Sunday, 5 August 2018

अर्थ हरवलेले शब्द... २



“काय गोंधळ चालवलाय, सकाळ पासून? पार भंडावून सोडलय, एक मिनिट म्हणून शांतता नाही. स्वस्थ बसा बघू एका जागी, अगदी देवा सारखे बसा”. लहानपणी मे महिन्याच्या सुट्टीत आईने केलेला त्रागा. देव कसा बसतो ते कोणी बघितलंय पण आईचा रुद्रावतार बघून आम्ही भावंड मांडी घालून डोळे मिटून बसत असू. आमच देवपण काही क्षणातच संपत असे. मग डोळे किलकिले करून एकमेकांच्या खोड्या काढून पुनश्च दंगा चालू होत असे. बहुदा ती काही क्षणांची शांतता देखील आईला पुरत असावी. कारण आईचा ओरडा बऱ्याच वेळाने पुन्हा खावा लागत असें. स्वस्थ शब्दाशी माझी ओळख ही अशी.

देव कसा बसतो? देव बसलेला असतो का? बसत असेल तर खरच स्वस्थ बसतो का? त्या वयात असे विचार मनात आले असतील किंवा नसतीलही. आले असलेच तरी त्याचं उत्तर, असेल बहुदा, आई सांगते म्हणजे डोळे मिटून, न बोलता बसत असावा, इथेच संपत असावे. आता जेव्हा विचार करतो (अर्थात आजही देवाच्या बसण्याविषयीचे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत) तेव्हा एक नक्की लक्षात येतें कि सगळी गोम त्या स्वस्थ मध्ये आहे.

स्वस्थ म्हणजे नेमकं काय? स्वस्थ महणजे शांत? स्वस्थ म्हणजे गप्प? स्वस्थ म्हणजे हालचाल न करता?

स्वस्थ चा शब्दशः अर्थ, स्वतःत स्थित, स्वतःत स्थिर, अचल. स्थिर, अचल शब्दाचा अर्थ सगळ्यांनाच माहित आहे, म्हणजे जी काही भानगड आहे ती स्वतः या शब्दाशी निगडीत आहे. “स्वतः म्हणजे मी” सगळ्यात सोपं उत्तर. आपल्याला खरच मी कोण,  हे माहित आहे? या मी ची व्याख्या करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. कोS अहं?’ अशी अध्यात्मिक पृच्छा अनेक संत, योगी पुरुषांनी यशस्वीपणे केली. मला मात्र भौतिक पातळीवर राहायला आवडेल. मी चा जन्म नेमका कधी होतो? त्याची पुढील वाटचाल कशी होते? कठीण आहे सांगणे.

नवजात शिशु डोळ्या समोर आणा. कापडात घट्ट गुंडाळलेला तो चिमुकला निद्रिस्त जीव, त्याला असेल का मी ची जाणीव? मला नाही वाटत. भूक लागल्यावर डाव्या किंवा उजव्या हाताची इवलीशी मुठ, दुसऱ्या हाताने तो हात धरून, आपल्या  तोंडात घालण्याचा तो गोंडस प्रयत्न, एक गोष्ट दर्शवतो. तोंडात घालायचा हात आपला स्वतःचा , आपल्या शरीराचा भाग नसून हात ज्याचा आहे तो आणि ज्याला भूक लागली आहे तो हे दोघे वेगळे आहेत. थोडक्यात काय मी म्हणजे हे शरीर ही जाणीव अजून निर्माण झालेली नाही.

