्राला बघून खरतर थोडा गडबडलोच. तसा तो अवलियाच, आज पर्यंतच्या त्याच्या आयुष्यात असामान्य नाही पण जगरहाटीला धरून देखील काही नव्हते, स्वतःला सावरत म्हणालो “नाहीरे, अगदी तसच काही नाही, पण आज अचानक?” चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो हसला, “घरात तरी घेशील, की दारातूनच बोळवण करणार आहेस?” मी पटकन बाजूला होउन त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला घरात घेतलं, स्वारी सोफ्यावर स्थानापन्न झाली. त्याची देहबोलीच सुचवत होती की त्याच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. त्त्याचं पाणी पिऊन होईपर्यंत देखील मला धीर निघत नव्हता, “आज कसा काय..?” नेहेमीच्या सवयी प्रमाणे माझ वाक्य अर्धवट तोडत तो बोलता झाला “अरे सहजच” “सहज?, आमच्या घरावरून कुठे जात होतास ?” मी, त्याच्या भेटीला उद्देश देण्याच्या प्रयत्नात. “नाही रे, तुझ्याकडे म्हणून येऊ शकत नाही का?, आलो सहज भेटायला” पुन्हा सहज! त्याच्या दृष्टीने माझी भेट एवढ कारण पुरेसें होते. माझ्या पचनी त्याचं ते “सहज” काही पडत नव्हते. छान अर्धा पाउण तास गप्पा झाल्या. तो मोकळेपणी बोलत होता आणि मी मात्र हा आता कारण सांगेल मग सांगेल म्हणून मनातल्या मनात वाट बघत होतो. त्याला निरोप देत दार लावताना देखील मी त्याला म्हणालो, “feel free यार, if there is anything you want to share?” अडचणीच्या वेळेला आपण इंग्रजीचा आधार का शोधतो माहित नाही. तो गोड हसला, “लेका, तुम्हा लोकांना ना निर्हेतूक काही असू शकत, हे पटतच नाही. सहज वागताच येत नाही. चल बाय” धाड धाड पायऱ्या उतरून तो चालता झाला. पुन्हा सहज!! मला काही केल्या चैन पडेना. तासा दोन तासाने मी त्याला फोन केला, “पोचलास का रें?” “कधीचाच, तुझ्या कडून सरळ घरीच आलो, आणखीन कुठे जायचंच नव्हतं.”

गादीवर पडल्यावर देखील माझ्या डोक्यातून त्याच ते “सहज” काही निघत नव्हतं. सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत, कोणती गोष्ट आपण सहज करतो याचा विचार करत होतो. सकाळी चालायला बाहेर पडण्यापासून सुरवात करा, बहुतेकांना मधुमेह, हृदय विकार नाहीतर रक्तदाब यांची भूत चालवत असतात. किती जण त्यांच्या रोजच्या चालायच्या रस्त्त्यावर कोणती झाडे आहेत हे सांगू शकतील? वाटेतल्या बहाव्याची झुंबरं वाऱ्यावर झुलताहेत, कोपऱ्यावरचा गुलमोहोर पेटलाय, तम्राशिम्बी (गुगल copper pod tree) आभाळाकडे हात करून उभा आहे वा काटे सावर लाल पाकळ्यांचा सडा पायतळी पसरून हिरव्या गार बोन्डांनी डवरली आहे किती जणांना हे दिसतं, जाणवतं ? त्याच रस्त्यावर जर निरुद्देश फिरलो तर निसर्गाची, भर उन्हात डोळ्यांना निवावणारी ही रूपं मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीत. मी शेवटचा एका जागी सहज कधी बसलो होतो हे आठवत नाही. कधी भ्रमणध्वनीचा छोटा पडदा तर कधी विश्व दर्शन घडवणारा मोठा पडदा डोळ्यासमोर असतो. ते नसेल तर वर्तमान पत्र किंवा मासिक, एखादे पुस्तक. माझा मीच असा कधी बसलेलो मला आठवत नाही.

वेळ घेऊन, काम सांगून मगच भेटायला येणाऱ्यांच्या विश्वात वावरणाऱ्या मला त्याच ते “सहज” झेपत नव्हतं. मित्र असोत व आप्त सगळेच जण हे नियम पाळतात मी देखील कोणाकडे सांगितल्या शिवाय जात नाही. ही खरोखरच काळाची गरजच झाली आहे का संपर्क माध्यमांची विपुलता याला कारणीभूत आहे? त्यांचा अपव्यय?

एखादी गोष्ट प्रयास, सायास न करता जमली पाहिजे. तसं बघायला गेलो तर सहज शब्दाची ओळख लहानपणीच होते. वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे. खालेल्ल्या अन्नाचे सहज हवन होते जर उदर भरण हा यज्ञ समजून घेतेलेला प्रत्येक घास हा त्या यज्ञातील श्रीहरिला दिलेली समिधा मानून सेवन केला तर. आपल्या आयुष्याचे काहीसे तसेच आहे. अहंकार, भीती आणि त्या पोटी निर्माण होणारा अविश्वास ह्या त्रिकोणात आपण स्वतःला पार अडकवून टाकलं आहे. भूतकाळात पाय रुतवून केलेली भविष्याची चिंता आणि वर्तमानाचा अधिक्षेप, अनिश्चिततेचा भासमान विळखा आणि त्या पासून स्वतःला वाचवण्याची सततची चालेली धडपड. ह्या सगळ्यात आपण आपले मूळ स्वरूप हरवून बसलोय. लहानपणीचा मी हरवलोय आणि आतातर त्याला शोधायची देखील भीती वाटत आहे. आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचा आपण ही एक भाग आहोत किंबहुना आपण निसर्गच आहोत, मग ते सहज सोपे का असू नये. आपल्याला मिळालेल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर स्वतः भोवती गुंता निर्माण करून त्यात अडकण्या पेक्षा मुक्त कसं होता येईल याचा विचार करा. जगण्यातली सहजता हरवू देऊ नका नाहीतर, सहज शब्द केवळ मराठी शब्द कोशातच राहील.