मला प्रत्येक व्यक्तीत एक ‘शल्य’ डोकावताना दिसतो. तुम्हाला
कधी दिसलाय का? ‘शल्य’ जो दुसऱ्याचा
पाणउतारा करण्याचा सदोदित प्रयत्न करीत असतो. दुसऱ्याचा तेजोभंग करण्याची, तुलनात्त्म्क
कमीपणा दाखवण्याची एकही संधी तो सोडत नाही. खरतर आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत
असत पण त्याला विरोध करण्या ऐवजी आपण त्याच्या आहारी जातो आणि मग उरतो तो नात्यातला
कडवटपणा, वितुष्ट आणि दुरावा.
अनेकांच्या बाबतीत, मनातील हा ‘शल्य’, ज्याच्या मनात असतो
त्यालाच दुजा भावाने टीकेचे लक्ष्य करतो, स्वतःत असलेल्या नसलेल्या हिंनतेच्या,
कमीपणाच्या भावना जोर धरू लागतात, परिणामतः
आत्म बलाचा निचरा होऊन खच्ची करण व्हायला वेळ लागत नाही.
‘हा’ शल्य कुठून आला?
प्रश्न पडला ना? शल्य म्हणजे बोचरं दुःख, सल. सतत टोचत
राहणार दुःख ते शल्य. किंबहुना त्याला शल्य का म्हणतात?
वरील प्रश्नांची उत्तर मला महाभारतात सापडली. महाभारत
वाचताना मला पदोपदी रूपक आढळतात. दर वेळेला वाचताना काही न काही नवीन सापडते. महाभारतकार
महाकवी व्यासांनी हेतुपुरस्सर पात्रांची योजना केलेली आहे. प्रत्येक पात्र, प्रसंग,
घटना क्रम इतका विलक्षण आहे कि वाचाक अवाक झाल्याशिवाय रहात नाही. नाना विविध
रूपकांचा उपयोग करून मनुष्य स्वभाव, विकारांच विश्व नेमक उलगडून दाखवल्याच याहून
अधिक चांगले दुसरे उदाहरण माझ्या वाचनांत तरी नाही.
शल्य हा मद्र देशाचा राजा, पंडू पत्नी माद्री चा सख्खा भाऊ.
नकुल, सहदेव यांचा मामा. बलाढ्य, शूर, लढवय्या, अश्व कला जाणणारा, उत्कृष्ट सारथी.
पांडवांचा चाहता, हितचिंतक आणि पांडवांच्या विजयाची सतत कामना करणारा. कौरवांच्या राजकीय
खेळी मुळे, महायुद्धात कौरवांच्या बाजून युद्धात उतरलेला, पण मनोमन पांडवांच्याच
बाजूचा. असा ‘शल्य’ हे एक अद्वितीय रूपक आहे असे मला नेहमी वाटते.
दुर्योधनाने ज्यावेळी कर्णाला कौरव सेनेचा सेनापती होण्यास
सांगितलं तेव्हा कर्णाने दुर्योधनाशी, स्वतःच्या व अर्जुनाच्या बलाबलाची चर्चा करताना,
कृष्णाच्या तोडीचा सारथी माझ्याकडे नाही अस तक्रारिचा सूर लावला आणि शल्याने
त्याचे सारथ्य करावे अस प्रस्तावही मांडला. कृष्णाच्या तोडीचा एकमेव सारथी
आपल्याकडे आहे आणि तो म्हणजे शल्य अशी पुस्ती देखील त्याने जोडली. दुर्योधाने नाईलाजास्तव
शल्याला गळ घातली. शल्याला दुर्योधनाची विनंती मान्य करण्यावाचून पर्यायच नव्हता. राजाने
सारथ्य करायचे? मनातून पांडवांच्या पक्षातील, साहजिकच शल्याने एक अट घातली, “सारथ्यात
मी कमी पडणार नाही पण मी कर्णाला काहीही बोललो तरी कर्णाने मला उलट बोलता कामा
नये, ज्या क्षणी तो उलट बोलेल त्या क्षणी मी रथाचे लगाम खाली ठेवीन”. कर्णाकडे हि
अट मान्य करण्यावाचून गत्यंतरच नव्हते.
प्रत्यक्ष युद्धभूमीवर, शल्याने आपल्या तोंडाचा पट्टा चालू केला,
कर्णाला, शल्याचे एकामागून एक वाक्बाण घायाळ करत होते. त्याचा तेजोभंग करण्याची
एकही संधी शल्य सोडत नव्हता. अर्जुनापुढे कर्णाचा निभाव कसा लागणार नाही ह्याचा
पुनरुच्चार तो करीत होता. ज्याने सारथ्य करून कर्णाला पुढे न्यायचे तोच कर्णाचे
पाय ओढत होता. या परीस्थितीत देखील कर्णाच्या पराक्रमाने स्तंभित होऊन शेवटी शल्याने
त्याची स्तुती केली आणि युद्धात अर्जुनाच्या विरोधात एक मौलिक सल्ला त्याने
कर्णाला दिला, पण सतत निर्भत्सना ऐकल्यामुळे कर्णाने त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष
केल. मनाच्या संभ्रमित अवस्थेत वेगळे काही घडणे अपेक्षित नव्हते.
महाप्रतापी, धनुर्धारी कर्ण हा पांडवांच्या कौरवांवरील
विजयाच्या मार्गातील एकमेव अडथळा उरला होता. युद्धाच्या आधीच कृष्ण आणि कुंतीने कर्णाच्या
मनात संदेह निर्माण करण्याचे काम केलेले होते. मनाच्या संदिग्ध अवस्थेत कर्ण
युद्धात उतरला आणि राहिलेली कसर शल्याने भरून काढली.
कर्णाच्या मृत्युला जेव्हढे रथाचे रुतलेले चाक कारणीभूत होते
तेव्हढाच किवा रत्तीभर जास्तच शल्य जबाबदार होता (रथाचे चाक रुतले तेव्हा सारथ्य शल्याकडेच
होते, असो).
कर्णाच्या मृत्यूला कारणीभूत झालेला हा शल्य, खरच व्यक्ती
आहे की एक रूपक? कर्णाच्या मनातील द्वंद्व? कि व्यास मुनीना काही वेगळ सुचवायचं
आहे?, मनावर ताबा ठेवणारी (सारथ्य करणारी) बुद्धी जर विरोधात उभी राहिली तर पराभव
करायला बाहेरील शत्रूची गरज नाही, तो केवळ निमित्त मात्र ठरेल. यशापयश हे
परिस्थितीपेक्षाही मनाच्या काय स्थितीत आपण प्रसंगाला सामोरे जातो यावर अवलंबून
आहे. नेमक हेचतर त्यांना सुचवायचं नसेल?