नामकरण होईपर्यंत सोन्या, मन्या इत्यादी, इत्यादी ही इतरांना असलेली आपली ओळख. आवाजाच्या दिशेने वळलेली मान, ही जणू हाकेला दिलेली ओ असावी, अशा थाटात ज्या कोण अक्का, मावश्या असतील त्या म्हणतात, "बघ लब्बाड, त्याला कळतंय, आपण त्याला हाक मारतोय ते". कालांतराने नामकरण होऊन बाकीची नाव मागे पडतात आणि दिलेले नाव हिच ओळख बनू लागते. हे आपल्याला चिकटणारं सगळ्यात पाहिलं लेबल. पुढे जसजसे मोठे होऊ लागतो तसतसे आपण कोणाचे तरी अपत्य आहोत, कोणाचे भाऊ / बहिण, काका, मामा, आत्या, पुढे जाऊन नवरा / बायको , वडील / आई , आजी / आजोबा आणि बरच काही, हीच स्वतःची ओळख वाटू लागते. लेबलांवर लेबलं चिकटत जातात. या मी वरच्या अनंत आरोपाखाली मी पुरता दबून, हरवून जातो. या नात्यांच्या गोड? आवरणात मी नाहीसा होतो. आजच्या जलद युगात नात्यांच्या लेबलांसोबत, आपली नोकरी / व्यवसाय, उद्योग, या जागी असलेली ओळख, ती तर बहुदा आजपर्यंतच्या सर्वच आवरणांना झाकून टाकते. हा परावर्तीत मी’, बाहेरून स्वतःची ओळख देणारा इतका बेमालूम आहे की त्याच्या आवडीनिवडीच मला माझ्या वाटायला लागतात. एव्हाना तुमच्या लक्षात आल असेल कि परावर्तीत मी विविध रुपात आहे, स्वाभाविक आहे की त्यात स्थिर होणे अशक्य आहे.  

जो स्वतः मधला मी अभिप्रेत आहे, तो संक्रांतीच्या हलव्यागत, साखरेचे थरावर थर चढल्यावर तीळ जसा नाहीसा होतो ना अगदी तस्सा नाहीसा झाला आहे. हलव्याच्या दाण्यातून तीळ वेगळा करायचा आहे. स्वस्थ बसण्या करीता, स्वतः चा शोध लागल्यावरच पुढे प्रवास सुरु होणार.

हा मी तसा फार क्रियाशील आहे, तो अधून मधून आपलं डोक वर काढत असतो. सकाळच्या घाई गडबडीत क्वचित आठवणारी गाण्याची किंवा कवितेची एखादी ओळ क्षणात आपल्याला कुठे तरी दूर घेऊन जाते. कोणाच्या तरी आग्रहाखातर चित्रांच्या प्रदर्शनाला गेल्यावर एखाद्या चित्रापुढे नकळत थबकणारी आपली पाऊलं वा एखाद्या डोंगरावरून दिसणारे विहंगम दृश्य आपल्याला क्षणभर जगाचा विसर पडायला लावतं. नेमक काय होतं हे कळत नाही, पण काही काळ खूप छान वाटत राहतं, उगाचच. तुम्ही देखील हे निश्चित अनुभवलंय. पण मी भोवतालच्या आवरणात ती अनुभूती गडप झाली आहे.

नेमकी ही अनुभूतीच अधिकाधिक तीव्र करण्याची गरज आहे तीच आपल्याला खऱ्या मी च्या जवळ नेऊ शकेल. जसजसे आयुष्य पुढे जाईल तसतसे हे कांद्याच्या आवरणा सारखे असलेले मुखवटे एक एक करून गळून पडतील आणि कदाचित आपणच आपल्याला अनोळखी वाटू लागू आणि तेव्हा सुरवात करू म्हणाल, तर खूप उशीर झालेला असेल... थोडक्यात काय अर्थ हरवलेल्या शब्दात स्वस्थ ची भर पडेल. 

Sunday, 10 June 2018

अर्थ हरवलेले शब्द... १



सगळ्याच भाषा आपापल्या परीने विविध भाषालंकारानी सर्वांगाने नटलेल्या असतात, तरी मराठीची गोडी काही औरच, मातृ भाषा आहे, म्हणून असेल कदाचित. मराठी भाषेतील साहित्य निर्मिती, साहित्यकारांच्या भाषेवरील प्रभुत्वाचे जागोजागी घडणारे दर्शन, निर्मितीतील अभिजातता, विषयांतील वैविध्य, कालातीत असलेल्या म्हणी, वाक्प्रचार, सुविचार काय काय म्हणून सांगू. या सगळ्यांच्या मुळाशी असलेले अर्थपूर्ण शब्द, संस्कृतोत्पन्न असल्याचा पदोपदी मिळणारा पुरावा. मी गाणी ऐकतो पण त्यातले काव्य मला जास्त भावते, त्यातील अर्थ मला नेहेमीच आकृष्ट करतो. बोलताना, ऐकताना माझं लक्ष सारखं शब्दांकडे जातं. बदलत्या राहणीमानामुळे म्हणा किंवा त्यातील वेगामुळे म्हणा अनेक शब्दांचा अर्थ लोप पावतोय असे वाटते. का त्या शब्दांचा उपयोग, वापर करण्या योग्य स्थितीच उरलेली नाही, नेमक सांगणे कठीण आहे. वानगी दाखल परवाचीच गोष्ट पहा ना.

रविवार संध्याकाळ, दारावरची बेल वाजली मला कोणीही अपेक्षित नव्हतं. कुतुहूल मिश्रित मुद्रेने मी दार उघडलं. बघतो तो काय एक जुना सोबती दारात उभा. “कायरें आश्चर्य वाटलं मला बघून?” ध्यानी मनी नसताना अचानक दारात उभ्या राहिलेल्या मित्राला बघून खरतर थोडा गडबडलोच. तसा तो अवलियाच, आज पर्यंतच्या त्याच्या आयुष्यात असामान्य नाही पण जगरहाटीला धरून देखील काही नव्हते, स्वतःला सावरत म्हणालो “नाहीरे, अगदी तसच काही नाही, पण आज अचानक?” चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहून तो हसला, “घरात तरी घेशील, की दारातूनच बोळवण करणार आहेस?” मी पटकन बाजूला होउन त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला घरात घेतलं, स्वारी सोफ्यावर स्थानापन्न झाली. त्याची देहबोलीच सुचवत होती की त्याच्याकडे खूप मोकळा वेळ आहे. त्त्याचं पाणी पिऊन होईपर्यंत देखील मला धीर निघत नव्हता, “आज कसा काय..?” नेहेमीच्या सवयी प्रमाणे माझ वाक्य अर्धवट तोडत तो बोलता झाला “अरे सहजच” “सहज?, आमच्या घरावरून कुठे जात होतास ?” मी, त्याच्या भेटीला उद्देश देण्याच्या प्रयत्नात. “नाही रे, तुझ्याकडे म्हणून येऊ शकत नाही का?, आलो सहज भेटायला” पुन्हा सहज! त्याच्या दृष्टीने माझी भेट एवढ कारण पुरेसें होते. माझ्या पचनी त्याचं ते “सहज” काही पडत नव्हते. छान अर्धा पाउण तास गप्पा झाल्या. तो मोकळेपणी बोलत होता आणि मी मात्र हा आता कारण सांगेल मग सांगेल म्हणून मनातल्या मनात वाट बघत होतो. त्याला निरोप देत दार लावताना देखील मी त्याला म्हणालो, “feel free यार, if there is anything you want to share?” अडचणीच्या वेळेला आपण इंग्रजीचा आधार का शोधतो माहित नाही. तो गोड हसला, “लेका, तुम्हा लोकांना ना निर्हेतूक काही असू शकत, हे पटतच नाही. सहज वागताच येत नाही. चल बाय” धाड धाड पायऱ्या उतरून तो चालता झाला. पुन्हा सहज!! मला काही केल्या चैन पडेना. तासा दोन तासाने मी त्याला फोन केला, “पोचलास का रें?” “कधीचाच, तुझ्या कडून सरळ घरीच आलो, आणखीन कुठे जायचंच नव्हतं.”

गादीवर पडल्यावर देखील माझ्या डोक्यातून त्याच ते “सहज” काही निघत नव्हतं. सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत, कोणती गोष्ट आपण सहज करतो याचा विचार करत होतो. सकाळी चालायला बाहेर पडण्यापासून सुरवात करा, बहुतेकांना मधुमेह, हृदय विकार नाहीतर रक्तदाब यांची भूत चालवत असतात. किती जण त्यांच्या रोजच्या चालायच्या रस्त्त्यावर कोणती झाडे आहेत हे सांगू शकतील? वाटेतल्या बहाव्याची झुंबरं वाऱ्यावर झुलताहेत, कोपऱ्यावरचा गुलमोहोर पेटलाय, तम्राशिम्बी (गुगल copper pod tree) आभाळाकडे हात करून उभा आहे वा काटे सावर लाल पाकळ्यांचा सडा पायतळी पसरून हिरव्या गार बोन्डांनी डवरली आहे किती जणांना हे दिसतं, जाणवतं ? त्याच रस्त्यावर जर निरुद्देश फिरलो तर निसर्गाची, भर उन्हात डोळ्यांना निवावणारी ही रूपं मनाला भावल्याशिवाय राहणार नाहीत. मी शेवटचा एका जागी सहज कधी बसलो होतो हे आठवत नाही. कधी भ्रमणध्वनीचा छोटा पडदा तर कधी विश्व दर्शन घडवणारा मोठा पडदा डोळ्यासमोर असतो. ते नसेल तर वर्तमान पत्र किंवा मासिक, एखादे पुस्तक. माझा मीच असा कधी बसलेलो मला आठवत नाही.

वेळ घेऊन, काम सांगून मगच भेटायला येणाऱ्यांच्या विश्वात वावरणाऱ्या मला त्याच ते “सहज” झेपत नव्हतं. मित्र असोत व आप्त सगळेच जण हे नियम पाळतात मी देखील कोणाकडे सांगितल्या शिवाय जात नाही. ही खरोखरच काळाची गरजच झाली आहे का संपर्क माध्यमांची विपुलता याला कारणीभूत आहे? त्यांचा अपव्यय?

एखादी गोष्ट प्रयास, सायास न करता जमली पाहिजे. तसं बघायला गेलो तर सहज शब्दाची ओळख लहानपणीच होते. वदनी कवळ घेता हा श्लोक आपल्यातील बहुतेकांना ठाऊक आहे. खालेल्ल्या अन्नाचे सहज हवन होते जर उदर भरण हा यज्ञ समजून घेतेलेला प्रत्येक घास हा त्या यज्ञातील श्रीहरिला दिलेली समिधा मानून सेवन केला तर. आपल्या आयुष्याचे काहीसे तसेच आहे. अहंकार, भीती आणि त्या पोटी निर्माण होणारा अविश्वास ह्या त्रिकोणात आपण स्वतःला पार अडकवून टाकलं आहे. भूतकाळात पाय रुतवून केलेली भविष्याची चिंता आणि वर्तमानाचा अधिक्षेप, अनिश्चिततेचा भासमान विळखा आणि त्या पासून स्वतःला वाचवण्याची सततची चालेली धडपड. ह्या सगळ्यात आपण आपले मूळ स्वरूप हरवून बसलोय. लहानपणीचा मी हरवलोय आणि आतातर त्याला शोधायची देखील भीती वाटत आहे. आपल्या भोवताली असलेल्या निसर्गाचा आपण ही एक भाग आहोत किंबहुना आपण निसर्गच आहोत, मग ते सहज सोपे का असू नये. आपल्याला मिळालेल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर स्वतः भोवती गुंता निर्माण करून त्यात अडकण्या पेक्षा मुक्त कसं होता येईल याचा विचार करा. जगण्यातली सहजता हरवू देऊ नका नाहीतर, सहज शब्द केवळ मराठी शब्द कोशातच राहील.  



Wednesday, 28 February 2018

महिला दिन



८ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. गुगल नुसार महिला दिनाचा इतिहास १९०७ इतका मागे जातो, पण आजच्या स्वरुपात महिला दिन १९७५ पासून, संयुक्त राष्ट्रसंघाने आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केल्यावर अस्तित्वात आला आहे. १९०७ पासून १९७५ पर्यंत वेगवेगळ्या दिवशी (जगाच्या पाठीवर कुठे न कुठे स्त्रियांनी ह्या दिवशी अन्यायाला वाचा फोडलेली दिसते) पण बहुतांशी फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या तारखेला महिला दिन साजरा होत असे.

महिला दिन, जगभरातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा आणि कला इत्यादी विविध क्षेत्रात यश मिळविलेल्या महिलांचा यथोचित सत्कार करण्याचा दिवस. या दिवशी अशा यशस्वी महिलांची ओळख जगाला होतेच पण त्याचबरोबर अनंत महिलांना आपापल्या क्षेत्रात अतुल्य कामगिरी करण्याची स्फूर्ती देखील मिळते. महिला दिन साजरा करणारा समाज, एका अर्थाने लिंग भेद नाकारून महिलांना समान संधीची ग्वाही देत असतो. त्याचबरोबर महिलांना बरोबरीचे स्थान देतानां त्यांच्या सुरक्षिततेची हमी देखील घेत असतो.

संयुक्त राष्ट्रासंघाने महिला दिनाला नेमके स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक महिला दिन एका मूळ संकल्पनेला धरून साजरा केला जातो, २०१७ साली #BeBoldforChange, बदल घडवून आणायच धाडस करा असं सांगणार वर्ष. मग तो बदल वृतीतला असो, स्त्री हिंसे विरोधात असो किंवा स्त्रियांच्या प्रगतीकरता, शिक्षणाकरिता असो. २०१८, म्हणजे ह्या वर्षी #PressforProgress ही संकल्पना घेऊन महिला दिन येत आहे. महिला दिनाची संकल्पना ठरविणाऱ्यांच्या दृष्टीने योग्य वेळ आलेली आहे, २०१७ च्या पार्श्वभूमीवर, प्रगती करता आवश्यक ती वातावरण निर्मिती झालेली आहे आणि हीच वेळ आहे प्रगतीचा आग्रह धरण्याची.  

२०१७ साल, एका अर्थाने धाडसी बदलाच्या प्रयत्नांच, महिलांच्या लैंगिक शोषणाला वाचा फोडणार वर्ष ठरलं. अत्त्याचार, जे आज नव्हे तर गेली कित्त्येक वर्षांपासून चाललेले आहेत, कैक वर्षांपूर्वी झालेले आहेत. ह्या अत्त्याचाऱ्यांच्या विरोधात ब्र काढण्याच धारिष्ट आजपर्यंत ज्या महिलांना झालं नव्हत, ते होण्याचं कारण महाजालावर सुरु झालेली ‘मी-सुद्धा’ (#MeToo) ही मोहीम आणि त्याचे जगभरात उमटलेले पडसाद, #YoTambien मेक्सिको, स्पेन, दक्षिण अमेरिका, #QuellaVoltache इटली, #BalanceTonPorc फ्रांस, #Ana_Kaman अरब राष्ट्र. या सर्व हॅश टॅगवर सूर एकच होता महिलांवर झालेले लैंगिक अत्यचार, आणि ते देखील कोणा सामान्य गुन्हेगारांनी नव्हे तर प्रतिथयश, सुप्रसिद्ध, उच्चभ्रु मान्यवरांनी केलेले. अनेक वर्ष चालू असलेले. २०१७ साल हे तसे अपवादात्मक नव्हे, वानगीदाखल २०१४ चे उदाहरण देता येईल. #YouOkSis रस्त्यावरील छळाविरुद्ध, #WhatWereYouWearing अत्त्याचार झाला तेव्हा पिडीत महिलेने काय परिधान केले होते, जेणे करून अत्त्याचाराला उद्युक्त केल्याबद्दल तिलाच जबाबदार धरता येईल (येथे पिंक चित्रपटाची आठवण झाल्याशिवाय रहात नाही), #SurvivorPrivilege अत्त्याचारग्रस्त महिलांचे अधिकार, अशा अनेक मोहिमांमधून महिला, महाजालावर व्यक्त झाल्या होत्या. २०१७ मधे वेगळं काय घडलं जे आधी घडलं नाही, तर या वर्षातील मोहिमांची व्याप्ती. ‘मी-सुद्धा’ या मोहिमेने जगभरातील अनंत महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली.

अन्याय करणाऱ्यांइतकाच सहन करणारा देखील जबाबदार असतो असे म्हणतात, पण स्त्रियांवरच्या अन्यायाबद्दल असं म्हणणं काहीसं गैर वाटतं, कारण या प्रकारात समजात आजही पिडीत महिलेलाच  दोषी ठरविण्याचा कल आहे. एक साधेच उदाहरण देऊन पुढे जातो. घटना घडल्यानंतर जवळचे, ज्यांच्या कडून पाठबळ मिळण्याची अपेक्षा असते, त्यांचाच प्रश्न असतो, तू तिथे किंवा त्याच्याबरोबर गेलीसच कां? म्हणजे आगळीक करणारा बाजूलाच राहिला. आवाज उठवण्याकरिता खरोखरच धाडस लागतं, आणि तशी परिस्थिती असावी लागते. परिस्थितीला समाज जबाबदार आहे.

रोजचे वर्तमानपत्र वा कुठल्याही वृत्तवाहिनीवरील कार्यक्रम  स्त्रियांवरील अत्त्याचाराच्या, विनयभंगाच्या किंवा लैंगिक शोषणाच्या बातमी शिवाय संपतच नाही. जस जशा स्त्रिया नवीन क्षेत्रात पदार्पण करू लागल्या आहेत, तसं तसे त्या क्षेत्रात नव नवे शोषणाचे, लैंगिक भेदभावाचे प्रकार देखील होऊ लागले आहेत. क्षेत्र मग ते शैक्षणिक असो, कला असो, व्यवसाय असो, लैंगिक छळाची घटना जणू अनिवार्य झाली आहे. होणाऱ्या तांत्रिक प्रगती बरोबरच अत्त्याचाराचे स्वरूप देखील बदलू लागले. महाजालावरच्या सामाजिक माध्यमांवर प्रत्येकाचा वावर जणू आवश्यकच झाला आहे. या सामाजिक माध्यमांचा वापर करून आपल्या मोहजालात फसगत करणाऱ्यांची संख्याही काही कमी नाही. महाजालावरील छळामुळे मानसिक संतुलन बिघडल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या आहेत. व्यावसायिक क्षेत्रात लैंगिक छळाच्या घटना तर रोजच्याच आहेत. या व्यतिरिक्त बलात्काराच्या घटना आपला सहयोग देतच असतात. वर उल्लेखिलेल्या २०१७ मधील मोहिमांचा थोडक्यात अर्थ अन्यायाला, अत्त्याचाराला, शोषणाला वाचा फुटली नाही म्हणजे ते झालेच नाहीत असे नाही. आज आपण २१ व्या शतकात असून देखील समाज १०० वर्षांपूर्वी होता तसाच आहे कि त्याहून वाईट असा प्रश्न पडतो.

जवळ जवळ वीस वर्षांपूर्वी अशाच काहीशा प्रसंगानंतर लिहिलेल्या ओळी उधृत कराव्याशा वाटतात-

दारातून तू झुकुनी बघता 
सळसळले ते
जुनाट जख्खड झाड वडाचे ।१।
मानवर करुनी हसलीस जेव्हा
थरथरले ते
जुनाट जर्जर झाड वडाचे ।२।
डोक्यावरचा पदर जाता
हलु लागले
जुनाट कुजकट झाड वडाचे ।३।
वाचा फुटता अन्याया मग
झुकू लागले
जुनाट पिचके झाड वडाचे ।४।
सुटलीस जेव्हां उंबऱ्या मागून
उन्मळले ते
जुनाट जुनाट झाड वडाचे ।५।
उरले सडके लाकूड केवळ
अन सुकलेली काळी बांडगुळ
पण जाता जाता जुनाट जख्खड
प्रसवूनी गेला
नवीन वडांचे जुनेच जंगल ।६।

महिला दिन साजरा करणारा समाज हा एक प्रबुद्ध, जबाबदार समाज असावा. ज्या समाजाने लिंग भेदाला पूर्णविराम दिलेला आहे, ज्या समाजात स्त्री म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून महिलांना स्थान आहे, जीवनातील प्रत्येक क्षेत्रात त्यांना समान संधी उपलब्ध आहेत. माझ्या कल्पनेप्रमाणे हे उद्दिष्ट कमीत कमी १०० वर्षेतरी दूर आहे पण अशक्य नाही.

हा विषय ढोबळमानाने दोन भागात विभागता येईल. एक - स्त्रियांवर होणारे अत्त्याचार, मग तो बलात्कार, विनयभंग असो, कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी होणार छळ असो, वा घरात होणारा स्त्रियांचा मानसिक वा शारीरिक छळ असो. थोडक्यात भारतीय दंड संहिते नुसार जो गुन्हा आहे. आणि दुसरा भाग लैंगिक असमानता आणि त्यामुळे होणारा अन्याय.

स्त्रियांवरील अत्त्याचार जरी समाजाच्या मानसिकतेशी निगडीत असला, तरी फक्त त्यातील बदल पुरेसा नाही. मुख्यत्वे कायदा, कायद्याची अमलबजावणी, न्यायदानाची तत्परता ह्या बाबींची सुधारणा अशा अत्त्याचाराना आवर घालण्यास अत्यावश्यक आहे.    
लिंग भेदामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांकरिता खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाची गरज आहे. सामाजिक मानसिकतेतला बदलच केवळ लैगिक समानता आणू शकतो. या परिवर्तनाची सुरवात समाजाच्या छोट्यात छोट्या घटकापासन सुरु होणे आवश्यक आहे अन्यथा दिसलेला बदल तत्कालिक ठरेल. समाजाचे सर्वात लहान एकक, म्हणजे कुटुंब, बदलाला सुरुवात इथून झाली पाहिजे. लिंग भेदाची ओळख नवीन पिढीला कुटुंबाच्या चौकटीतच होते आणि म्हणूनच स्त्रीला एक व्यक्ती म्हणून दर्जा, सर्व प्रथम कुटुंबात मिळणे गरजेचे आहे. कुटुंब प्रमुख हा शब्द प्रयोग हेतुपुरस्सर टाळला आहे कारण हा शब्द प्रयोग निर्णय क्षमता एका व्यक्तीत केंद्रित करतो आणि जो आजच्या पुरुष प्रधान समाजात पुरुष आहे. थोड्क्यात घरातील, कुटुंबातील निर्णय प्रक्रियेत स्त्रीचा समान सहभाग अपेक्षित आहे. जेणेकरून मुलांसमोर एक कायम स्वरूपी उदाहरण राहील. मुलांचे संगोपन करताना मुलगा आणि मुलगी असा भेदभाव होणार नाही ह्याची प्रयत्नपूर्वक काळजी घ्यावी लागेल. अगदी सहज मारलेला शेरा “अग तुला नाही जमणार दादाला सांग”, नुकसान करू शकतो. तिला का जमणार नाही ते सांगा अन्यथा तिच्या आणि दादाच्या डोक्यात फक्त लैंगिक तफावत नोंदवली जाईल. अभ्यासक्रम निवडताना, आयुष्याची ध्येय ठरवताना, आयुष्याच्या ज्या ज्या वळणावर मुलं तुमच्याकडे मार्गदर्शना करिता बघतील त्या वेळी शक्यतो लिंग हा निकष न लावता योग्य तो सल्ला द्या.  

लहान मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या समोर आई आणि वडील हेच दोन आदर्श असतात. बहुतांशी मुले त्यांच्या पावलावर पाउल टाकून पुढे जात असतात. आई, वडिलांची जबाबदारी वरील विषयाला अनुषंगून अतिशय जागरूकतेने पार पाडणे गरजेचे आहे, जागरूकतेने अशा करिता साध्या बोलण्यात सुध्दा स्त्रीला कमी लेखल जाऊ शकत उदा. पुढे हळू जाणाऱ्या गाडीला मागे टाकून पुढे जाताना, त्या गाडीतील स्त्री चालक बघून ‘वाटलंच बाई असणार’ हा टोमणा वजा संवाद (जर चालक पुरुष असता तर ‘आयला काय चालवतात’ असा असता), मागच्या सीटवर बसलेल्या मुलांना नेमका चुकीचा संदेश देउन जातो. तुमचा उद्देश कदाचित तसा नसेलही. घरात मुलांसमोर होणार कोणत्याही स्त्रीचा उल्लेख कसा होतो ह्या कडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. मग स्त्री कोणत्याही क्षेत्रातील असो.

ज्या क्षणी मुलं घराबाहेर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पडतील त्या वेळी त्यांच्या डोक्यात महिलांबद्दल आदर आणि बरोबरीची भावना जर असेल तर ही पिढी बदलाकरिता पोषक वातावरण निर्माण करू शकेल. हे समाज परिवर्तन आहे. त्याचे दृश्य परिणाम दिसण्याकरिता कैक वर्ष, काहीएक पिढ्या कदाचित जाव्या लागतील. प्रत्येक सुविद्य नागरिकाने हा वसा आपल्या पुढच्या पिढीला, त्यांच्या पुढच्या पिढीला देण्याकरिता देणे, अत्यंत आवश्यक आहे.

आपण भारतात जन्माला आलो हे आपले भाग्य आहे. भक्कम कुटुंब व्यवस्था हा आजही आपल्या समाजाचा गाभा आहे, गार्गी, मैत्रेयी या सारख्या विदुशींचा ह्या देशाला वारसा आहे, स्त्री ही देवी स्वरुपात  कुठे सरस्वती, कुठे लक्ष्मी म्हणून घराघरात पुजली जाते, इतर देशांच्या मानाने कदाचित आपलं काम सोपं आहे. फक्त गरज आहे ती विचार करू शकणाऱ्या प्रत्येकाने आपले योगदान देण्याची. मला खात्री आहे पाश्चिमात्य देशांना या बाबतीत आपण नक्की मार्ग दाखवू शकतो.